भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांना आता विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवार देण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा बीडमध्ये दारूण पराभव झाला होता. पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन करण्याचा यावे, अशी मागणी बीडमधील जनतेने मागणीही केली होती. त्यानंतर विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने पाच उमेदवारांची घोषणा केली. त्यामध्ये सदाभाऊ खोत, परिणय फुके, योगेश टिळेकर आणि अमित गोरखे आणि पंकजा मुंडे यांचा समावेश आहे.

विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी येत्या १२ जुलै रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. दरम्यान, महायुतीबरोबर असलेले रासपचे नेते महादेव जानकर यांचाही लोकसभा निवडणुकीत परभणी मतदारसंघामधून पराभव झाला. पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेची उमेदवारी देण्यात आली. या अनुषंगाने महादेव जानकरांना राज्यसभेवर घेतलं जाणार का? याबाबत सवाल उपस्थित करण्यात येत होते. यावर आता खुद्द महादेव जानकर यांनीच मोठं विधान केलं आहे. “बहिणीला विधानपरिषद मिळाली, आता भाऊही राज्यसभेवर जाईल, काळजी नाही”, असं सूचक विधान महादेव जानकर यांनी केलं.

हेही वाचा : “देशाचा पंतप्रधानच मोठा बुवा”, हाथरसच्या दुर्घटनेवरून संजय राऊतांची टीका

महादेव जानकर काय म्हणाले?

“देवेंद्र फडणवीस आणि माझे गेल्या २० वर्षांपासून घरगुती संबंध आहेत. देवेंद्र फडणवीस हे माझ्या भावाप्रमाणे आहेत. मी त्यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होतो. त्यामुळे माझा स्वभाव त्यांना माहिती आहे आणि त्यांचा स्वभाव मला माहिती आहे. आज मुंबईतील रासपच्या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी ते आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील येणार होते. मात्र, काही नियोजित कामांमुळे ते येऊ शकले नाहीत. महायुतीमधील तीनही नेत्यांनी माझ्या पक्षाला एक जागा लोकसभेला दिली. त्यामुळे मी त्यांचे आभार मानतो. जनतेनं कौल दिला, त्यामध्ये माझा पराभव झाला. मी पराभव मान्य केला आहे”, असं महादेव जानकर यांनी म्हटलं आहे.

राज्यसभा मिळणार का?

बहिणीला (पंकजा मुंडे) विधानपरिषद मिळाली, आता भावाला (महादेव जानकर यांना) राज्यसभा मिळणार का? असा प्रश्न विचारण्यात आला असता महादेव जानकर यांनी सूचक भाष्य केलं. जानकर म्हणाले, “पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेची उमेदवारी मिळाली. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. बहिण विधानपरिषदेवर आमदार झाल्यानंतर भाऊ (महादेव जानकर) देखील राज्यसभेवर नक्कीच जाईल. काळजी नाही”, असं मोठं विधान महादेव जानकर यांनी केलं.