उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी १० मार्चला राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात आज फडणवीस सरकारने अनेक मोठ्या घोषणा केल्या. सगळ्यांचं लक्ष लागलेल्या लाडकी बहीण योजनेबाबतही अजित पवारांनी घोषणा केली.

काय म्हणाले अजित पवार?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत सुमारे २ कोटी ५३ लाख लाभार्थी महिलांना जुलै २०२४ पासून आर्थिक लाभ देण्यात येत आहे. त्यासाठी ३३ हजार दोन कोटी रुपये खर्च झाला आहे. सन २०२५-२०६ मध्ये या योजनेकरीता एकूण ३६ हजार कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित आहे. या योजनेतून मिळणाऱ्या अनुदानाचा उपयोग काही महिला गटांनी आर्थिक उपक्रमासाठी बीज भांडवल म्हणून केला असून अशा गटांना आणखी प्रोत्साहन देण्यासाठी विशेष योजना हाती घेण्याचे विचाराधीन असल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलं. दादा, २१०० रुपये कधीपासून देणार असं विचारलं असता अजित पवार म्हणाले जरा थांबा असं म्हणत त्यांनी प्रश्नकर्त्यांना शांत केलं.

आम्ही कुणालाही वंचित ठेवलेलं नाही-अजित पवार

आम्ही कुठल्या घटकाला वंचित ठेवलेलं नाही असंही अजित पवार म्हणाले आहेत. लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारने आणखी एक मोठी घोषणा केली आहे. लाडक्या बहिणींसाठी टेक कंपनी मायक्रोसॉफ्ट सोबत राज्य सरकार करार करणार आहे. या कंपनीच्या माध्यमातून हजारो महिलांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे म्हणजे एआयचे प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली.

लाडक्या बहिणी अन् मुलींसाठी काय काय?

मुलींच्या व्यावसायिक शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काची १० टक्के प्रतिपूर्ती करण्यात येत आहे. मान्यताप्राप्त उच्च आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेणाऱ्या आणि ज्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ८ लाख रुपयांपेक्षा कमी आहे, अशा विद्यार्थिनींना हा लाभ देण्यात येत असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

आणखी काय म्हणाले अजित पवार

लाडक्या बहिणी मिळाल्या धन्य झालो, केली विकासाची कामे म्हणून आम्ही पुन्हा आलो.. पुन्हा आलो.. असे म्हणत लाडक्या बहि‍णींच्या आशीर्वादामुळेच राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार आल्याचं अजित पवार यांनी सूचवलं. महाराष्ट्र आता थांबणार नाही, विकसित भारत, विकसित महाराष्ट्राचे लक्ष्य ठेऊन महाराष्ट्र विकासाचे काम हाती घेण्यात आलं आहे. महाराष्ट्रात देशी व विदेशी गुंतवणूक आकर्षित होत आहे. १४ लाख ७२ हजार ६५४ कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात होत आहे. त्यातून, लाखो रोजगार निर्मित्ती होणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितलं. राज्य सरकारचा १०० दिवसांचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. प्रशासन कार्यक्षम होईल यात शंका नाही. राज्याचे नवीन औद्योगिक धोरण जाहीर होईल ५० लाख नोकऱ्यांचा उद्देश सरकारच्या समोर असेल, असे अजित पवार यांनी म्हटले. तसेच, स्वतंत्र शेती धोरण जाहीर करणार आहोत, अशी माहिती देखील त्यांनी दिली.

Story img Loader