Today’s News Update, 04 January: राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिर्डी येथील मेळाव्यात जितेंद्र आव्हाड यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. प्रभू राम क्षत्रिय होता आणि वनवासात असताना मांसाहार करत होता असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. यानंतर राज्यातलं वातावरण तापलं आहे. भाजपाने आणि अजित पवार गटाने जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे. तर जितेंद्र आव्हाड यांनी रामायणाचं उदाहरण देऊन प्रभू रामाने आई वडिलांचा शब्द पाळण्यासाठी वनवास पत्करला. आत्ताच्या इतिहासात काकाला वनवासात ढकलण्याचे प्रयत्न सुरु आहेत असं म्हणत अजित पवारांना टोला लगावला. दुसरीकडे मनोज जरांगे पाटील हे आरक्षणासाठी आक्रमक झाले आहेत. त्यांनी पुन्हा एकदा छगन भुजबळांवर टीका केली आहे. यांसह सगळ्याच महत्त्वाच्या बातम्यांवर आपली नजर या लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून असणार आहे.
Maharashtra News Updates in Marathi |'राम मांसाहारी होता' या जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यानंतर भाजपा आक्रमक आणि इतर बातम्या
सांगली : प्रभू श्रीरामांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांचा मिरजेत भाजप कार्यकर्त्यांकडून गुरुवारी सायंकाळी निषेध करण्यात आला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करीत आ. आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडे मारुन दहन करण्यात आले.
भाजप तसेच हिंदुत्ववादी संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मिरजेतील महाराणा प्रताप चौक येथे आमदार आव्हाड यांचा जाहीर निषेध केला. महिला पदाधिकारी तसेच हिंदुत्ववादी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडे मारून जाहीर निषेध करीत त्याचे पोस्टर जाळले.
यावेळी सागर वनखंडे, दिगंबर जाधव, जयगोंड कोरे, अनिल रसाळ, श्रीकांत महाजन, रूपाली देसाई, प्रकाश जाधव, संदीप कबाडे, उमेश हारगे, मोहन वाटवे, शोभा घाडगे, अनघा कुलकर्णी, अनिता हारगे, गजेंद्र कुल्लोळी आदी उपस्थित होते. आमदार आव्हाड यांनी प्रभू श्रीरामांच्या बद्दल आक्षेपार्ह विधान करून हिंदुत्वादांच्या भावना दुखावल्या आहेत, सांगली जिल्ह्यामध्ये फिरकल्यास त्यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा यावेळी जयगोंड कोरे यांनी दिला.
दिल्लीतून आलिशान वाहनांची चोरी करून त्यांची देशभरात विक्री करणार्या एका टोळीला मध्यवर्ती गुन्हे शाखेने अटक केली आहे.
हे काम ‘पेट हेवन्स’ नामक एक संस्था पैसे घेऊन करत असल्याचे समोर आले होते.
नागपूर: स्फोटकांची निर्मिती करणाऱ्या नागपुरातील कारखाण्यात स्फोट झाला. त्यात ९ कामगार मृत्यूमुखी पडले. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी सुरू झाल्यावर प्रकाशझोतात आलेल्या पेट्रोलियम अॅण्ड एक्सप्लोसिव्ह ऑर्गनायझेशनच्या नागपूर स्थित मुख्यालयावर सीबीआयच्या चमूने छापा घातला.
राम लल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण येथील एक सेवानिवृत्त शिक्षिक आणि लेखिका मंजिरी मधुकर फडके यांना श्रीराम जन्मभूमी ट्रस्टतर्फे देण्यात आले आहे.
यवतमाळ: आत्महत्याग्रस्त जिल्हा ओळख असलेल्या यवतमाळच्या शेतकऱ्यांभोवती स्मानी, सुल्तानी संकटांचा फास दिवसेंदिवस अधिकच घट्ट होत आहे.
वसई विरार महापालिकेची स्थापना २००९ साली झाली. त्यावेळी ४ नगरपरिषदा अस्तित्वात होत्या.
वसई: वसई विरार शहराला सुर्या प्रकल्पातून अतिरिक्त १६५ दशलक्ष लिटर्स पाण्यापैकी ९० दशलक्ष लिटर्स पाणी मिळू लागल्याने नागिरकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र नवीन नळजोड्या देण्याची प्रक्रिया अद्याप सुरू करण्यात आलेली नाही.
डोंबिवली, कल्याणमध्ये मागील तीन वर्षांत ८७ बेकायदा इमारती भूमाफियांनी उभारल्या असल्याची धक्कादायक माहिती नगररचना विभागाच्या माहिती अधिकारातून उघड झाली आहे.
जळगाव : कापसाला प्रतिक्विंटल १५ हजारांचा भाव देऊन शासनाने तालुकास्तरावर खरेदी करावी, नाफेडच्या माध्यमातून शासनाने कांद्याला प्रतिक्विंटल तीन हजार ५०० रुपये भावाने खरेदी करावा, पारोळा, एरंडोल, भडगाव, धरणगाव या तालुक्यांतील शेतकर्यांना पीकविम्याची रक्कम अदा करावी, यांसह विविध मागण्यांसाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत.
महाराष्ट्र शेतकरी संघटनेतर्फे एरंडोल येथील कासोदा नाक्यानजीक रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. पारोळा, एरंडोल, भडगाव, धरणगाव या तालुक्यांतील कापूस व कांदा उत्पादक शेतकरी कांद्याच्या गळ्यात माळा घालून मोठ्या संख्येने सहभागी होते. त्यानंतर संघटनेतर्फे तहसीलदार सुचित्रा चव्हाण यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
वर्धा: केंद्र शासनाची अग्निवीर योजना चांगलीच गाजली. त्यावर तर्कवितर्क व्यक्त होत असतातच. मात्र शासनाचे कार्य सुरू आहेच. आता भारतीय वायुसेनेने अग्नीवीरवायू भरती प्रक्रियेस प्रारंभ केला आहे. १७ जानेवारीपासून नोंदणी सुरू होणार आहे.
शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्यापुढील पेच आणखी वाढला आहे.
पाम बीच या वेगवान मार्गावरील रस्त्याची सुधारणा करण्याचे काम पालिकेने हाती घेतले असून या मार्गावर छोटे पूल तसेच सिग्नलजवळील जंक्शनजवळ मायक्रोसर्फेसिंगचे काम करण्यात येत आहे.
वसई : मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील सातीवली खिंडीत एका स्कॉर्पिओ गाडीला भीषण आग लागल्याची घटना गुरुवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. यात संपूर्ण गाडी जळून खाक झाली. स्कॉर्पिओ वाहन क्रमांक एमएच ०२. बी वाय ३५०० ही चारचाकी गाडी गुरुवारी दुपारी महामार्गावरील मुंबई गुजरात वाहिनीवर जात होती. गाडी वसई पूर्वेच्या सातीवली खिंडीतील चढणीवर पोहचताच अचानकपणे गाडीतून धूर येऊन आग लागली. वाहनचालकाने प्रसंगावधान दाखवून गाडी रस्त्याच्या बाजूला उभी करून खाली उतरला. आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली याचे कारण समजू शकले नाही.
राज्यात सुट्टी जाहीर करावी, तसेच दारू आणि मांस बंदीही करावी, अशी मागणी भाजपच्या आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
नाशिक जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जणांचा पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाला. या प्रकरणी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील चिंचओहोळ येथील ५५ वर्षाची महिला टाक्याची विहीर येथे पिण्याचे पाणी भरण्यासाठी गेली असता पाय घसरून ती विहीरीत पडल्याने बुडून मयत झाली. महिलेचे नाव समजू शकलेले नाही. या प्रकरणी हरसुल पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
दुसरी घटना, देवळा तालुक्यात घडली. तालुक्यातील खालप येथील अशोक सूर्यवंशी (३६) हे विहिरीवर पाईप जोडण्यासाठी गेले असता पाय घसरून विहिरीत पडले. त्यांचा बुडून मृ्यू झाला. या प्रकरणी देवळा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, बबु शिद (२५, त्र्यंबकेश्वर) याचा मृतदेह वालदेवी धरणात तरंगताना आढळून आला. या प्रकरणी वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली.
मुंबई महापालिकेच्या सर्व प्रमुख रुग्णालयांमध्ये ‘शून्य औषध चिठ्ठी योजना’ (झिरो प्रिस्क्रिप्शन) राबविण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतल्यामुळे रुग्णांना कोणतेही औषध बाहेरून विकत घ्यावे लागणार नाही.
२३ ऑगस्टला नेरुळ येथील तुलसी दर्शन इमारतीचा स्लॅब कोसळून जखमी झालेल्या रहिवाशांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ३ लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे, अशी माहिती आमदार मंदा म्हात्रे यांनी दिली.
नेरुळ विभागातील सारसोळे सेक्टर सहा भूखंड क्रमांक ३७३ स्थित धोकादायक झालेली तुलसी दर्शन या इमारतीचा मोठा भाग २३ ऑगस्टला अचानक पडला होता. त्यामुळे रातोरात इमारत रिकामी करण्यात आली होती. किरकोळ ते गंभीर असे ३३ रहिवासी जखमी झाले होते. तर दोघांचा मृत्यू झाला होता. यातील मयत व्यक्तीच्या कुटुंबियांना प्रत्येकी एक लाख आणि दोन गंभीर जखमी रहिवाशांना उपचारासाठी म्हणून प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून करण्यात आली आहे. ही रक्कम संबंधित व्यक्तीच्या खात्यात वर्ग करण्यात आली आहे, अशी माहिती आमदार म्हात्रे यांनी दिली.
नवी मुंबई : मालवाहतूकदारांचा संप मिटला असला तरी अद्याप कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आवक नियमित झालेली नाही. भाजीपाला बाजारामध्ये राज्यभरातून पुरेशी भाजी आल्याने दरात फारसा फरक पडला नाही. किरकोळ बाजारात भाज्या चढ्या दराने विकल्या जात आहेत.
अकोला: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तप्त झाले. अकोला लोकसभा मतदारसंघातून ॲड. प्रकाश आंबेडकर पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे वंचित आघाडी जोमाने तयारीला लागली.
नागपूर: नागपूर येथील कोट्यवधी मानवतावादी जनतेचे प्रेरणास्थान असलेल्या “दीक्षाभूमी” येथे बाह्य शक्तींचा बौद्ध धम्माची जागतिक वास्तू असलेल्या स्थळावर सतत हस्तक्षेप सुरू असतो.
पुण्यातील घरांच्या बाजारपेठेने २०१३ पासूनची चांगली कामगिरी २०२३ मध्ये नोंदविली.
२००५ पूर्वी रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजनेचा लाभ मिळणार. राज्यातील ते चार ते पाच हजार कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ. मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय.
रेल्वे स्थानक भागात वाहतुकीत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये काही मार्ग एक दिशा तर काही मार्ग बंद केले जाणार आहेत, असे वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीश बने यांनी सांगितले.
गोंदिया: गोरेगाव पोलीस ठाण्यांतर्गत येणार्या कटंगी धरण संकुलात विजेच्या धक्क्याने दोघांचा मृत्यू झाल्याची घटना आज, गुरुवारी सकाळी उघडकीस आली.
अमरावती: राज्यातील अनेक उद्योग गुजरातला पाठवण्याची जणू स्पर्धा राज्य सरकार च्या नेत्यांमध्ये लागली आहे. हिरे उद्योगापाठोपाठ आता महानंद दुग्ध प्रकल्पही गुजरातच्या दावणीला सरकारने बांधला आहे.
मालमत्ता कराच्या वसुलीचे उद्दिष्ट्य गाठण्यासाठी धावपळ करीत असलेल्या निरीक्षकांना आता कर भरणा केलेल्या करदात्यांचा शोध घेऊन त्यांच्याकडून पावत्या गोळा कराव्या लागणार आहेत.
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात गुरुवारी सकाळी धुक्याची चादर पसरल्याने लोकल २० ते २५ मिनिटे विलंबाने, तर लांबपल्ल्याच्या रेल्वेगाड्या कूर्मगतीने धावत होत्या. तसेच पश्चिम रेल्वेवरील लोकलही उशिरा धावत होत्या.
पुणे : प्रभू श्रीराम हे मांसाहारी असल्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी काल वादग्रस्त विधान केले. या विधानाच्या निषेधार्थ राज्यभरात भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून आज पुण्यातील अलका टॉकीज चौकात भाजपचे पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या नेतृत्वाखाली तिरडी आंदोलन करण्यात आले. तर जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.
यावेळी धीरज घाटे म्हणाले की,अयोध्येत प्रभू श्रीराम यांचे भव्य दिव्य असे मंदिर उभारले आहे. यापूर्वी देखील जितेंद्र आव्हाड यांनी वादग्रस्त विधान केले होते. त्यावेळी फर्ग्युसन महाविद्यालय येथे जितेंद्र आव्हाड यांना भाजप कार्यकर्त्यांनी चांगलेच उत्तर दिले होते. त्यामुळे ती घटना ते विसरले वाटत असून आता या पुढील काळात जितेंद्र आव्हाड पुण्यात आल्यावर निश्चितच त्यांना उत्तर दिले जाईल, असा इशारा देखील घाटे यांनी दिला.
कोकण, मध्य महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे आणि नंदुरबारमध्ये शुक्रवार आणि शनिवारी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिर्डी येथील मेळाव्यात जितेंद्र आव्हाड यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. प्रभू राम क्षत्रिय होता आणि वनवासात असताना मांसाहार करत होता असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. यानंतर राज्यातलं वातावरण तापलं आहे. भाजपाने आणि अजित पवार गटाने जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे.