डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना १६ एप्रिलला ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सरकारमधील मंत्रीही उपस्थित होते. खारघरमधील मैदानात झालेल्या कार्यक्रमाला लाखो अनुयायी उपस्थित होते. पण, या कार्यक्रमाला गालबोट लागलं होतं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नवी मुंबईतील खारघर येथे ‘महाराष्ट्र भूषण’ हा पुरस्कार दुपारच्या सुमारास पार पडला होता. तेव्हा तापमान ४२ अंश सेल्सियस असल्याने अनेकांना उष्माघाताची समस्या जाणवली. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यातील १४ जणांचा मृत्यू झाला होता. ही घटना समोर आल्यानंतर शिंदे सरकारवर चौफेर टीका करण्यात येत आहे. त्यातच आता १४ जणांचा शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे.

हेही वाचा : प्रशासकीय नाकर्तेपणाचे बळी!

वैद्यकीय अधिकाऱ्याने सांगितल्यानुसार, “१४ जणांचा मृत्यू उष्माघातामुळेच झाला आहे. या १४ पैकी १२ जणांचा शवविच्छेदन पनवेल येथील उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आलं होतं. तर, दोघांचं शवविच्छेदन अन्य रुग्णालयात करण्यात आलं. यातील दोन मृतांना इतर व्याधींनी ग्रासलं होतं,” असं वैद्यकीय अधिकाऱ्याने म्हटलं.

१४ मृतांमध्ये १० महिला आणि चार पुरुषांचा समावेश आहे. रविवारी ( १६ एप्रिल ) रात्री उष्माघातामुळे ११ जणांचा मृत्यू झाला होता. तर, सोमवारी ( १७ एप्रिल ) दोन जणांचा मृत्यू झाला. अन्य दोघांचा दोन दिवसांत मृत्यू झाला होता.

हेही वाचा : खारघर घटनेतील मृतांचा आकडा लपवला जात आहे; सरकारने राजीनामा द्यावा अन्यथा…, नवी मुंबई काँग्रेसचा इशारा

शवविच्छेदन अहवाल चौकशी करत असलेल्या अधिकाऱ्यांना दिला असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. मधुकर पांचाळ यांनी दिली आहे. याबाबत ‘इंडियन एक्स्प्रेस’ने वृत्त दिलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kharghar maharashtra bhushan tragedy autopsy reports confirm victims died of sunstroke ssa