सातारा : संततधार पावसामुळे आता शेतमालाचे मोठे नुकसान होत असल्याचे समोर येत असून, यामुळे बाजारात सध्या चाकवत, पोकळा, तांदळी अशा भाज्या दिसेनाशा झाल्या आहेत, तर मेथी, पालक, शेपू, कोथिंबीर यांच्या जुड्यांचे दर पन्नास रुपयांच्या घरात गेले आहेत. मिरची, घेवडा, वाघ्या घेवड्याचे दर १२० रुपये किलोच्या घरात गेले आहेत.

ऑगस्ट महिन्यात सलग मुसळधार पाऊस झाल्याने चालू हंगामात तयार होत आलेल्या भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी अतिवृष्टीने शेतातील तयार भाजीपाला सडून गेला आहे. विशेषत: पालेभाज्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतात पाणी साचून राहिल्याने चाकवत, पोकळा, तांदळीसारख्या भाज्या खराब झाल्या आहेत. यामुळे गेल्या आठवडाभरापासून बाजारात भाजीपाल्याची होणारी आवक एकदम घसरली आहे.

साताऱ्यातील बाजारपेठेत गेले काही दिवस चाकवत, पोकळा, तांदळी अशा पालेभाज्या तर दिसेनाशा झाल्या आहेत. टोमॅटो, मिरची, घेवडा पावसामुळे खराब झाल्या असून, त्यांचा दर्जा खालावलेला दिसत आहे. मेथी, पालक, शेपू, कोथिंबिरीची आवकही कमी होत आहे. चांगल्या प्रतीचा भाजीपाला कमी येत असून, त्यासाठी जास्त किंमत मोजावी लागत आहे.

हेही वाचा >>> उजनी धरणाचे पाणी अखेर कुरनूर धरणात पोहोचले; अक्कलकोट, दक्षिण सोलापूर तालुक्यातील ७२ गावांना होणार लाभ

सध्या पालेभाज्यांमध्ये मेथीची जुडी पन्नास रुपये, शेपू चाळीस रुपये, पालक तीस रुपये, तर कोथिंबिरीचा दर जुडीला साठ ते शंभर रुपये झाला आहे. जेवणात महत्त्वाच्या असणाऱ्या पालेभाजांची आवक घटल्याने त्या महाग झाल्या आहेत. आमटीला चव आणणाऱ्या कोथिंबिरीची आवक कमी झाल्याने मंडईत चार-पाच काड्यांच्या वाट्याला चक्क वीस रुपये मोजावे लागत आहेत. मोठ्या आकाराच्या जुडीचा दर शंभरावर पोहोचला आहे.

फळभाज्यांचे दरही वाढले आहेत. घेवडा २० रुपये, तर वाघ्या घेवडा ३० रुपये पावशेर दराने विकला जात आहे. हिरवी मिरची ४० रुपये पावशेर अशी मिळत आहे. गेल्या महिन्यात सलग तीन आठवडे पाऊस पडत होता. त्यामुळे भाज्यांच्या वाढीवर परिणाम झाला, तसेच काही शेतकऱ्यांच्या भाज्यांची उगवणच झालेली नाही. त्यामुळे सध्या जिल्ह्यात सर्वत्र भाज्यांची चणचण भासत आहे. साहजिकच त्यांचे दर वाढले आहेत. विशेषतः पालेभाज्यांची आवक खूपच कमी होत आहे. यामुळे चाकवत, पोकळा, तांदळी अशा पालेभाज्या दिसेनाशा झाल्या आहेत.

हेही वाचा >>> राज्यात अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान…जाणून घ्या कोणत्या जिल्ह्यांत किती नुकसान…

मागील दोन महिने भरपूर पाऊस झाल्याने सध्या बाजारात पालेभाज्यांची आवक कमालीची घटली आहे. येत असलेला भाजीपाल्याची प्रतवारीही चांगली नाही. यामुळे उपलब्ध होणारा भाजीपाला महाग झाला आहे. – दत्तात्रय ऊर्फ बापू जमदाडे, भाजीपाल्याचे घाऊक व्यापारी, सातारा</p>

भाजीपाल्याच्या पैशांमध्ये सध्या दोन दिवसांचीही भाजी विकत घेता येत नाही. पोकळा, पालक आणि तांदूळजासारख्या भाज्या तर बाजारात बघायलाही मिळत नाही. – सुवर्णा पाटील,  ग्राहक, सातारा