Kiran Mane कॉमेडियन कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात एक विडंबनात्मक गाणं रचलं तसंच त्याच्या शोमध्ये ते गाणं म्हटलं. ज्यावरुन वाद निर्माण झाला आहे. तसंच कुणाल कामराच्या विरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्या ज्या हॉटेलमध्ये हा कार्यक्रम झाला तिथे शिवसैनिकांनी तोडफोडही केली. यावरुन उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. आता अभिनेते किरण माने यांनी एक पोस्ट लिहिली आहे. जी चर्चेत आली आहे
काय आहे किरण मानेंची पोस्ट?
जनमत नसलेले नेते टीकेला घाबरतात. कुणी कितीही कर्कश्शपणे ओरडून इशारा देऊदेत, कुणाल कामरा घंटा माफी मागत नसतोय… स्वानुभवावरून सांगतो, विद्रोहाची आग कुणापुढे मिंधी नसते. यांना खरा राग कुणाल कामराचा नाही.कुणाल बोलताना ज्या पद्धतीनं तरुण पोरंपोरी हसताहेत आणि ज्या उत्स्फूर्तपणे महाराष्ट्रातल्याच नव्हे, तर देशभरातल्या जनतेनं हा व्हिडिओ व्हायरल केला… सगळा देश हसू लागला. त्यामुळे त्यांच्या पायाखालची जमीन सरकली ! भ्रष्ट मार्गाने सत्ता मिळवली आहे. ‘आपण मतदान न करूनही मतदार याद्यांमध्ये घोळ करून हे सत्तेत बसलेत.’ या संशयाबद्दलचा जनतेचा रोष रोज उफाळून येतोय. जनतेला आधी संशय होता, मारकडवाडी दाबल्यानंतर खात्री झाली. आता अशा घटनांमुळे तर संपूर्ण विश्वास बसू लागलाय.
सत्ताधाऱ्यांबरोबरचे नेते मनापासून नाहीत-किरण माने
बरं या सत्ताधार्यांसोबत जे जे नेते आहेत, ते कुणीही मनापासून नाहीत… इडीच्यावगैरे धाकामुळं किंवा पद,पैशांच्या लालसेनं जवळ आहेत. त्यांचे कार्यकर्ते सोशल मीडियाची ट्रोलिंगची बाजू सांभाळतात. ते काय, नेते गुलाल उधळतील तिकडे चांगभलं करतात. ते ही मनापासून सत्तेसोबत नाहीत. पण विरोधकांकडं कुठलंही आमिष नसून अजूनही विरोधकांची बाजू घेणारे कसे शिल्लक आहेत??? हा प्रश्न त्यांना पडतो. म्हणून कुणीही सत्ताधार्यांची चड्डी उतरवली की ‘याच्यामागे कुणाचातरी हात आहे. याला कुणीतरी पैसे दिलेत. आम्ही बँक डिटेल्स तपासणार सीडीआर काढणार ही भाषा सुरू होते.’
आम्ही संविधानप्रेमी आहोत-किरण माने
अरे येड्याहो… आम्ही सगळे शिव-शंभू-फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांची लेकरं आहोत. संविधानप्रेमी आहोत. आम्हाला कुठली भिती किंवा कुठलं आमिष बोलायला लावत नाही. तुम्हाला प्रत्येक गोष्ट सत्ताबळ किंवा धनशक्तीच्या आधारानं करावी लागते. तुमच्या फेवरमध्ये बातम्या देणार्या न्यूज चॅनल्सच्या मालकांपासून ते तुमच्या बाजूनं शिरा ताणून जोरजोरात ओरडत बोलणार्यापर्यंत प्रत्येक गोष्ट ‘स्पॉन्सर्ड’ आहे. तुमच्यावर जनतेचं प्रेम नाही. तुमच्यासाठी रस्त्यावर उतरणारा,तोडफोड करणारा, तुमच्या बाजूने व्हिडीओ करणारा, पोस्ट करणारा, कमेन्ट करणारा प्रत्येकजण तुमचा ‘लाभार्थी’ आहे. तो लाभ बंद होईल तेव्हा तो तुमच्या पार्श्वभागावर लाथ घालणार आहे हे तुम्हालाही माहिती आहे !
जनमत नसलेले लोक टीकेला घाबरतात-किरण माने
जनमत नसलेले लोक टीकेला घाबरतात. पुर्वी बहुमत असलेले काँग्रेसी नेते टीकेला उडवून लावायचे. जेव्हा जनमत फिरले तेव्हा इंदिराजीही टीकेला घाबरू लागल्या होत्या. अंबरनाथ चिमुरडी बलात्कार प्रकरणापासून ते कोरटकरानं छत्रपतींना शिव्या देण्याची घटना असो… शिवरायांच्या पुतळ्यातल्या भ्रष्टाचारापासून सोमनाथ सुर्यवंशी-संतोष देशमुख हत्या असो… प्रत्येक प्रकरणानंतर जनतेची उत्स्फूर्तपणे येणारी प्रतिक्रिया सत्ताधाऱ्यांना हादरवते आहे हे नक्की !
…बाकी या झुंडशाहीत, दडपशाहीतही जे लोक स्वाभिमान टिकवून आहेत त्यांचा नाद करू नका. बँक डिटेल्स, सीडीआर सोडा… आमचं रक्त तपासलंत तरी तुम्हाला कणभरही भेसळ आढळणार नाही.
जय शिवराय जय भीम !
किरण माने
अशी पोस्ट किरण माने यांनी केली आहे. या पोस्टवरही विविध प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत.