शिवसेनेचे नेते राजन साळवी यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला आहे. राजन साळवी हे उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय मानले जात होते. मात्र एकनाथ शिंदे हे मला गुरुस्थानी आहेत असं आता त्यांनी म्हटलंं आहे. शिवसेनेच्या सगळ्या पदांचा त्यांनी राजीनामा दिला आहे. उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा झटका मानला जातो आहे. राजन साळवी यांनी उपनेतेपदाचा राजीनामा दिल्याने त्यांच्या शिंदे गटातील पक्षप्रवेशावर शिक्कामोर्तब झालं आहे. राजन साळवी आज दुपारी ३ वाजता एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करतील. दरम्यान एकनाथ शिंदे यांचा महादजी शिंदे पुरस्काराने दिल्लीत गौरव करण्यात आला. हा सत्कार शरद पवार यांच्या हस्ते पार पडला. ज्यानंतर उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात वादाच्या ठिणग्या उडाल्याचं दिसून आलं. त्याचे पडसाद शमेपर्यंतच राजन साळवी उद्धव ठाकरेंची साथ सोडणार असल्याची माहिती समोर आली. तसंच सुरेश धस हे आज पुन्हा एकदा अजित पवारांची भेट घेणार आहेत. खासदार उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन महापुरुषांचा अपमान रोखण्यासाठी कठोर कायदे करण्याची मागणी केली आहे. या आणि अशा सगळ्या घडामोडींवर आपली नजर लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून असणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Maharashtra News Live Update Today, 13 February 2025 : राजन साळवींनी सोडली उद्धव ठाकरेंची साथ, एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत करणार शिवसेनेत प्रवेश
सहा चोरटयांनी नेली ५ लाख १२ हजार रोख रक्कम, वारूळवाडी येथील मारुती सुझुकी शोरूम मधील घटना
नारायणगाव : वारूळवाडी हद्दीतील पुणे – नाशिक महामार्गावरील कोठारी ऑटो व्हील्स मारुती सुझुकी शोरूम मध्ये आज (दि १३) मध्यरात्री २ वा. सुमारास अज्ञात ६ चोरटयांनी ५ लाख १२ हजार रोख रकमेची चोरी केल्याची घटना शोरुमचे तिन्ही सुरक्षा रक्षक कंपनीच्या ट्रायलसाठी असलेल्या गाड्यामध्ये झोपलेले आढळून आले आहेत .
आधे इधर, आधे उधर, पिछे कोई नही… , उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाकरे गटाला टोला
ठाणे : ‘हम अंग्रेज के जमाने के जेलर है…’,‘आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ’ हा ‘शोले’ चित्रपटातील संवाद सांगत पीछे कोई नही, असे म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाला टोला लगावला.
अहिल्यानगर : बारावी परीक्षेदरम्यान शिक्षकांना संरक्षण द्या, अन्यथा बहिष्कार टाकण्याचा माध्यमिक शिक्षकांचा इशारा
अहिल्यानगर : इ. १२ वी बोर्ड परिक्षेदरम्यान श्री वृद्धेश्वर विद्यालय, (तिसगाव, ता. पाथर्डी) येथे एका समाजकंटकाने पर्यवेक्षकाला चाकूचा धाक दाखवून दमदाटी केल्याच्या घटनेचा माध्यमिक शिक्षक संघटनेने निषेध नोंदवत परीक्षेचे पर्यवेक्षण करणाऱ्या शिक्षकांच्या संरक्षणाची जबाबदारी प्रशासनाने घ्यावी अन्यथा परीक्षेवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे.
बारामती रेल्वे खाली सापडून एका महिलेचा मृत्यू
बारामती : – बारामती शहरातील रेल्वे स्टेशन नजीक मेहता हॉस्पिटल पासून काही अंतरावर असलेल्या लोहमार्गावर रेल्वे खाली सापडून एका महिलेचा मृत्यू झाला आहे. या अपघातात मरण पावलेल्या महिलेची ओळख पटलेली नाही, आज दुपारी दीडच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
बारामती शहरातून दौंड कडे निघालेला रेल्वे गाडीखाली महिला सापडल्यामुळे या महिलेचा मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे, दरम्यान या महिलेची ओळख अद्याप पटलेली नसून ती साधारण ३० ते ३५ वयोगटातील असावी , या महिलेची ओळख पटवण्याकरिता पोलीस तपास करीत आहेत. बारामती रेल्वे स्टेशन नजीक लोहमार्गावर यापूर्वीही अशा अनेक घटना घडल्या असून ही आत्महत्या आहे की अपघात आहे, याबाबत पोलीस तपास करीत आहेत,
अवैध वाळू उपसा; पोलीस प्रशासनाकडून २३ हायवा, २ जेसीबी जप्त
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अवैध वाळू वाहतुकीचा मुद्दा गाजल्यानंतर पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार यांनी अवैध वाळू उपसा व विक्री करणार्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली असून मंगळवार (दि.११) रोजी मध्यरात्री बिलोली तालुक्यातील गंजगाव वाळू घाटावरून २ जेसीबींसह २३ हायवा टिप्पर जप्त केले आहेत. सविस्तर वाचा…
GBS Updates : ‘जीबीएस’मुळे मृत्यूची मालिका सुरुच; राज्यातील रुग्णसंख्या २०३ वर पोहोचली
राज्यात गुइलेन बॅरे सिंड्रोमच्या (जीबीएस) आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. पुण्यातील खासगी रुग्णालयात रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यामुळे राज्यात आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या आठ झाली आहे. दरम्यान, राज्यातील जीबीएसची रुग्णसंख्या २०३ वर पोहोचली आहे. सविस्तर वाचा…
हास्य कलाकार समय रैनाला दुसरा समन्स; १७ फेब्रुवारीला उपस्थित राहण्यास सांगितले
‘इंडियाज गॉट लेटेंट’ वादाप्रकरणी समय रैनाला महाराष्ट्र सायबर विभागाने दुसरा समन्स बजावला असून याप्रकरणी १७ फेब्रुवारी रोजी चौकशीला उपस्थित राहण्यास सांगितले.
मंत्री धनंजय मुंडे यांना परळी न्यायालयाची नोटीस; नामनिर्देशनपत्रात करुणा यांची माहिती दडवली
राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी दाखल करण्यात येणाऱ्या नामनिर्देशनपत्रासोबत करुणा मुंडे यांच्याबाबतची खरी माहिती दडवली, अशी ऑनलाईन तक्रार केली आहे. सविस्तर वाचा…
ठाणे महापालिकेला प्रकल्पांसाठी हवे अर्थसहाय्य; अर्थसहाय्यासाठी आंतरराष्ट्रीय वित्त महामंडळासह झाली प्राथमिक चर्चा
ठाणे : गेल्या काही वर्षांपासून आर्थिक संकटांचा सामना करीत असलेल्या ठाणे महापालिकेने आता विस्कटलेली आर्थिक घडी रुळावर आणण्यासाठी पाऊले उचलली असून त्याचाच एक भाग म्हणून पर्यावरणपूरक विविध प्रकल्पांसाठी केंद्र सरकार तसेच आंतरराष्ट्रीय वित्त संस्थांकडून अर्थसहाय्य मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
नातेवाईकाच्या लग्नास जाण्यास नकार देणा-या पत्नीचा पती कडून खून
शिरुर : नातेवाईकांचे लग्नास जाण्यास नकार दिल्याचा राग मनात धरून पत्नीचा खून केल्याचा प्रकार गणेगाव खालसा येथे घडला आहे.
े
पालिका शाळेत वाचन कौशल्य चाचणीत त्रुटी; उल्हासनगर पालिका आयुक्तांची शिक्षिकेला कारणे दाखवा नोटीस
उल्हासनगरः उल्हासनगर महापालिकेच्या आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी पदभार स्विकारल्यापासून विविध विभागांच्या कारभाराची झाडाझडती सुरू केली आहे. नुकतीच आयुक्त आव्हाळे यांनी पालिकेच्या शाळांना भेट दिली. या भेटीत शाळा क्रमांक ८, २९ आणि २३ विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या शैक्षणिक गुतवत्ता तपासली.
नाशिक : मद्यधुंदांनी हुज्जत घातल्यानंतर नाशिक पोलिसांना जाग; ९५ मद्यपी, टवाळखोरांवर रात्री कारवाई
नाशिक : शहरातील मोकळे मैदान, बगीचे, जॉगिंग ट्रॅक आदी परिसरात मद्यपान करून धुडगूस घालणाऱ्या टवाळखोरांकडे पोलिसांनी लक्ष केंद्रीत केले आहे. अलीकडेच गंगापूर रस्त्यावर बेधुंद युवक, युवतींनी हुज्जत घालत पोलिसांशी गैरवर्तन केले होते. या पार्श्वभूमीवर, पोलिसांनी रात्री विशेष मोहीम राबवत उघड्यावर मद्यपान करणाऱ्या ९५ टवाळखोरांवर कारवाई केली.
अलिबाग दरोड्यातील दीड कोटींची रक्कम सांगलीतून हस्तगत… जाणून घ्या काय आहे प्रकरण
अलिबाग : स्वस्तात सोनं देतो सांगून दोघा सराफांची लुटून नेलेली रक्कम रायगड पोलीसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने हस्तगत केली आहे. लुटलेल्या दीड कोटी रूपयांपैकी १ कोटी ४९ लाख ८३ हजार हस्तगत करण्यात आले आहेत.
ठाणे: चोरट्यांना गटारावरील झाकणही सोडवेना…
ठाणे – शहरात दिवसगणिक गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. यामध्ये मोबाईल चोरी, सोने चोरीच्या घटना घडत असतात. मात्र ठाण्यातील टिकुजिनी वाडी येथील गटाराचे झाकणही चोरट्यांनी सोडले नसल्याचे उघडकीस आले आहे.
शिरुर : पोलिसिंग मध्ये जनतेचा सहभागही महत्वाचा असल्याचे सांगून ग्राम सुरक्षा पथक गाव पातळीवर प्रभावीपणे कार्यरत करावित अशी सूचना पोलीस उपअधीक्षक प्रशांत ढोले यांनी केली.
दहावी-बारावीच्या वाढीव गुण, प्रस्तावांसाठी १५ एप्रिलची मुदत… निकाल कधी?
पुणे : राज्यातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना क्रीडा, एनसीसी, स्काऊट गाईड यासाठी दिल्या जाणाऱ्या सवलतीच्या वाढीव गुणांचे प्रस्ताव सादर करण्यासाठी १५ एप्रिलपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.
बदलापुरात शिवरायांच्या पुतळ्याचे जंगी स्वागत; उल्हास नदीकिनारी स्थापना, १८ फेब्रुवारीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण
बदलापूरः छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर असलेल्या बदलापुरात शिवरायांचा भव्य पुतळा बसवण्यात आला आहे. येत्या १८ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण केले जाणार आहे. बुधवारी शहराच्या पूर्व भागातून निघालेल्या भव्य मिरवणुकीत नागरिक सहभागी झाले होते.
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; बदलापूर रेल्वे स्थानकात मालगाडी इंजिनात बिघाड
बदलापूरः कल्याणहून कर्जतकडे जाणारी मालगाडी बदलापूर रेल्वे स्थानकातून पुढे निघताना बंद पडली. साडे बाराच्या सुमारास कर्जतहून दुसरे इंजिन आणून ही मालगाडी पुढे काढण्यात आली. त्यामुळे कर्जत आणि बदलापूरहून मुंबईच्या दिशेने जाणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. रेल्वे गाड्या २५ ते ३० मिनिटे उशिराने धावत होती.
अकोला : खळ खट्याक!व्हिडिओ, बॅनर फाटले; मनसैनिकांनी फोडली बस…
अकोला : जिल्ह्यातील तुलंगा खुर्द येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखेचे बॅनर फाटलेल्या अवस्थेत आढळून आले. त्याच्या निषेधार्थ मनसैनिकांनी अकोला – पिंपळखुटा बसची तोडफोड केली. या प्रकरणी बसचालकाच्या तक्रारीवरून सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून चान्नी पोलिसांनी पाच आरोपींना गजाआड केले आहे. दरम्यान, मनसैनिकांच्या आक्रमक कृती विरोधात प्रवाशांनी संतप्त भावना व्यक्त केल्या.
सविस्तर वाचा…
अंबाझरी उद्यान खुले करण्यात अडचण काय?
नागपूर : तलावाशेजारी असलेले आणि नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या अंबाझरी उद्यानाला विकासाच्या नावावर बंदिस्त करण्यात आले आहे. शहरातील नागरिक उद्यान सुरू करण्याची मागणी करीत आहेत. शिवाय जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्र्यांनी उद्यान तातडीने जनतेसाठी खुले करण्याचे निर्देश दिल्यानंतरही प्रशासनाने कोणत्याही पाऊल उचलेले नाही.
आयपीएल बेकायदा प्रक्षेपण व लोकसभा निवडणुकीवर सट्टा प्रकरण: फेअरप्ले ॲपशी संबंधित दोघांना ईडीकडून अटक
मुंबईः फेअर प्ले या बेटिंग ॲप प्रकरणात सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) दोघांना अटक केली. याप्रकरणी ईडीने आतापर्यंत ३४४ कोटींच्या मालमत्तेवर टाच आणली आहे. आयपीएल क्रिकेट सामन्यांच्या बेकायदा प्रक्षेपणाप्रकरणी ईडी तपास करत आहे.
एसटी महामंडळाचा ३३६० एकर भूखंड विकासकांना खुला करणार! परिवहन मंत्र्यांची ‘नरेडको नेक्स्ट-जन कॉन्क्लेव्ह’मध्ये घोषणा
मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते वाहतूक महामंडळाच्या (एमएसआरटीसी) अखत्यारीत ३३६० एकर भूखंड असून हा संपूर्ण भूखंड विकसित करण्यात येणार आहे. यासाठी विकासकांनी पुढे यावे. या मशिवाय ग्रामीण, तालुका आणि जिल्हा पातळीवरील प्रत्येक आगार जलदगतीने विकसित करण्यात येणार आहे.
डोंबिवलीत सुभाष रस्त्यावरील संथगती गटारांच्या कामामुळे नागरिक हैराण; रस्ता वाहन कोंडीत, धुळीने रहिवासी त्रस्त
डोंबिवली – डोंबिवली पश्चिमेतील सर्वाधिक वर्दळीचा सुभाष रस्ता मागील तीन महिन्यापूर्वी रस्ता रूंदीकरण आणि सीमेंट काँक्रीट रस्ते कामासाठी खोदून ठेवण्यात आला आहे. या रस्त्याच्या दुतर्फा गटार बांधणीची कामे सुरू आहेत. हा रस्ता तीन महिन्यांपासून खोदून ठेवण्यात आला आहे. कोणत्याही कामात गती नसल्याने या भागातील रहिवासी, प्रवासी धुळीने, डासांमुळे हैराण आहेत.
चिर्ले ते दिघोडे मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य, अवजड वाहतुकीमुळे प्रवाशांचा जीव मुठीत घेऊन प्रवास
उरण : चिर्ले ते दिघोडे मार्गावर कंटेनर वाहतुकीमुळे तीन ते चार फूट खोलीचे मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे या मार्गावरून दररोज जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
वाटाण्याच्या शेंगा तोडायला गेले अन् जीव गमावला; मुलानेच जन्मदात्याला संपवले
चंद्रपूर : शेजारच्या शेतात वाटाण्याच्या शेंगा तोडण्यासाठी का गेले? असा जाब विचारत मुलाने जन्मदात्या वडिलांना जबर मारहाण केली. त्यानंतर वडील कसेबसे घरी पोहोचले. मात्र, राग अनावर झालेल्या मुलाने घरी येऊन पुन्हा वडिलांना लोखंडी शस्त्र व काठीने बेदम मारहाण केली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
रहिवाशी इमारतीच्या तोंडावरच बेकायदा बांधकाम
नवी मुंबई महापालिका हद्दीत नव्याने उभ्या राहत असलेल्या बेकायदा बांधकामांविरोधात तातडीने कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले असतानाही महापालिकेच्या काही विभाग अधिकाऱ्यांकडून याकडे कानाडोळा केला जात असल्याचा प्रकार उघडकीस येत आहे.
जळगावमध्ये जीबीएसचा दुसरा रुग्ण
जळगाव : जळगावमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात १५ दिवसांपूर्वी एक महिला गुइलेन बॅरे सिंड्रोमची (जीबीएस) लागण झाल्याने दाखल झाली होती. त्यानंतर आता रावेर तालुक्यातील २२ वर्षीय तरुणाला जीबीएसची लागण झाली असून, त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
इंजिनिअरिंगमध्ये नापास झालात, नो टेन्शन… विद्यार्थ्यांना मिळणार पुढच्या वर्गात प्रवेश!
नागपूर : इंजिनिअरिंग शिक्षण घेणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. ज्या विद्यार्थ्यांना परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यामुळे पुढील वर्गात जाण्यास अडचण येते, त्यांच्यासाठी आता एक मोठा दिलासा मिळाला आहे. दहावीच्या परीक्षेमध्ये जसा एटिकेटीचा पर्याय उपलब्ध करून दिला जातो, तसाच प्रकार आता अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रात लागू करण्यात आला आहे.
जळगाव जिल्ह्यात एकाच कुटूंबातील तिघांसह चार जण लाच स्वीकारताना जाळ्यात
जळगाव : जिल्ह्यातील मेहू (ता. पारोळा) येथे लाच प्रकरणी एकाच घरातील तीन जणांना अटक होण्याची घटना घडली आहे. अशा प्रकारची ही जळगाव जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे. पारोळा तालुक्यातील मेहू येथील महिला सरपंच जिजाबाई पाटील, त्यांचे पती गणेश पाटील, मुलगा शुभम पाटील आणि सेतू सुविधा केंद्राची खासगी व्यक्ती समाधान पाटील यांना ४० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले.
राज्यातील अनधिकृत शाळांवर कारवाई करा! राज्य बालहक्क संरक्षण आयोगाचे शिक्षण मंत्रालयाला साकडे
ठाणे – बदलापूर येथील एका खासगी शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकानेच त्याच्या वर्गातील विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर संबंधित शाळाच अनधिकृत असल्याचे राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या चौकशीतून समोर आले होते. अनधिकृत शाळांची ही बाब गांभीर्याने घेऊन राज्यातील सर्व अनधिकृत शाळांचे सर्वेक्षण करून त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्यात यावी, असे साकडे राज्य बालहक्क संरक्षक आयोगाने शिक्षण मंत्रालयाला घेतले आहे.
शिवसेनेचे नेते राजन साळवी यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला आहे. राजन साळवी हे उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय मानले जात होते. मात्र एकनाथ शिंदे हे मला गुरुस्थानी आहेत असं आता त्यांनी म्हटलंं आहे. शिवसेनेच्या सगळ्या पदांचा त्यांनी राजीनामा दिला आहे. उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा झटका मानला जातो आहे. राजन साळवी यांनी उपनेतेपदाचा राजीनामा दिल्याने त्यांच्या शिंदे गटातील पक्षप्रवेशावर शिक्कामोर्तब झालं आहे. राजन साळवी आज दुपारी ३ वाजता एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करतील