दूध संकलन केंद्रांवर दूध तपासणीसाठी वापरण्यात येणाऱ्या सदोष मिल्कोमीटर व वजन काट्यांच्या विरोधात किसान सभेने आंदोलन सुरू केलं. तसेच या माध्यमातून शेतकऱ्यांची मोठी लूटमार केली जात असल्याचा आरोप केला. किसान सभेने या विषयावर वारंवार पाठपुरावा करत आंदोलन सुरूच ठेवले. यानंतर या पाठपुराव्याला यश मिळालं आहे. राज्य सरकारने दूध कंपन्यांना मिल्कोमीटर प्रमाणीकरण बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला आहे.

किसान सभेने म्हटलं, “दुधाचे भाव दुधातील फॅट व एस.एन.एफ.च्या प्रमाणानुसार ठरत असतात. फॅट व एस.एन.एफ. मोजण्यासाठी वापरण्यात येणारे मिल्कोमीटर हवे तसे सेट करता येत असल्याने सेटिंग बदलून दुधाची गुणवत्ता मारली जाते. त्याद्वारे शेतकऱ्यांची मोठी लूट करण्यात येते. दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती, विविध शेतकरी कार्यकर्ते व किसान सभेने याबाबत अनेकदा आवाज उठवून राज्य सरकारचे लक्ष या प्रश्नाकडे वेधले. अनेकदा या प्रश्नावर आंदोलनेही करण्यात आली.”

“अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात प्रभात कंपनी विरोधात झालेल्या आंदोलनात हा मुद्दा प्रामुख्याने लावून धरण्यात आला. अखेर दिंडोरी ते वाशिंद पार पडलेल्या किसान लाँग मार्चमध्ये हा मुद्दा उपस्थित करण्यात आला. लाँग मार्चच्या पार्श्वभूमीवर विधानभवनात १७ मार्च २०२३ रोजी संपन्न झालेल्या बैठकीतही हा मुद्दा प्रकर्षाने मांडण्यात आला,” अशी माहिती किसान सभेने दिली.

किसान सभेने पुढे म्हटलं, “राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व दुग्धविकास मंत्री यांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार मिल्कोमीटर व वजनकाटे, राज्य सरकारच्या अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण या विभागाच्या अंतर्गत असलेल्या नियंत्रण, वैधमापन शास्र या यंत्रणेमार्फत नियमित तपासण्यात येतील असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.”

“दूध उत्पादकांची लूटमार थांबविण्यासाठी दूध संस्थांना प्रमाणित मिल्कोमीटर वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. शिवाय मिल्कोमीटर तपासणीसाठी स्वतंत्र निरीक्षकांची नेमणूक करण्याची कारवाई प्राधान्याने करण्यात येईल असे लेखी आश्वासन राज्य सरकारने दिले,” असं किसान सभेने सांगितलं.

हेही वाचा : शेतकऱ्यांचा मोर्चा स्थगित, लेखी आश्वासनानंतर आंदोलक माघारी

“सद्य स्थितीत राज्यातील खाजगी दूध संघांवर शासनाचे नियंत्रण नाही. याबाबत संबंधितांसोबत बैठक घेऊन, दूध उत्पादकांची लूटमार थांबविण्यासाठी खाजगी क्षेत्रावर नियंत्रण ठेवण्याबाबत योग्य तो निर्णय घेण्यात येईल असेही यावेळी मान्य करण्यात आले,” असं किसान सभेने नमूद केलं. किसान सभेच्यावतीने डॉ. अशोक ढवळे, जे. पी. गावीत, उमेश देशमुख, डॉ. अजित नवले इत्यादींनी निवेदन जारी केलं.

Story img Loader