ओबीसी बांधवांच्या लढ्यासाठी वडीगोद्री या ठिकाणी लक्ष्मण हाकेंचं उपोषण सुरु आहे. अशात त्यांच्या घरी चार दिवसांपासून चूल पेटलेली नाही. लक्ष्मण हाकेंच्या आईला आणि वडिलांना अश्रू अनावर झाले आहेत. आईची प्रकृती बरी नाही त्यामुळे उपोषण स्थळी तू येऊ नकोस असा निरोप लक्ष्मण हाके यांनी पाठवला आहे. मात्र मुलाच्या पोटात अन्न नाही आम्हाला अन्न गोड कसं लागेल? असा प्रश्न लक्ष्मण हाकेंच्या आईने विचारला आहे. त्यांच्या डोळ्यांमध्ये हे बोलत असताना पाणी आलं होतं.

काय म्हटलं आहे लक्ष्मण हाकेंच्या आईने?

आमचं लेकरु उपोषण करत आहे, आमचा जीव बुडून गेलाय. आम्ही काय करावं? बरा आहे का विचारलं की बरा आहे म्हणतोय. निजूनच आहे फार काही बोलत नाही. आम्हाला दिसतंय की सगळं. आम्हाला अन्न गोड लागणार आहे का? त्याच्या पोटात पाणी नाही, अन्न नाही. आमच्या मुलाची सरकारने लवकर दखल घ्यावी ही आमची मागणी आहे. असं लक्ष्मण हाकेंच्या आईने म्हटलं आहे. मराठ्यांना आरक्षण आम्ही काही नाही म्हणत नाही. पण ओबीसींना आरक्षण द्यायला पाहिजे. त्याच्या तब्बेतीसाठी आमचा जीव उडून गेला आहे. तो काय मागणी करतोय ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्य करावी असंही त्यांच्या आईने म्हटलं आहे.

आमचा लक्ष्मण उपाशी आहे. मलाही आता बरं वाटत नाही. बोलायलाही सुचत नाही. का लक्ष देत नाही माझ्या मुलाकडे? शासनाने दखल घेऊन लक्ष द्यायला पाहिजे. आम्हाला न्याय मिळाला पाहिजे असं लक्ष्मण हाकेंच्या वडिलांनी म्हटलं आहे. एबीपी माझाशी या दोघांनी संवाद साधला आहे.

हे पण वाचा- “ओबीसी आंदोलन सरकारपुरस्कृत”, मनोज जरांगेंचा मोठा आरोप; म्हणाले, “आमच्यात भांडण लावून ते…”

एक एकर जमिनीवर आपली उपजीविका करणाऱ्या हाके यांचे वडील शेळ्या मेंढ्या राखायचे काम करतात. त्यांनाही मुलाची अवस्था पाहून चिंता वाटत असून तो समाजासाठी लढत असताना सरकार का लक्ष देत नाही असा सवाल त्यांनी केला. आपल्या मुलांच्या चिंतेत हाके कुटुंबीय असून त्यांच्या पाठीशी आता राज्यभरातील ओबीसी समाज उभा राहत असल्याचे दिसत आहे . आज जुजारपुर गाव कडकडीत बंद करून गावात लाक्षणिक उपोषण सुरू करण्यात आले आहे. मराठा समाजाप्रमाणे सरकारने आपल्या मुलाच्या उपोषणाची दखल घ्यावी, अशी आर्त हाक लक्ष्मण हाके यांच्या आई वडिलांची आहे.

लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाचा आजचा आठवा दिवस

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनाचा आजचा आठवा दिवस आहे. लक्ष्मण हाके यांची प्रकृती उपोषणामुळे खालावली आहे. उच्च रक्तदाबामुळे त्यांना हृदयविकाराचा धोका उद्भवू शकतो अशी भीती डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे त्यांना तातडीने उपचार घेण्याची गरज असल्याचं मत डॉक्टरांनी व्यक्त केलंय. मात्र हाकेंनी उपचार घेण्यास नकार दिला आहे.