मुंबई : ‘स्वच्छ सर्वेक्षण अभियान’मध्ये महाराष्ट्राने सर्वाधिक ४५ पुरस्कार पटकावून देशात अव्वल स्थान मिळविले आहे. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या राज्यांच्या यादीत महाराष्ट्राला तिसरे स्थान मिळाले. नवी दिल्लीत बुधवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
विज्ञान भवनातील समारंभात ‘स्वच्छ सव्र्हेक्षण-२०१९’चे निकाल घोषित करण्यात आले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते १० पुरस्कारांचे वितरण या वेळी करण्यात आले. महाराष्ट्राला उत्कृष्ट (बेस्ट परफॉर्मिग स्टेट) राज्यांत तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, महाराष्ट्र राज्य स्वच्छ भारत अभियानाच्या कार्यकारी संचालक सीमा ढमढेरे, राज्य अभियान संचालक जयंत दांडेगावकर व सुधाकर बोबडे यांनी राज्याच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला. या अभियानात राज्यातील २७ शहरे कचरामुक्त ठरली आहेत. यामध्ये मूल, वैजापूर, वसई विरार, मिरा-भाईंदर, नवी मुंबई, खोपोली, जुन्नर, लोणावळा, सासवड, भोर, इंदापूर, संगमनेर, परळी, पंढरपूर, महाबळेश्वर, पाचगणी, रत्नागिरी, पन्हाळा, वडगाव, कोल्हापूर, विटा, तासगाव, कोरेगाव या शहरांचा समावेश आहे. या अभियानात नवसंकल्पनांचा प्रभावी वापर केल्याबद्दल राजधानी शहरांसाठी असलेला स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार मुंबई महापालिकेस देण्यात आला.
पहिल्या शंभरांत राज्यातील २४ शहरे
या अभियानात सवरेत्कृष्ट कामगिरी केलेल्या पहिल्या १०० शहरांमध्ये राज्यातील २४ शहरे आहेत. या शहरांमध्ये नवी मुंबई (७), कोल्हापूर (१६), मीरा-भाईंदर (२७), चंद्रपूर (२९), वर्धा (३४), वसई-विरार (३६), पुणे (३७), लातूर (३८), सातारा (४५), पिंपरी-चिंचवड (५२), उदगीर (५३), सोलापूर (५४), बार्शी (५५), ठाणे (५७), नागपूर (५७), नांदेड-वाघाळा (६०), नाशिक (६७), अमरावती (७४), जळगाव (७६), कल्याण-डोंबिवली (७७), पनवेल (८६), अचलपूर (८९), बीड (९४) व यवतमाळ (९६) या शहरांचा समावेश आहे.