Opposition Walk Out in Maharashtra Assembly: महाराष्ट्रात एकीकडे सत्ताधारी पक्षांमध्ये कुणाला मंत्रीपद मिळालं, कुणाला नाकारलं याची चर्चा असताना दुसरीकडे विरोधी पक्षांकडून बीड आणि परभणीमधील घटनांवरून सरकारला जाब विचारला जात आहे. नागपूर हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस असून या दोन्ही घटनांवर सभागृहात सविस्तर चर्चा व्हावी, अशी मागणी विरोधकांनी केली. मात्र, ही मागणी मान्य न झाल्यामुळे विरोधकांनी सभात्याग केला. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना काँग्रेस आमदार व माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या दोन्ही घटनांवरून देवेंद्र फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला. तसेच, विरोधी पक्षांचे नेते या दोन्ही ठिकाणचा दौरा करणार असल्याचंही ते म्हणाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“एवढं पाशवी बहुमत लोकांचा जीव घ्यायला दिलंय का?”

विधानसभेत आज कामकाजाची सुरुवात होताच विरोधी पक्षाच्या नेत्यांनी बीड व परभणीतील घटनांवर सविस्तर चर्चेचा मुद्दा उपस्थित केला. मात्र, विरोधकांची ही मागणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी फेटाळल्यामुळे विरोधकांनी सरकारचा निषेध केला. तसेच, आज दिवसभराच्या कामकाजावर विरोधकांकडून बहिष्कार घालण्यात आला. “सत्ताधाऱ्यांना एवढं पाशवी बहुमत लोकांचा जीव घेण्यासाठी दिलंय का? गुंडांना संरक्षण देण्यासाठी दिलंय का? या दोन्ही मागण्या आम्ही केल्या, तर आमचा आवाज दाबला जातो. चर्चेचीही परवानगी दिली जात नाही. त्यामुळे आम्ही सरकारचा निषेध केला आहे. आम्ही सगळे बीड आणि परभणीला जाणार. मोर्चाही काढणार. या सगळ्या प्रकाराचा निषेध म्हणून आम्ही सभात्याग केला आहे”, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.

“परभणीत संविधान शिल्पाचा झालेला अवमान कोणताही संविधानप्रेमी सहन करू शकत नाही. त्याचा उद्रेक तिथे झाला. यानंतर अतिरिक्त पोलीसदल मागवून कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आलं. घराघरातून दलित व्यक्तींना, महिलांना, मुलांना मारहाण करण्यात आली, ही महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी बाब आहे. एक स्पष्ट आहे, तिथे पोलिसांनी आंदोलक सूर्यवंशीला कोठडीत बेदम मारहाण करून त्याची हत्या केल्याचं त्याच्या शरीरावरील जखमांवरून दिसून येत आहे. पोलीस यासाठी जबाबदार नाहीयेत का? त्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करणं चूक आहे का?”, असे सवाल विजय वडेट्टीवार यांनी यावेळी उपस्थित केले.

“…याचा अर्थ दाल में कुछ काला है”

“आम्ही अधिवेशनात याची मागणी करतोय, मग सरकार यावर का घाबरतेय. तातडीनं चर्चेसाठी तयार का होत नाहीये? याचा अर्थ दाल में कुछ काला है. सरकार दलितांवरील अत्याचारांकडे डोळे झाकून दुर्लक्ष करू इच्छित आहे. कुणी मरो, वाचो याचं काहीही देणंघेणं सरकारला नाहीये”, अशा शब्दांत विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला.

Beed: “बीड आणि परभणीत काय घडलं याचं उत्तर देवेंद्र फडणवीस..”, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य

“एवढं भीषण कृत्य कधीही पाहिलं नाही”

“बीडमध्ये एक गुंड सरकार व मंत्र्यांच्या संरक्षणात खुलेआम धमक्या देतो. तिथे सरपंचाला ज्या क्रूरपणे मारहाण करण्यात आली, त्याची हत्या करण्यात आली, एवढं भीषण कृत्य मी कधी पाहिलं नाही. लायटरनं त्याचे डोळे जाळले गेले. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या मृतदेहावर उड्या मारून नाचण्यात आलं. हे काय चाललंय महाराष्ट्रात? हे काय बघतोय आपण?” असा जाब वडेट्टीवार यांनी सरकारला विचारला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra assembly winter session opposition walkout on beed parbhani incidents pmw