Sanjay Shirsat on Khuldabad Rename : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद (खुलदाबाद) येथील औरंगजेबाच्या कबरीवरून महाराष्ट्राचं राजकारण तापलं आहे. बजरंग दलासह अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी खुलताबाद येथील औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी केली आहे. या कबरीच्या मुद्द्यावरून नागपुरात अलीकडेच दंगल झाली. मात्र, ही कबर संरक्षित असून ती हटवता येणार नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. त्याचवेळी त्यांनी नमूद केलं की औरंगजेबाचं उदात्तीकरण होऊ देणार नाही. दरम्यान, आता खुलताबादचं नामांतर होणार असल्याची चर्चा आहे.

सामाजिक न्यायमंत्री तथा छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी या नामांतराच्या मुद्द्यावर भाष्य केलं आहे. “खुलताबादचं रत्नपूर असं नामांतर केलं जाईल”, अशी माहिती शिरसाट यांनी दिली आहे.

संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?

संजय शिरसाट म्हणाले, “छत्रपती संभाजीनगरचं पूर्वी खडकी असं नाव होतं. कालांतराने त्याचं नाव औरंगाबाद असं झालं. त्याचप्रमाणे खुलताबादचं नाव पूर्वी रत्नपूर होतं. कालांतराने ते खुलताबाद झालं. औरंगजेबाने जे जे कारनामे केले त्यात शहरांची नावं बदलण्याचा प्रकारही त्याने केला. त्याने अनेक शहरांची नावं बदलली. धाराशिव, नगरचाही त्यात समावेश होता. आपल्या राज्यात ज्या ज्या शहरांच्या, ठिकाणांच्या नावात बाद-बाद (उदा : दौलताबाद) असा उल्लेख आहे ती सर्व नावं बदलली जातील. आम्ही (महायुती सरकार) नावं बदलण्याची प्रक्रिया हाती घेत आहोत. त्यानुसार खुलताबादचं रत्नपूर असं नाव असलं पाहिजे. कारण तेच नाव पूर्वी देखील होतं. औरंगाबादचं नाव बदललंय. तसंच आता खुलताबादचं बदललं पाहिजे, अशी आमची भूमिका आहे.”

खुलताबादमध्ये स्मारक उभारणार

मंत्री शिरसाट म्हणाले, खुलताबादमध्ये ज्या ठिकाणी औरंगजेबाची कबर आहे तिथे मराठ्यांच्या शौर्याचं प्रतीक असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांचे व छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्याबाबत आमच्याकडे निवेदने आली आहेत. त्यानुसार सरकार या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे व छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक उभारणार आहे. औरंगजेबाने ज्या ज्या गावांची, शहरांची नावं बदलली ती सर्व नावं बदलली जातील.

राज्य सरकारने याआधी औरंगाबादचं ‘छत्रपती संभाजीनगर’, उस्मानाबादचं ‘धाराशिव’ व अहमदनगरचं ‘अहिल्यादेवी होळकर नगर’ असं नामांतर केलं आहे.