सातारा: महायुती सरकारला ‘लाडकी बहीण योजने’चा फायदा होत असल्याचे लक्षात येताच आता महाविकास आघाडीकडूनही सत्तेत आल्यावर ही योजना बंद करणार नसल्याचे सांगण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी वाई येथे बोलताना ही योजना सुरू ठेवणार असल्याचा निर्वाळा दिला.

हेही वाचा >>> Sharad Pawar on CM Face : “आमच्यासाठी तो विषय संपला”, मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत शरद पवारांचं विधान चर्चेत!

‘लाडकी बहीण योजने’वर होणाऱ्या खर्चावरून गेल्या काही दिवसांत महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांकडून टीकास्त्र सोडले जात होते. ही योजना आणल्याने राज्याच्या तिजोरीवर संकट तयार झाले असून, या योजनेतून महिला वर्गास खूश करत मते मिळवण्याचा महायुतीचा डाव असल्याची टीका महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून गेल्या काही दिवसांत होत होती. तसेच, आम्ही सत्तेत आल्यावर या योजनेचा आढावा घेऊन ती सुरू ठेवायची की नाही याचा निर्णयही देखील जाहीर केला गेला. यातून महाविकास आघाडी या योजनेच्या विरोधात असल्याचे चित्र सर्वत्र तयार झाले आहे. या पार्श्वभूमीवर पाटील यांनी वरील खुलासा केला आहे.

हेही वाचा >>> Sharad Pawar : जयंत पाटील महाविकास आघाडीचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार? देवेंद्र फडणवीसांच्या आव्हानानंतर शरद पवारांचं सूचक विधान

पाटील म्हणाले, की आमचे सरकार आल्यास आम्ही लाडकी बहीण योजना बंद करणार नाही. उलट दीडऐवजी दोन हजार रुपये आम्ही लाडक्या बहिणींना देऊ, असे जाहीर केले. शिवस्वराज्य यात्रा आज वाई येथे आलेली असताना ते बोलत होते. या वेळी खासदार अमोल कोल्हे, आमदार बाळासाहेब पाटील, शशिकांत शिंदे, डॉ. नितीन सावंत, विजयसिंह पिसाळ, यशराज भोसले, अनिल जगताप, अभिनेत्री अश्विनी महांगडे, वाई तालुकाध्यक्ष दिलीप बाबर आदी उपस्थित होते.