Maharashtra Budget Session 2024 , 28 February 2024 : महाराष्ट्र विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवशेनाचा आज तिसरा दिवस आहे. आज विधानसभेत विरोधक आणि सत्ताधारी यांचा प्रस्ताव सादर केला जाणार आहे. सत्ताधाऱ्यांकडून सरकारच्या मागच्या दीड वर्षांतील कामांची उजळणी केली जाईल तर विरोधक शेतकऱ्यांचे प्रश्न, गारपीट, दुष्काळाची परिस्थिती याकडे सरकारचे लक्ष वेधतील. दरम्यान आज सायंकाळी यवतमाळमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची जाहीर सभा होत असून ते या सभेतून लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा श्रीगणेशा करतील. त्यामुळे सरकारचे संपूर्ण मंत्रिमंडळ या सभेला उपस्थित राहणार असल्याचे बोलले जाते. यासह राज्यातील अनेक महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्या.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Mumbai Maharashtra News Updates
पुणे : संगमवाडी येथे महापालिकेच्या माध्यमातून साकारण्यात येणाऱ्या आद्यक्रांती गुरू लहूजी वस्ताद साळवे स्मारकाच्या भूमीपूजनाची घोषणा राज्य शासनाकडून करण्यात आली आहे.
नाशिक : राज्य सरकारशी चर्चा निष्फळ ठरल्यानंतर बुधवारी आदिवासी शेतकरी, शेतमजुरांनी आक्रमक भूमिका घेत जिल्हाधिकारी कार्यालयाची घेराबंदी अधिक भक्कम करत अधिकारी आणि नागरिकांचा प्रवेश रोखला. यामुळे या कार्यालयात प्रवेश करणे अवघड झाले.
ठाणे : मुंबई नाशिक महामार्गावरील भिवंडी येथील सोनाळे भागात बुधवारी टँकरचा कारला धक्का लागल्याने कार चालकाने तो टँकर भर रस्त्यात अडवून टँकरची किल्ली काढली. त्यानंतर तो कार चालक किल्ली घेऊन निघून गेला. या प्रकारामुळे टँकर रस्त्याच्या मध्येच उभा होता. त्यामुळे महामार्गावर तीन तास कोंडी झाली. याप्रकरणाची ठाणे ग्रामीण पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून टँकर चालकाच्या तक्रारीनंतर भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नागपूर : पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र सिंगल शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी स्वत: रस्त्यावर उतरले आहे. त्यांनी चक्क एका कुख्यात गुंडाला पकडले.
मुंबई : काळा चौकी येथील अभ्युदय नगर वसाहतीचा पुनर्विकास ‘कन्स्ट्रक्शन आणि डेव्हलपमेंट एजन्सी’मार्फत करण्याच्या महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. अभ्युदय नगरसह आदर्श नगर (वरळी) आणि वांद्रे रेक्लमेशन वसाहतीचा पुनर्विकास करण्याचा एकत्रित प्रस्ताव म्हाडाने सादर केला होता. मात्र त्याऐवजी फक्त अभ्युदय नगर वसाहतीच्या पुनर्विकासाला मान्यता देण्यात आली आहे.
पुणे : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या १६ व्या हप्त्यापोटी दोन हजार रुपये आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्यापोटी चार हजार, असे एकूण प्रति शेतकरी सहा हजार रुपये आज, बुधवारी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहेत.
नगरः महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामधील जागावाटप अद्याप जाहीर झाले नसले तरी नगरमध्ये उभय बाजूंनी निवडणुकीची पूर्वतयारी जय्यत सुरु आहे. दोन्ही बाजूंच्या घटक पक्षांत संघटीतपणा निर्माण करण्याचा प्रयत्न होत असला तरी महाविकास आघाडीच्या तुलनेत महायुतीत त्याचा अभाव अधीक दिसतो, असेच सध्याचे नगर जिल्ह्यातील चित्र आहे. राज्यातील सत्ताधारी महायुतीचे नगर जिल्ह्यातील चित्र एकत्रितपणाचे नाही, हेच ठळकपणे समोर येत आहे.
नागपूर : कंत्राटी वीज कामगारांच्या संयुक्त कृती समितीने कामगारांच्या मागण्यांसाठी २८ फेब्रुवारीपासून दोन दिवस तर ५ मार्चपासून बेमुदत कामबंदची हाक दिली आहे. कामगार आयुक्तांच्या उपस्थितीत कामगार संघटना व तिन्ही कंपन्यांची सोमवारी झालेली बैठक निष्फळ ठरली. त्यामुळे मंगळवारी (२७ फेब्रुवारी) मध्यरात्री १२ वा. पासून कंत्राटी कामगार संपावर गेले आहेत.
पुणे : संपूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानातून उभारलेल्या ‘जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप’ (जीएमआरटी) या महाकाय रेडिओ दुर्बिणीचा जगातील ३८ देशांतील शास्त्रज्ञांकडून संशोधनासाठी वापर केला जात आहे.
धुळे : विद्यार्थ्याला एखाद्या प्रश्नाचे उत्तर देता न येणे, यात काहीही विशेष नाही. परंतु, धुळे जिल्ह्यात अधिकाऱ्यांनी घेतलेल्या तोंडी परीक्षेत जेव्हा शाळेच्या मुख्याध्यापकालाच कोणतेही उत्तर देता आले नाही, तेव्हा सर्वच चकित झाले. त्यामुळे शेवटी जे व्हायचे तेच झाले.
पिंपरी : शासकीय किंवा महापालिकेची नोकरी मिळविणे तरुण-तरुणीचे स्वप्न असते. लिपिक पदाच्या परीक्षेत १८० जण उत्तीर्ण होऊनही आत्तापर्यंत १२४ जणांनी महापालिकेची नोकरी स्वीकारली आहे. तर, ५६ जणांनी अद्याप नोकरी स्वीकारलेली नाही.
नागपूर: नगर रचना व मूल्यनिर्धारण विभागातील शिपाई (गट-ड) संवर्गातील १२५ रिक्त पदे ऑनलाईन परीक्षेद्वारे भरण्यासाठी टीसीएस या संस्थेच्या माध्यमातून २५ नोव्हेंबर रोजी राज्यातील ३६ जिल्ह्यातील ५४ केंद्रांवर परीक्षा आयोजित करण्यात आली होती.
ठाणे : ठाणे रेल्वे स्थानकात प्रवाशांच्या तुलनेत पादचारी पुल तुलनेने कमी असल्याने आता पादचारी पुलांवर प्रवाशांच्या गर्दीचा कडेलोट होत आहे. दररोज प्रवाशांची एकमेकांसोबत रेटारेटी होत असल्याने अनेकदा प्रवाशांचे एकमेकांसोबत वादाचे प्रसंग उद्भवत आहे. त्यामुळे एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकातील घटनेची पुनरावृत्ती होते का असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे.
ठाणे : ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने चरस या अमली पदार्थांपासून तयार केले जाणार हॅश तेल विक्री करणाऱ्या चार जणांना अटक केली आहे. अभिजीत भोईर (२९), पराग रेवंडकर (३१), सुरेंद्र अहिरे (५४) आणि राजु जाधव (४०) अशी अटकेत असलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून दीड कोटी रुपयांचा हॅश तेल जप्त केला आहे.
पुणे : सासवड परिसरातील कोडित गावात कांद्याच्या शेतीत अफूची लागवड करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने कारवाई करून दोघांना ताब्यात घेतले.
पुणे : मेफेड्रोन तस्करी प्रकरणात पुणे पोलिसांच्या पथकाने पश्चिम बंगालमधील मालदा येथून एकाला ताब्यात घेतले. अमली पदार्थ तस्कर संदीप धुनिया याच्या संपर्कात पश्चिम बंगालमधील संशयित आरोपी असल्याचे आढळून आले आहे. सुनील बर्मन असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.
Leap Year 2024 : २९ फेब्रुवारी २०२४ हे लीप वर्ष आहे. कारण या वर्षी फेब्रुवारी महिन्यात २८ ऐवजी २९ दिवस असतील. दर ४ वर्षांनी हा दिवस येतो. २०२४ हे वर्ष ३६५ ऐवजी ३६६ दिवसांचे आहे अशी माहिती खगोल अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी दिली.
मुंबई : शीव कोळीवाडा, जीटीबी नगर येथील सिंधी निर्वासितांच्या २५ इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. मोतीलालनगर पुनर्विकासाच्या धर्तीवर म्हाडाच्या माध्यमातून या इमारतींचा पुनर्विकास करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली असून यासंबंधीचा शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला आहे.
पुण्यातील सर्वपक्षीय राजकारणी भित्रट आहेत. याचे कारण शहराच्या पाणीपुरवठ्यात कपात करण्याची त्यांना भीती वाटते. पाणीकपात केली, तर मतदार नाराज होतील आणि त्याचा निवडणुकीत फटका बसेल, अशी शंका त्यांच्या मनात घेर धरून बसली आहे.
मनोज जरांगे यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर मनोज जरांगे आक्रमक झाले आहेत. सरकारने शिष्टमंडळ पाठवून आमची फसवणूक केली आहे. आज देऊ, उद्या देऊ, अशी आश्वासने आम्हाला देण्यात आली होती. यामध्ये राज्याचे मंत्री, अधिकारी आणि मुख्यमंत्र्यांचे ओएसडी आहेत. या सर्वांवर आम्ही महाराष्ट्रभर गुन्हे दाखल करू. आम्हाला जर ते कायदेशीर कचाट्यात घेणार असतील तर आम्हीही त्यांना कायदेशीर अडचणीत आणू, अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी मांडली आहे.
महाराष्ट्र अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२४ लाइव्ह (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)