Laxman Hake : आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना शरद पवार महाजायीयवादी नेते आहेत, अशी टीका ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केली आहे. तसेच पवार कुटुंबातील सदस्य रात्री-अपरात्री जाऊन मनोज जरांगे यांना भेटतात, असा आरोपही त्यांनी केला आहे. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देऊ नये या मागणीसाठी लक्ष्मण हाके हे सध्या जालन्यातल्या वडीगोद्री येथे उपोषणाला बसले आहे. दरम्यान, आज त्यांनी यांसंदर्भात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी शरद पवार यांना लक्ष्य केलं.

काय म्हणाले लक्ष्मण हाके?

“आरक्षणाच्याबाबतीत शरद पवार यांची मोठी जबाबदारी आहे. ते राज्याचे मुख्यमंत्रीही राहिले आहेत. पण त्यांनी अनेक पदं केवळ घरातल्या लोकांना दिली. मंडल आयोग लागू होताना, शरद पवार हे मुख्यमंत्री होते. त्यासंदर्भातील कायदा आधी महाराष्ट्रात कायदा पारित झाला, त्यानंतर इतर राज्यांनी तो कायदा पारित केला, अशावेळी शरद पवार यांनी पुढे येऊन आरक्षण हे मागासवर्गीयांचे आरक्षण आहे, असं म्हणायला हवं, पण ते असं म्हणताना कुठंही दिसत नाही”, अशी प्रतिक्रिया लक्ष्मण हाके यांनी दिली.

हेही वाचा – Mangesh Sasane : “मराठ्यांची नोंद ‘क्षत्रिय’ तर कुणबींची नोंद ‘क्षुद्र’ म्हणून, गॅझेट वाचा, अज्ञानी मागण्या…”, मंगेश ससाणेंचा मनोज जरांगेंना सल्ला

“शरद पवार हे महाजातीयवादी नेते”

पुढे बोलताना, “पवार कुटुंबातील सदस्य रात्री-अपरात्री जाऊन मनोज जरांगे यांना भेटतात, पण ओबीसींच्या आरक्षणाबाबत एकदाही पवार कुटुंबातील कुठं जाताना दिसून येत नाही. त्यामुळे शरद पवार हे महाजातीयवादी आहेत”, अशी टीकाही त्यांनी शरद पवार यांच्यावर केली.

“प्रतिनिधीत्वच दिलं नाही, तर विकास कसा होणार?”

“शरद पवार यांच्या पक्षातील आमदार-खासदाची यादी काढून बघितली तर त्यात घनगर समाजाला प्रतिनिधीत्व नाही. धनगर समाजाने अनेदा त्यांना मतं दिली आहेत. त्याशिवाय एकही खासदार संसदेत जाऊ शकत नाही. मात्र, धनगरांची मत घेऊनही शरद पवार यांनी कधीही त्यांना संपूर्ण प्रतिनिधीत्व दिलेलं नाही. जर प्रतिनिधीत्वच दिलं नाही, तर त्यांचा विकास कसा होणार?” असा प्रश्नही लक्ष्मण हाके यांनी विचारला.

हेही वाचा – Maratha Vs OBC : जालन्यातल्या वडीगोद्रीत मराठा आणि ओबीसी आंदोलक समोरासमोर, घोषणाबाजीनंतर तणावपूर्ण शांतता

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाही केलं लक्ष्य

यावेळी बोलताना लक्ष्मण हाके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही लक्ष केलं. “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन नंबरची कामं करणाऱ्या टोळीचे नेतृत्व करतात. ते आता मुख्यमंत्री पदावर बसले आहेत. त्यांनी फुले शाहू आंबेडकरांच्या दायित्वाची शपथ घेतली आहे. मात्र, ते केवळ एका विशिष्ट जातीचं काम करतात. हा माझा थेट आरोप आहे”, अशी टीका त्यांनी केली.