सोलापूर :  लोकसभा निवडणूकीत तिसऱ्या टप्प्यात राज्यातील प्रमुख लढतीपैकी असलेल्या सोलापूर लोकसभेसाठी ५९.१९ टक्के इतके चुरशीने मतदान झाले. ही लढत  काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे आणि भाजपचे आमदार राम सातपुते यांच्यात थेट लढत झाली. मतदान प्रक्रिया संपल्यानंतर दोन्ही पक्षांनी विजयाबद्दल दावे-प्रतिदावे केले. राजकीय जाणकारांच्या नजरेतूनही ही लढत २५ हजार ते ५० हजार मताधिक्याने कौल देणारी असल्यामुळे खासदारकीची माळ नेमक्या कोणाच्या गळ्यात पडणार, याची सार्वत्रिक उत्सुकता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोलापूर लोकसभा मतदारसंघ पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. मात्र २०१४ नंतर मोदी लाटेत येथील राजकीय परिस्थिती बदलली. यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांना सलग दोनवेळा पराभूत व्हावे लागले होते. त्यानंतर विधानसभा निवडणूकीतही सोलापूरचे चित्र बदलले. येथील सहापैकी पाच  विधानसभेच्या जागा  महायुतीच्या राहिल्या आहेत. तर केवळ एकमेव प्रणिती शिंदे या काँग्रेसच्या आमदार आहेत.

मागील २०१४ आणि २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या विजयाची पुनरावृत्ती करण्याच्या तयारीने भाजप रिंगणात उतरली होती. मात्र पाच आमदार असतानाही भाजपसाठी देखील लढाई सोपी नव्हती.

हेही वाचा >>> सोलापुरात चुरशीने ५९.१९ टक्के मतदान; मोहोळमध्ये सर्वाधिक ६३.१५ टक्के मतदान

सोलापूर लोकसभा मतदार संघात अक्कलकोट, उत्तर सोलापूर, सोलापूर मध्य, सोलापूर दक्षिण, मोहोळ, पंढरपूर-मंगळवेढा या मतदारसंघाचा समावेश होतो. यातील अक्कलकोट, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, पंढरपूर-मंगळवेढा या मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. तर मोहोळमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचा आमदार आहे सोलापूर शहर मध्य मतदारसंघात एकमेव काँग्रेसचा आमदार आहे.

या निवडणुकीत काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांनी उमेदवारी जाहीर होण्याअगोदरच प्रचारात आघाडी घेतली होती. त्यांनी गावागावात जाऊन कोपरा सभा, बैठका आणि जनतेशी थेट संवाद साधण्यावर भर दिला. तर उशिरा उमेदवारी मिळालेले भाजपचे राम सातपुते यांनी दिग्गज नेत्यांच्या सभांवर भर दिला. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी इत्यादी नेत्यांच्या सभांचा समावेश होता. तर काँग्रेससाठी राहुल गांधी यांची एकमेव मोठी जाहीर सभा झाली होती. शेतकऱ्यांचे प्रश्न, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यासह सोलापुरातील पाणी प्रश्न, उद्योग धंद्याचा प्रश्न, सोलापुरातील बेरोजगारी हे मुद्दे मोठ्या प्रमाणात चर्चेत आले. तर भाजपने ही निवडणूक राष्ट्रीय मुद्याकडे देखील वळवण्याचा प्रयत्न केला. धार्मिक धुर्वीकरणाचे राजकारण देखील यंदाच्या निवडणूकीत मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाले. या सर्व बाबींचा थेट परिणाम निकालावर होणार आहे.

हेही वाचा >>> विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना अजित पवारांचे मिश्किल वक्तव्य; म्हणाले, “त्यांची नार्को टेस्ट…”

या निवडणुकीत सोलापूर शहर उत्तर आणि अक्कलकोट हे दोन विधानसभा क्षेत्र भाजपसाठी प्रत्येकी २० हजार ते २५ हजार मतांची आघाडी मिळवून देऊ शकतात, तर सोलापूर शहर मध्य काँग्रेसला मोठा आधार देऊ शकतो, असा राजकीय जाणकारांचा होरा आहे. दक्षिण सोलापूरसह मोहोळ, पंढरपूर-मंगळवेढा येथील मते निर्णायक ठरू शकतात. सोलापुरात लिगांयत आणि मागासवर्गीय समाजाची मोठी संख्या या मतदारसंघात आहे. पद्मशाली समाज भाजपची मतपेढी म्हणून ओळखला जातो. लिंगायत समाजही कायम भाजपच्या बाजूने उभा राहतो. याशिवाय बहुसंख्य ओबीसी समाजही बाजूने असल्यामुळे भाजपला मोठे मताधिक्य मिळण्याबद्दल या पक्षाच्या नेत्यांना विश्वास वाटतो. मात्र लिंगायत समाजात मोठी पकड असलेले धर्मराज काडादी हे यंदा काँग्रेसच्या बाजूने उभे राहिल्यामुळे या मताधिक्यात फरक पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मागील लोकसभा लढतीत झालेल्या भाजपविरोधी मतविभागणी यंदा टळण्याची चिन्हे असून  दलित-मुस्लीम समाजासह मराठा व अन्य समाजाच्या मतदारांवर काँग्रेसची मदार आहे. यात चांगल्या प्रकारे यश मिळाल्याचा काँग्रेसच्या नेत्यांचा विश्वास बळावला आहे. मोहोळ, पंढरपूर-मंगळवेढा भागात मराठा समाज आणि शेतक-यांची संख्या मोठी आहे. याच भागातील मराठा आरक्षण आंदोलन, शेतक-यांचा प्रश्न आदी बाबी भाजपसाठी कितपत मारक ठरू शकतात, यावर त्यांचा जय-पराजय अवलंबून आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lok sabha election 2024 congress and bjp claims victory in solapur zws
Show comments