Marathi News Today : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मंगळवारी 'लोक माझे सांगाती' या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात पक्षाचं अध्यक्षपद सोडत असल्याचा निर्णय जाहीर केला. त्यांच्या या निर्णयाने सगळ्यांनाच धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि पदाधिकारी तसंच कार्यकर्ते या सगळ्यांनीच त्यांना असं करु नका म्हणून आवाहन केलं. मात्र शरद पवार यांनी निर्णय मागे घेतला नाही. दोन ते तीन दिवसात विचार करुन निर्णय कळवतो असं त्यांनी सांगितलं आहे. या सगळ्या घडामोडींचे विविध राजकीय अर्थ काढले जात आहेत. तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याबाबत सावध प्रतिक्रिया दिली आहे. तर संजय राऊत यांनी आपण लवकरच शरद पवारांची भेट घेऊ असं म्हटलं आहे. अजित पवार यांनी शरद पवारांच्या राजीनाम्याचं समर्थन केलं आहे. आता या सगळ्या घडामोडींसोबत महाराष्ट्रात काय काय घडणार आहे? हे आपण लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.