रत्नागिरी जिल्ह्यात गुरुवारपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याचे प्रकार घडत आहेत. अशातचं खेड तालुक्यातील मौजे पोसरे धामणन बौद्धवाडी येथे दरड कोसळल्याने कोसळल्याने सात कुटुंबातील १७ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती समोर आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती विभागाच्या माहितीनुसार धामणंद बौद्धवाडी येथे अतिवृष्टीमुळे दरड कोसळल्याची घटना घडली आहे. यामध्ये सात कुटुंबातील १७ जण ढिगाऱ्याखाली सापडले असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच या ढिगाऱ्याखाली २४ जनावरे देखील अडकली आहेत. या घटनेत दहा जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

खेड तालुक्यातील मौजे पोसरे धामणन बौद्धवाडी येथे दरड कोसळून काही जण ढिगाऱ्याखाली सापडले आहेत. चिपळूण तालुक्यातील कुभाली येथेही घाटात दरड कोसळली होती. तेथील दरड हटवण्यात आली आहे. कोल्हापूर रत्नागिरी मार्गांवर आंबा घाटात रस्ता खचल्याने वाहतूक बंद केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात गुरुवारी दिवसभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणची वाहतूक बंद पडली आहे. अनेक ठिकाणी पूल वाहून गेले आहेत. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

दरम्यान, चिपळूणमध्ये पुरात अडकलेल्या चिपळुणातील नागरिकांना वाचवण्यासाठी शुक्रवारी सकाळपासून जोमाने मदतकार्य सुरू झाले आहेत. शासकीय यंत्रणेसह राज्यातील वेगवेगळ्या सामाजिक संघटना आणि स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी मदत करत आहेत. नागरिकांना बोटींच्या मदतीने पुराच्या पाण्यातून बाहेर काढले जात आहे. शहरातील पाण्याची पातळी तीन फुटाने कमी झाल्यामुळे नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे. मोबाईल सेवा आणि वीज पुरवठा खंडित असल्यामुळे लोक अजूनही संपर्काच्या बाहेर आहेत त्यामुळे प्रत्येकजण काळजीत आहे.

शहरातील नागरिकांना २४ तासात पुराच्या पाण्यात काढावे लागले. शुक्रवारी सकाळी पाणी ओसारण्यास सुरुवात झाली होती. मात्र कोयना मधून विसर्ग सुरू करण्यात आल्याने त्याचा परिणाम वाशिष्ठी नदीची पाणी पातळी वाढण्यास झाला. गुरुवारी रात्रीपासूनच रेस्क्यू ऑपेशनला सुरुवात झाली आहे.

धरण क्षेत्रातील पावसामुळे गुरुवारी पहाटेपासून चिपळूनमध्ये पूरजन्य स्थिती निर्माण झाली. कधी नव्हे तो चिपळूण, खेर्डी आणि आजूबाजूच्या परिसर पाण्याने व्यापला गेला. ही परिस्थिती होणार हा अंदाज असतानाही मदत पथके खूप उशिरा चिपळूणच्या दिशेने निघाली. वाटेत अनेक नैसर्गिक अडचणी आल्या. त्यामुळे रात्री ८ च्या दरम्याने चिपळूणला पोहोचले. जितकी शक्य तितकी मदत एनडीआरएफने केली. हेलपिंग हँड, रत्नदुर्ग मौंटेनिअर्स, कोल्हापूर येथील व्हाईट आर्मी ग्रुप सह सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी रायगड मधील काही स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते चिपळूणला पोहोचले आहेत. अडचणीतील लोकांना बाहेर काढण्यास मदत केली जात आहे. जयगड, दापोली, गुहागर येथून अनेक मच्छीमारी नौकांनी चिपळूणमध्ये आपल्या बोटी नेल्या आहेत. शुक्रवारी सकाळपासून खऱ्या अर्थाने मदत कार्याला वेग आला आहे. सकाळी चिपळूणमधील पावसाचा जोर ओसरला आहे. गोवळकोट रस्त्यावरील पुराचे पाणी साधारण ३ फुटाने कमी झाले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Khed taluka 17 people were trapped due to landslides rescue operation begins abn