Maharashtra Budget Session 2024 , 28 February 2024 : महाराष्ट्र विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवशेनाचा आज तिसरा दिवस आहे. आज विधानसभेत विरोधक आणि सत्ताधारी यांचा प्रस्ताव सादर केला जाणार आहे. सत्ताधाऱ्यांकडून सरकारच्या मागच्या दीड वर्षांतील कामांची उजळणी केली जाईल तर विरोधक शेतकऱ्यांचे प्रश्न, गारपीट, दुष्काळाची परिस्थिती याकडे सरकारचे लक्ष वेधतील. दरम्यान आज सायंकाळी यवतमाळमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची जाहीर सभा होत असून ते या सभेतून लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा श्रीगणेशा करतील. त्यामुळे सरकारचे संपूर्ण मंत्रिमंडळ या सभेला उपस्थित राहणार असल्याचे बोलले जाते. यासह राज्यातील अनेक महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्या.
Mumbai Maharashtra News Updates
किसान सन्मान निधीचं वाटप केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांना संबोधित केलं. यावेळी मोदी म्हणाले, एनडीए सरकारच्या काळात देशात मोठा विकास झाला आहे. परंतु, याआधीच्या सरकारच्या काळात काय होत होतं ते एकदा आठवून पाहा. आज जी इंडी आघाडी तयार झाली आहे, यांचंच याआधी केंद्रात सरकार होतं. तेव्हा देशाची स्थिती काय होती ते आठवून पाहा. तेव्हाचे कृषीमंत्रीदेखील या महाराष्ट्राचे होते. त्या वेळी दिल्लीमधून विदर्भाच्या शेतकऱ्यांच्या नावाने पॅकेज घोषित केलं जायचं. परंतु, ते पॅकेज मध्येच लुटलं जात होतं.
पिंपरी : समाजमाध्यमातील ‘इंस्टाग्राम’वरून मैत्री झालेल्या तरुणीने तरुणाला संदेश करून भेटायला बोलाविले आणि….
नागपूर : भारतीय जनता पक्षाची युवा शाखा भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय अधिवेशन येत्या ४ मार्चला नागपुरात आयोजित करण्यात आले असून त्याला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा उपस्थित राहणार आहेत.
पुणे : मराठा आरक्षणाचा प्रश्न शांततेत सोडविण्याऐवजी मराठा आणि ओबीसी समाजात वाद निर्माण केले जात आहेत. मराठा समाजाचे आंदोलन दडपले जाऊ नये, यासाठी निवडणूक लढविली पाहिजे, असा सल्ला वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबडेकर यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिला.
छत्रपती संभाजीनगर : धाराशिव आणि लातूर जिल्ह्यातील औसा मतदारसंघातील लिंगायत मतांवर प्रभाव असणाऱ्या बसवराज पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या भाजप प्रवेशाचा काँग्रेसवर कितपत प्रभाव पडणार याची आता चर्चा सुरू झाली आहे.
चंद्रपूर: भद्रावती तालुक्यातील तेलवासा येशील बंद असलेल्या कोळसा खाणीतून विक्रीसाठी कोळसा काढत असताना ढिगाऱ्याखाली दबून एका चाळीस वर्षीय इसमाचा मृत्यू झाला. रवींद्र पाटील (४०) रा. पिपरी देशमुख असे या मृत इसमाचे नाव आहे.
कल्याण : कल्याण डोंबिवली पालिकेच्या नगररचना विभागातील भूमापक बाळू बहिराम, आरेखक राजेश बागुल यांना प्रशासनाने बुधवारी पालिका सेवेतून निलंबित केले.
मोदींच्या नेतृत्वात 'एनडीए इसबार ४०० पर और महाराष्ट्र में महायुती ४५ पार' हा आमचा निर्धार आहे - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्य सरकारने लेक लाडकी, महिलांना एसटीत ५० टक्के सवलत अशा अनेक योजना सुरू केल्या. या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणाचा आपण प्रयत्न करत आहोत. मोदी म्हणाले की फक्त चारच जाती आहेत. महिला, युवा, शेतकरी आणि गरीब. या चारही जातींना समर्पित आजचा कार्यक्रम आहे. कारण आज शेतकरी सन्मान योजना व नमो शेतकरी महासन्मान योजना या दोन्ही योजना मिळून ४ हजार ७०० कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग होणार आहेत. आज मोदी आवास योजनेची सुरुवात होत आहे. महाराष्ट्रातील ओबीसी, भटके विमिक्त १० लाख कुटुंबांना या योजनेअंतर्गत स्वत:चं घर दिलं जाणार आहे. नारी शक्ती वंदना असल्यामुळे आम्ही प्रयत्न करणार आहोत की त्या प्रत्येक घरात घराच्या पुरुषासोबत महिलेचं नाव मालकी हक्कात असलंच पाहिजे. कारण मोदी आवास असेल तर महिलांना ते मिळालंच पाहिजे असा प्रयत्न आम्ही करणार आहोत - देवेंद्र फडणवीस</p>
सांगली : चिथावणीखोर वक्तव्य करून राज्यातील ब्राम्हण समाजाच्या हत्याकांडाची धमकी दिल्याबद्दल अज्ञात व्यक्तीविरोधात बुधवारी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. समाज माध्यमावरील एका वाहिनीवरून अज्ञाताने आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाच्या सांगली शाखा व ब्राम्हण सभा यांच्यावतीने बुधवारी ही तक्रार देण्यात आली आहे.
तथाकथित गावरान विश्लेषक या चॅनलवर मराठा आरक्षण आंदोलनातील काही व्यक्तींच्या प्रतिक्रिया घेतल्या जात होत्या. सदर चित्रफितीमध्ये एका अज्ञात व्यक्तीने अख्या ब्राह्मण समाजाला तीन मिनिटात संपवून टाकू अशी जाहीर धमकी दिली. त्याबरोबरच त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही एकेरी शब्दात असभ्य भाषेत टीका केली. या वादग्रस्त चित्रफितीमुळे ब्राह्मण समाजामध्ये भीतीचे व चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी संबंधित व्यक्तीविरोधात कठोर कारवाई करण्याची आग्रही मागणी करण्यात आली.
अमरावती : भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील सैनिकाचा जागीच मृत्यू झाला. एक जखमी झाला. हा अपघात बुधवारी २८ फेब्रुवारी रोजी दुपारी गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीतील रहाटगाव चौक परिसरात घडला. जखमीवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
कल्याण : कल्याण डोंबिवली पालिकेच्या नगररचना विभागातील दोन कर्मचाऱ्यांच्या अटकेनंतर या प्रकरणाशी येथील तालुका भूमिअभिलेख कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांचा काही सहभाग आहे का. डोंबिवलीतील विकासक विनोद किसन म्हात्रे यांनी पालिका नगररचना विभागात दाखल केलेल्या इमारत आराखडा प्रस्तावात भूमिअभिलेख विभागाचा बनावट नकाशा, तेथील अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या, शिक्के यांचा सहभाग आढळून आला आहे.
अलिबाग : वारेमाप मासेमारीमुळे भारतीय किनाऱ्यावर आढळणाऱ्या ६५ पैकी ३५ मत्स्यप्रजाती संकटात सापडल्या आहेत. ही बाब लक्षात घेऊन, मत्स्य संवर्धनासाठी कोकण किनारपट्टीवर समुद्रात १२१ ठिकाणी कृत्रिम भिंत्तिकांची उभारणी केली जाणार आहे. समुद्राच्या तळाशी शास्त्रोक्त पध्दतीने या भित्तिका उभारणीचे काम सुरू करण्यात आले आहे.
वसई- वसई विरार मधील नागरिकांना यापुढे विविध दाखले तसेच परवाने घेण्यास पालिकेत जाण्याची गरज पडणार नाही. पालिकेने एकूण ५१ सेवा ऑनलाईन उपलब्ध करून दिल्या आहेत. यासाठी सेवा हमी कायदा (राईट टू सर्व्हिस) संगणक प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे.
वसई- वसई- भाईंदर रोरो सेवेला आठवडा पूर्ण झाला असून नागरिकांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. नागरिकांना या रोरो सेवेचा अधिकाअधिक लाभ घेता यावा यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाने प्रवासी कर पुढील एक वर्षासाठी माफ केला आहे. त्यामुळे वाजवी दरात नागरिकांना रोरो सेवेचा आनंद घेता येणार आहे.
पुणे : पुण्यात वैद्यकीय उपचारासाठी आलेल्या आखाती देशातील नागरिकांना लुटणाऱ्या दिल्लीतील चोरट्यांना पोलिसांनी पकडले. अटक करण्यात आलेली चोरटे इराणी टोळीतील असून, ते अरबी भाषेत आखाती देशातील नागरिकांशी संवाद साधत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
नागपूर : भारत सरकारद्वारे देशभरात विमानसेवेचे जाळे विणण्याच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून छोट्या विमानसेवेद्वारे लहान शहरात ‘कनेक्टिव्हीटी’ वाढवणाऱ्यावर भर दिला जात आहे. परंतु, महाराष्ट्राची राजधानी आणि उपराजधानीमध्ये प्रवाशांची संख्या गेल्या काही वर्षांत कैकपटीने वाढूनदेखील येथे विमानांची संख्या आणि नवीन विमान कंपन्यांची सेवा वाढवण्यात येत नसल्याचे चित्र आहे. परिणामी, एका कंपनीची मक्तेदारी निर्माण होत आहे.
कोल्हापूर: इचलकरंजी शहरासाठी मंजूर सुळकूड पाणी योजनेचे अंमलबजावणी करावी या मागणीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व समाज कल्याण मंत्री सुरेश खाडे खाडे यांना रविवारी, सोमवारी इचलकरंजीत काळे झेंडे दाखवण्यात येणार असून त्यांच्यासमोर निदर्शने केली जाणार आहेत. असा निर्णय आज सुळकुड पाणी योजना कृती समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
अकोला : महापालिकेच्या शाळेतील पोषण आहारामध्ये चक्क उंदराचे शेपूट आढळल्याचा धक्कादायक प्रकार शहरात घडला आहे. या प्रकारामुळे सुमारे दहा विद्यार्थ्यांना विषबाधा सदृश्य लक्षणे आढळल्याने त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले.
अकोला : शेयर मार्केटमधून पाच ते दहा हजार नफा कमवून देण्याचे आमिष दाखवून शहरातील एका वयोवृद्ध डॉक्टरची तब्बल ६४.५० लाख रुपयांनी ऑनलाइन फसवणूक केल्याचा प्रकार घडला.
गडचिरोली : जिल्ह्यात प्रस्तावित लोहप्रकल्पासाठी चामोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यासाठी शासनाने नोटीस काढली आहे. त्याकरिता मंगळवारी पोलिसांचा मोठा फौजफाटा घेऊन जमीन मोजणीसाठी गेलेल्या उपविभागीय अधिकारी व महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना गावकऱ्यांनी परतून लावल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. मुधोलीचक क्र. १ या गावातील ही घटना असून नागरिकांचा उद्योगासाठी जमीन देण्यास विरोध आहे.
नवी मुंबई : शहरात अनेक ठिकाणच्या पदपथांवर पथदिव्यांच्या वायरी तसेच विविध ठिकाणी ऑप्टीकल फायबर टाकल्यानंतरचे वेटोळे तसेच उघड्यावर पडलेले दिसत असल्याने पादचाऱ्यांना चालताना अडचणी येतात. वीजप्रवाह सुरू राहिल्याने विजेचा धक्का लागण्याच्या अनेक घटना समोर आल्या असल्या तरी महापालिकेचे याकडे दुर्लक्ष होत आहे.
कल्याण - कल्याण डोंबिवली पालिका परिसरात एकत्रित परिवहन प्राधिकरण मंंडळाच्या माध्यमातून बस सेवा उपलब्ध करून देण्याच्या हालचाली सुरू आहेत, अशी माहिती कल्याण डोंबिवली पालिका आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांनी मंगळवारी कल्याण डोंबिवली पालिका परिवहन उपक्रमाचा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर माध्यमांना दिली.
वर्धा : आंतरराष्ट्रीय स्तरावर दरवर्षी पक्षीगणना होते. ती ग्रेट बँकयार्ड बर्ड काउन्ट म्हणून ओळखल्या जात असते. त्याचे औचित्य साधून पक्षी निरीक्षकांनी मोहीम राबविली होती. देशातील ३७ राज्यांनी त्यात भाग घेतला. ३८९ पक्षी प्रजातीसह महाराष्ट्र पाचव्या स्थानावर आला. तर राज्यात वर्धा जिल्हा १३ व्या स्थानावर आहे.
पुणे : सिंहगड रस्त्यावरील दांडेकर पूल आणि संगमवाडी यथील बिंदूमाधव ठाकरे चौकात ग्रेड सेपटरेटर आणि उड्डाणपूल उभारण्याच्या अनुषंगाने सल्लागार नियुक्त करण्यात येणार आहे.
जळगाव : परवाना नूतनीकरणासाठी १५ हजार रुपयांची लाच स्वीकारणार्या जळगाव जिल्ह्यातील उद्योग ऊर्जा व कामगार विभागातील विद्युत निरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकला.
नागपूर : गेल्या काही महिन्यांपासून शहरात गुन्हेगारांकडून पिस्तूलांचा वापर वाढला असून दर आठवड्यात आरोपींकडे पिस्तूल सापडल्याचे गुन्हे दाखल होत आहे. अशाच प्रकारे सोमवारीसुद्धा संशयावरून पकडलेल्या एका आरोपीच्या खिशातूनच चक्क पिस्तूल निघाल्याने पोलीस यंत्रणेत खळबळ उडाली आहे. तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला.
मुंबई : मागील काही दिवस कमाल आणि किमान तापमानात वाढ होत असून पहाटे गारवा त्यानंतर दिवसभर उकाडा अशा वातावरणाचा मुंबईकरांना सामना करावा लागत आहे. मुंबईमध्ये बुधवारी आणि गुरुवारी तापमान ३७ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यवतमाळ दौऱ्यावर असून त्यांची आज सभा होत आहेत. या सभेसाठी ४३ एकर जमिनीवर मंडप उभारण्यात आला आहे. दोन लाख खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. या अतिभव्य सभेसाठी १२ कोटी ७३ लाखांचा खर्च करण्यात आल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. जनतेच्या पैशातूनही अधळपट्टी कशासाठीही अशी टीका काँग्रेसने केली आहे.
https://twitter.com/INCMaharashtra/status/1762738548216566077
मुंबई : शास्त्रीय संगीत, नृत्य, नाटक अशा विविध कलाक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या देशभरातील कलाकारांना दरवर्षी संगीत नाटक अकादमी प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित केले जाते. २०२२-२३ वर्षासाठीचे संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर झाले असून नुकतेच महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवण्यात आलेल्या ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे.
महाराष्ट्र अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२४ लाइव्ह (फोटो - लोकसत्ता ग्राफिक्स टीम)