सांंगली : सांगलीजवळील कृष्णेचे पात्र पुन्हा कोरडे पडले असून जलसंपदा विभागाच्या ढिसाळ कारभाराचा निषेध करण्यासाठी आणि नदी बारमाही वाहती ठेवावी या मागणीसाठी शनिवारी बंधार्याजवळ आंदोलन करण्यात आले.
याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, सध्या कोयना धरणामध्ये उपयुक्त साठा ७१ टीएमसी आहे. कोयना धरणातून विद्युत निर्मितीसाठी ४९ टीएमसी पाणी शिल्लक राहत आहे. त्यापैकी कृष्णा नदीसाठी २२ टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. तसंच हक्काचे धोम, उरमोडी, तारळा या धरणामधून टेंभू व ताकारी या योजनांसाठी मंजूर असलेले व राखून ठेवलेले १२ टीएमसी पाणी शिल्लक आहे. असे एकूण हक्काचे ३४ टीएमसी पाणी सांगली जिल्ह्यासाठी हक्काचे उपलब्ध आहे. ते पूर्णपणे सोडल्यास येथून पुढे (जून अखेर) १६० दिवस सांगली शहर व जिल्ह्याला पुरेल एवढे पाणी सध्या धरणात आहे. परंतु काही झारीतील शुक्राचार्य मंडळी कृष्णा तीरावरील लोकांना निष्कारण वेठीस धरण्याचा प्रयत्न करीत आहेत.
हेही वाचा – सातारा : राज्य सरकारच्या निर्णयानंतर साताऱ्यात जल्लोष
शनिवारी करण्यात आलेल्या आंदोलनामध्ये कृष्णा महापूर नियत्रण नागरी कृती समिती, नागरिक जागृती मंच आदी संघटना सहभागी झाल्या होत्या. यामध्ये सतीश साखळकर, विजयकुमार दिवाण, डॉ. व्होरा, मनोज पाटील, प्रभाकर केंगार, प्रदीप वायचळ, हणमंतराव पवार, तानाजी सरगर,आनंद देसाई, संजय चव्हाण यांच्यासह लोकमान्य क्रीडा मंडळाचे कार्यकर्ते यांचा समावेश होता.