Maharashtra Bandh : बदलापूरमध्ये घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्यावतीने उद्या (२४ ऑगस्ट) रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. मात्र, या महाराष्ट्र बंदच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर उच्च न्यायालयात आज (२३ ऑगस्ट) सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने हा बंद बेकायदेशीर असल्याचं स्पष्ट करत राजकीय पक्षाला कोणत्याही प्रकारे महाराष्ट्र बंद करण्याचा अधिकार नाही, असं न्यायालयाने स्पष्ट केलं.

दरम्यान, यानंतर महाविकास आघाडी नेमकी काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक्सवर (ट्विटर) पोस्ट करत उद्याचा महाराष्ट्र बंद मागे घेण्याचं आवाहन केलं आहे.

शरद पवारांनी काय म्हटलं?

“बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर उद्या दि.२४ ऑगस्ट २०२४ रोजी राज्यव्यापी सार्वजनिक बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्या दोन अजाण बालिकांवर झालेला अत्याचार हा अतिशय घृणास्पद होता. परिणामी समाजातील सर्व स्तरांतून याबाबतीत तीव्र लोकभावना उमटल्या. या बाबीकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा हा प्रयत्न होता. हा बंद भारतीय राज्यघटनेच्या मुलभूत अधिकारांच्या कक्षेत होता. तथापि मुंबई उच्च न्यायालयाने सदर बंद घटनाबाह्य असल्याचा निर्वाळा दिला आहे. सदर निर्णयाविरूद्ध सर्वोच्च न्यायालयात तातडीने दाद मागणे वेळेच्या मर्यादेमुळे शक्य नाही. भारतीय न्यायव्यवस्था संविधानात्मक संस्था असल्याने संविधानाचा आदर राखून उद्याचा बंद मागे घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे”, असं शरद पवार यांनी एक्सवर (ट्विटर) म्हटलं आहे.

नाना पटोले काय म्हणाले?

महाविकास आघाडीच्यावतीने उद्या (२४ ऑगस्ट) रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली. मात्र, न्यायालयाच्या निर्णयानंतर शरद पवार यांनी उद्याचा बंद मागे घेण्याचं आवाहन केलं आहे. यानंतर नाना पटोले यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “उच्च न्यायालयाच्या आदेशाचा आदर करून आम्ही उद्या काळा झेंडा घेऊन आणि तोंडाला काळी पट्टी बांधून आम्ही उद्या सकाळी ११ वाजता आंदोलन नाही मात्र आम्ही एकत्र बसू. यामध्ये आम्ही न्यायालयाचा आदर करू. यासंदर्भातील सूचना आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात दिलेल्या आहेत. न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाचा विरोध करण्याचं काहीही कारण नाही”, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीच्यावतीने उद्या (२४ ऑगस्ट) रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली. मात्र, न्यायालयाच्या निर्णयानंतर शरद पवार यांनी उद्याचा बंद मागे घेण्याचं आवाहन केलं. यानंतर आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.

Story img Loader