Manoj Jarange Patil Martha Morcha Update, 25 January 2024: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील मुंबईत यायला निघाले आहेत. त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न सरकारकडून सुरु झाले आहेत. अशात मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाला जे विरोध करणारे आहेत, ज्यांनी अपमान केला त्यांचा हिशेब चुकता करणार असं म्हटलं आहे. मराठा आरक्षण घेतल्याशिवाय आता मुंबईतून उठणार नाही असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठे शांतच आहेत

आत्तापर्यंत आपण शांततेत आंदोलन केलं आहे. एकाही पोराने गडबड केली नाही, होऊ पण दिलेली नाही. मराठे शांत आहेत, दिलेला शब्द पाळणारे आहोत हे माझ्या मायबाप समाजाने राज्याला सिद्ध करुन दाखवलं. मुंबईतही आम्ही शांततेत जाणार, शांततेच बसणार, गडबड करणार नाही. पण आरक्षण घेतल्याशिवाय उठणार नाही. आम्ही या भूमिकेवर कालही ठाम होतो, आजही ठाम आहे आणि उद्याही ठाम राहणार असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

मुंबईही आपलीच आहे आणि महाराष्ट्रही आपलाच

एकदा मी समाजाला शब्द दिला की मी त्यापासून मागे हटत नाही. आजपासून आपले लोक वाढण्यास सुरुवात होणार आहे हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. २६ जानेवारीला महाराष्ट्रातला सगळा समाज आपल्या मुंबईत येणार आहे. मुंबईकरांना त्रास होणार नाही याची खबरदारी आपल्याला घ्यायची आहे. आता आपल्याला स्वयंसेवक व्हायचं आहे. आजपासून तुमच्या सगळ्यांवरची जबाबदारी वाढली आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं बैठकीचं ती बैठक सुरु झाली आहे. महाराष्ट्रही आमचाच आहे आणि मुंबईही आमचीच आहे असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत. आपला मायबाप समाज एकत्र आहे तो तसाच एकवटलेलाच आहे. पुण्यात मी ती एकजूट पाहिली आपण ज्या रस्त्यावरुन चाललो आहोत त्या रस्त्यावर अख्खा मराठा समाज येतो आहे असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले. आपल्या रॅलीत कुणी जाळपोळ किंवा दगडफेक करण्याचा प्रयत्न केला तर त्याला पकडायचं, पळवून लावायचं नाही. त्याला बोटही लावायचं नाही त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात द्यायचं, तुम्हाला स्वयंसेवक म्हणून हे काम करायचंच आहे असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले.

हे पण वाचा- “जर आमच्या मागण्या मान्य झाल्या तर…”, मनोज जरांगेंनी मांडली पुढची भूमिका; मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला!

कुणी त्रास दिला तर त्याला सोडू नका, माझ्यापर्यंत आणा

मनोज जरांगे पाटील म्हणाले, तुम्हाला कुणी त्रास दिला तर तुम्ही त्याला त्रास देऊ नका, त्याला माझ्यापर्यंत आणा मग मी तुम्हाला दाखवतो. मला विचारल्याशिवाय कुणी कुठलीही कृती करु नका. आपल्या नावाखाली कुणी राजकारण करतो आहे का? काडी लावण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला मी पोलिसाच्या गाडीत उचलून टाकेन. आपल्याला सगळ्यांना शांत राहायचं आहे. मुंबईत शांततेत आंदोलन करायचं आहे. जेवायचं, खायचं आणि झोपायचं आहे, मान्य आहे का? त्यावर गर्दीतून सगळे हो असे ओरडले. माझ्या समाजाने शब्द दिला आहे ते मी सरकारला आता सांगू शकतो असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले. शांततेच्या युद्धात खूप ताकद आहे हे कुणी विसरु नका. आपल्याला आरक्षण पाहिजे आणि आपण शांततेचं युद्ध लढतो आहोत. आरक्षण शेवटच्या टप्प्यात आलं आहे. आत्तापर्यंत ५४ लाख मराठ्यांना आरक्षण मिळालं आहे. त्यांना तातडीने आरक्षण प्रमाणपत्र द्या.

एकदा आरक्षण द्या, विरोध करणाऱ्या सगळ्यांना पाहतोच

मला आरक्षण शांततेत घेऊ द्या. मग विरोध करणाऱ्या एक एकाला पाहतो. आपल्या विरोधकांची वळवळच बंद करतो. ही एकजूट अशीच कायम ठेवा. मी तुमचा शब्द मोडणार नाही, तुम्ही माझा शब्द मोडू नका. शेवटच्या माणसाला आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन बंद होणार नाही. आंतरवलीतलं आंदोलन आजही सुरु आहे. मी सुद्धा अपमान पचवला आहे. सगळ्यांचे हिशेब होणार मात्र आधी आरक्षण मिळाल्यावर. आजूबाजूला लक्ष ठेवा असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Let maratha reservation be taken once we will see every leader who opposes us manoj jarange patil warning scj
Show comments