Maharashtra News Today, 27 October 2023 : महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाजाला ५० टक्क्यांच्या आत ओबीसीतून कुणबी प्रमाणपत्र द्यावे, या मागणीसाठी शासनाला दिलेला ४० दिवसांचा कालावधी संपला. यामुळे जरांगे-पाटील यांनी बुधवारी पुन्हा आमरण उपोषण सुरू केले आहे. राज्यात ठिकठिकाणीही साखळी उपोषण केले जात आहे. तर, “कृषिमंत्री असताना काय केले?” असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचा नामोल्लेख टाळत केला. यावर राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. यासह विविध बातम्या जाणून घेणार आहोत….
Mumbai News in Marathi : राजकीय, क्राइम आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील घडामोड, एका क्लिकवर….
सुप्रिया सुळे म्हणतात, “पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवारांना पद्मविभूषण हे त्यांच्याच सरकारमध्ये शेतीविषयक कामांसाठी दिलं आहे”
‘‘महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेत्याने शेतकऱ्यांच्या नावाने आयुष्यभर केवळ राजकारण केले. ते अनेक वर्षे केंद्रात कृषिमंत्री होते. परंतु, त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केले’’, असा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचा नामोल्लेख टाळत केला. यावर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. मंत्री उदय सामंत यांनीही पंतप्रधानांच्या विधानावर भाष्य केलं आहे.
“जयंत पाटलांनी आमच्याबरोबर शपथ घेतली असती. तो इतिहास मी सांगत बसत नाही. ते गोपनीय आहे. पण, ज्या पक्षाबरोबर आम्ही गेलो, त्यांच्यासाठी जीवाचं रान करू. आम्ही भूमिका बदलली आहे. त्याच्याशी प्रामाणिक राहणं, आमचे कर्तव्य आहे. जयंत पाटील एका घटनेमुळे तिकडे थांबले आहेत. ती घटना सांगणार नाही. कधीतरी सांगेल,” असं विधान मंत्री हसन मुश्रीप यांनी केलं आहे.
केंद्र सरकारने योजनांची अंमलबजावणी करताना गरिबांच्या कल्याणाला प्राधान्यक्रम दिला आहे. योजनांची यशस्वी अंमलबजावणी हाच खऱ्या अर्थाने सामाजिक न्याय असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. राज्यातील २६ सिंचन प्रकल्प पूर्ण करणार असल्याची ग्वाही देतानाच केंद्र सरकारने विकासाच्या बाबतीत शेतकरी हा प्राधान्यक्रम ठेवला असल्याचे त्यांनी सांगितले.