Maharashtra News Updates, 28 August 2024 : मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा २८ फुटी पूर्णाकृती पुतळा २६ ऑगस्ट रोजी दुपारी १ च्या सुमारास कोसळला. नट बोल्ट गंजल्याने हा पुतळा कोसळला असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आली आहे. तसंच, पुतळ्याजवळ ४५ किमी प्रतितास वाऱ्याचा वेग होता. त्यामुळे पुतळा कोसळला असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. तसंच, वाईट गोष्टीतून चांगल्या गोष्टी होतात, असं म्हणत दीपक केसरकरांनी वादाला तोंड फोडलं आहे. यावरून विरोधकांनी निशाणा साधला असून महाविकास आघाडीने आज मालवण येथे बंद पुकारला आहे. या प्रकरणाचे पडसाद संपूर्ण राज्यातून उमटू लागले लागले आहेत. यासह राज्यातील विविध जिल्ह्यात पावसाळी वातावरण आहे. मुंबईसह अनेक शहरांतही पावसाची रिमझिम सुरूच आहे. काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशाराही देण्यात आला आहे. यासह घडामोडी आपण जाणून घेऊयात.
Maharashtra News Today, 28 August 2024 : राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर
नाशिक : संततधारेने शहरातील रस्त्यांची दुर्दशा झाली असून प्रमुख मार्गांसह रहिवासी भागातील अंतर्गत रस्तेही खड्डेमय झाले आहेत. याआधी पेव्हर ब्लॉकचे तुकडे, खडीने बुजविलेले बहुसंख्य खड्डे पुन्हा उघडे झाले असून तिथे खड्डे आणि पसरलेले तुकडे, खडी असा दुहेरी त्रास वाहनधारकांना सहन करावा लागत आहे.
मुंबई : पश्चिम रेल्वेवरील गोरेगाव-कांदिवली दरम्यान सहाव्या मार्गिकेचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कामानिमित्त आज आणि उद्या ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेवरील २२ लोकल फेऱ्या रद्द आणि ४ लोकल फेऱ्यांमध्ये अंशत: रद्द होतील.
नवी मुंबई : उन्हाळ्यात महाग असणाऱ्या फळभाज्या पावसाळा सुरू होताच स्वस्त होण्यास सुरुवात होत असते. परंतु पावसाळ्यात पालेभाज्यांचे भाव वधारतात. वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न भाजीपाला बाजारात पावसामुळे कोथिंबिरीची आवक कमी झाली असून दर वधारले आहेत. घाऊक बाजारात १५-२० रुपयांवर असलेली कोथिंबिरीची जुडी आता ४०-५० रुपयांवर तर किरकोळ बाजारात ६०-८० रुपयांना विक्री केली जात आहे.
एपीएमसी बाजारात बेळगाव, पुणे आणि नाशिक येथून कोथिंबीर दाखल होते. बाजारात सोमवारी २ लाख ७ हजार ५०० क्विंटल कोथिंबीर आवक झाली आहे. २५ टक्के आवक कमी झाली असून पाऊस पडल्याने भिजलेली खराब कोथिंबीरही दाखल होत असल्याने दरवाढ झाली आहे. पावसाच्या संततधारेने पिकाला पाणी लागल्याने कोथिंबीर खराब होण्याचे प्रकार वाढले आहेत. तसेच काढलेली कोथिंबीर भिजल्याने लवकर कुजत आहे. त्यामुळे बाजारात दाखल होणाऱ्या कोथिंबिरीची आवक घटली आहे. भिजलेली, खराब कोथिंबीर येत असल्याने दरवाढ झाली आहे, असे घाऊक व्यापारी बाळासाहेब बडदे यांनी सांगितले.
रत्नागिरी जिल्ह्यातील मुंबई गोवा महामार्गा वरील भरणे नजीक एका कार मधून गांजा वाहतूक करणाऱ्या तिघांनासह ४ लाख ४१ हजार रुपयांच्या एकूण २२ किलो गांजा आणि एक कार असा तब्बल १० लाख ४१ हजार ३८० रुपयांचा मुद्दे माल पोलिसांकडून जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण व खेड पोलीस यांनी संयुक्त रित्या २६ ऑगस्टला पावणे अकराच्या सुमारास केली.
या प्रकरणी उदयसिंह मदनसिंह चुंडावत, वय ३७ वर्षे, रा. पाटरोड, आदर्शनगर, ता. मंडणगड, जि. रत्नागिरी, विशाल विद्याधर कोकाटे, वय ३४ वर्षे, रा. पोस्ट ऑफीस बिल्डींग, मंडणगड, ता. मंडणगड, जि. रत्नागिरी, सिध्देश उदय गुजर, वय ३२ वर्षे, रा. पाटरोड, आदर्शनगर, मंडणगड ता. मंडणगड जि. रत्नागिरी असे तिघांना अटक करण्यात आले आहे.
वर्धा : राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी सर्वत्र एकच झुंबड उडाली आहे. त्यातही लाडकी बहीण योजना चांगलीच गाजत आहे. सोबतच बांधकाम कामगारांना भांडी वाटप करण्याचा उपक्रम चर्चेत आहे. भांडी घेण्यासाठी प्रामुख्याने नोंदणी झालेल्या कामगारांची झुंबड उडत असल्याचे व त्यामुळे चेंगराचेंगरी होत असल्याचे दिसून येत आहे.
मंत्र्यांचा राजीनामा मागणार नाही, एखादा महिना आहे. त्यानंतर भ्रष्टाचारी सरकारला घालवायचे आहे, आमचे सरकार शिव पुतळा उभारेल अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी सावंतवाडी इथे पत्रकार परिषदेत दिली आहे.
अमरावती : लोकसभा निवडणुकीत अमरावती मतदारसंघातून पराभव झाल्यानंतर भाजपच्या नेत्या नवनीत राणा यांनी काही काळ मौन बाळगणे पसंत केले, पण आता पुन्हा त्यांनी जाहीर कार्यक्रमांमधून त्यांच्या विरोधकांविषयी आक्रमक भूमिका घेतली आहे.
गणेशोत्सवात चाकरमानी कोकणात येत असताना मुंबई-गोवा महामार्ग पुर्ण करता आला नाही हे राज्य सरकारचं फेल्युअर आहे. त्यामुळे कोकणातील चाकरमानी लोकांना सगळ्यात मोठ्या सणाला येताना प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला. सावंतवाडी येथील आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
आम्ही आतमध्ये येत असताना गर्दी होती. धक्काबुक्की सुरू झाली. तरीही मी माझ्या कार्यकर्त्यांना धरून होतो. पण भाजपाची बालबुद्धी बाहेर येत आहे. देवेंद्र फडणवीसांनी हे स्वतःहून घडवून आणलंय का? भाजपामुळे महाराष्ट्राची बदनामी होत आहे – आदित्य ठाकरे</p>
महाराष्ट्रात गृहमंत्री आहेत का? ते सतत दिल्लीत जात असतात. महाराष्ट्रात काही झालं तर त्याला देवेंद्र फडणवीस जबाबदार असतील.
नारायण राणे आणि त्यांच्या समर्थकांना राजकोट किल्ल्यावर पोलिसांनी थांबवून ठेवले आहे. त्यामुळे नारायण राणे यांनी पोलिसांशी असहकार्य करणार असल्याचं म्हटलं आहे. “यापुढे जिल्ह्यातील पोलिसांशी असहकार्य असेल”, असा इशाराच त्यांनी पोलिसांना दिला.
मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील शिवपुतळा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आज मालवण शहरात महाविकास आघाडीच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात येत असून मालवण बंदची देखील हाक देण्यात आली आहे.
पुढच्या पंधरा मिनिटांत रस्ता मोकळा झाला पाहिजे. आम्ही चोरवाटेने जाणार नाही. आम्ही मुख्य वाटेनेच जाणार, असं विनायक राऊत म्हणाले आहेत. राजकोट किल्ल्याच्या खाली नारायण राणेंचे समर्थक थांबले आहेत. किल्ल्यावर आदित्य ठाकरे आणि त्यांचे समर्थक असल्याने राणेंना थांबवण्यात आलं आहे. परिणामी आदित्य ठाकरेंना तिथून बाहेर काढावं म्हणून राणे समर्थकांनी गोंधळ घातला असून आम्ही मुख्य वाटेनेच जाणार असल्याचा निश्चय ठाकरे गटाने केला आहे.
नागपूर : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला महिलांचा मिळणारा वाढता प्रतिसाद लक्षात घेता आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीमध्ये उत्साह असला तरी मतांसाठीच बहीण लाडकी का? तिला विधानसभेची उमेदवारीही देऊन आमदारही करा, यासाठी महिला कार्यकर्त्यांकडून महायुतीच्या घटक पक्षावर दबाव वाढू लागला आहे.
मालवणच्या राजकोट किल्ल्यावर आदित्य ठाकरे आज पाहणी दौऱ्याला गेले असताना नारायण राणे आणि निलेश राणे यांना खाली थांबवण्यात आलं. त्यामुळे राणे समर्थकांनी राडा केला आहे. तसंच, निलेश राणे यांनी संताप व्यक्त केला आहे. बाहेरून येऊन आमच्या अंगावर येणार का? असा संतप्त सवाल त्यांनी विचारला आहे.
पुणे : महाविकास आघाडीच्या माध्यमातून लोकसभेच्या निवडणुकीत मोठे यश मिळाल्यानंतर विधानसभेसाठी महायुतीच्या नेत्यांचा आत्मविश्वास अधिकच वाढला आहे. लोकसभेच्या निवडणुकीत बारामतीची लढत ज्येष्ठ नेते शरद पवार विरूद्ध अजित पवार अशी झाली. यामध्ये शरद पवारांच्या उमेदवार सुप्रिया सुळे विजयी झाल्या.
नागपूर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या राजकोट भागात आठ महिन्यांपूर्वी उभारलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला. नागपुरात मात्र उन्ह, वादळ, मुसळधार पाऊस अंगावर झेलत चाळीस ते साठ वर्षांहून अधिक वर्षांपूर्वी उभारलेले पुतळे अजूनही सुस्थितीत आहेत.
ठाणे : राज्याचे माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्यासह सात जणांविरोधात खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेकायदेशीरपणे तपास सुरू करून मला आणि इतर व्यवसायिकांना खोट्या गुन्ह्यामध्ये अडकविण्याची धमकी देऊन आमच्याकडून पैसे उकळले असे तक्रारीत म्हटले आहे.
वसई : भाईंदर रेल्वे स्थानकात धावत्या ट्रेनखाली झोपून आत्महत्या करणार्या वसईतील मेहता पिता पुत्रांच्या या आत्महत्येचे गूढ अखेर उकलले आहे. जय मेहता याने अन्य धर्मीय मुलीशी लग्न केले होते. ते प्रकरण उघडकीस झाल्याने समाजात बदनामी होईल या भीतीपोटी दोघांनी आत्महत्या केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.
पिंपरी चिंचवड : आपलं हिंदू राष्ट्र पुढे गेलं पाहिजे. ते वाढलं पाहिजे अस आवाहन ऑलम्पिक कांस्यपदक विजेते नेमबाज स्वप्नील कुसाळे यांनी केलं आहे. स्वप्नील कुसाळे हे बालेवाडी- हिंजवडीतील अमोल बालवडकर यांच्या दहीहंडीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. मोहन भागवत यांना आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या इतकीच सुरक्षा पुरवण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने हा निर्णय घेतलाय. त्यांची अचानक सुरक्षा का वाढवण्यात आली? याबद्दल सवाल उपस्थित केले जात आहे.
कोण हा आपटे. त्याने किती पुतळे बनवले? माझा हा महाराष्ट्रसरकारला सवाल आहे २४नतासांच्या आत आपटे नावाच्या माणसाने किती पुतळे बनवले हे जाहीर करा. महाराष्ट्रात श्रेष्ठ पुतळे बनवणारे जन्माला आले. पण त्यांनी आपटेला शोधून आणले. मी शिवप्रेमींना आवाहन करतोय की उद्या १२ ते १ च्या दरम्यान शिवरायांच्या पुतळ्यावर दुग्धाभिषेक करावा आणि सर्वांनी महाराजांची माफी मागावी.
Maharashtra News Live Today, 28 August 2024 : राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर