Maharashtra Latest News Updates : राज्यात मान्सून पावसाला सुरुवात झालीय. त्यामुळे राज्यात शेती कामांची लगबग सुरू आहे. राज्यातील अनेक ठिकाणी पावसाच्याही अपडेट्स येत आहेत. याशिवाय करोना काळानंतर आता शाळाही सुरू झाल्यात. त्यामुळे शाळांमध्ये देखील विद्यार्थ्यांची हजेरी दिसत आहे. युक्रेन व रशियातील संघर्ष, शेअर बाजारातील चढउतार अशा विविध घडामोडी राज्य, देश, आंतरराष्ट्रीय पातळीवर तसंच इतर क्षेत्रात घडत आहेत. या सर्व घडामोडींचा एकाच ठिकाणी आढावा.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Maharashtra Latest News Updates : राज्यासह देश आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रत्येक अपडेट
पुणे जिल्ह्यातील १३ तालुक्यांमधील १२३ जलस्रोतांमध्ये दूषित पाणी आढळून आले. यामध्ये सर्वाधिक प्रमाण आंबेगाव तालुक्यात आहे. आंबेगावमध्ये ३५ जलस्रोतांमध्ये दूषित पाण्याचे नमुने आढळून आले आहेत. २४०८ पाण्याचे नमुने तपासण्यात आले होते, म्हणजे तपासण्यात आलेल्यांपैकी पाच टक्के स्रोत दूषित आढळले असल्याचे जिल्हा आरोग्य विभागाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे .
केंद्र सरकारने अल्पकालीन सैन्यभरतीसाठी जाहीर केलेल्या ‘अग्निपथ’ योजनेविरोधात देशभरात आंदोलन सुरु असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी तिन्ही सैन्यदल प्रमुखांची भेट घेणार आहे. उद्या म्हणजेच २१ जूनला पंतप्रधान नरेंद्र मोदी लष्कर, नौदल आणि हवाई दल या तिन्ही सशस्त्र दलांच्या प्रमुखांना भेटणार आहेत. अग्निपथ योजनेला होणार विरोध आणि त्यानंतर सैन्यदल प्रमुखांनी त्यावर जाहीर केलेली भूमिका या पार्श्वभूमीवर सर्वांच लक्ष या बैठकीकडे असेल.
'अग्निपथ' योजनेसंबंधी महत्वाचा निर्णय होणार? मोदी उद्या घेणार तिन्ही सैन्यदल प्रमुखांची भेट; संपूर्ण देशाचं लक्ष https://t.co/Xsqx6jTSKT #AgnipathScheme #Agneepath #Agnipath #Agniveer #AgneepathScheme
— LoksattaLive (@LoksattaLive) June 20, 2022
‘आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने‘ या संत तुकाराम महाराज यांच्या वचनाचे मूर्त रूप म्हणून विठ्ठलाचे त्रिमितीमधील वीस फूट उंचीचे शब्दशिल्प उभे करण्यात येत आहे. वारीच्या शेवटच्या मुक्कामाच्या वाटेवर पंढरपूरच्या अगदी जवळ पिराची कुरोली जवळील चिंचणी येथे या शिल्पाची उभारणी होत आहे.
कल्याण पूर्वेत काटेमानिवलीमध्ये एका तरूणीने सात मुलांच्या छळाला कंटाळुन गेल्या आठवड्यात आत्महत्या केली आहे. या तरूणीच्या कुटुंबीयांना न्याय मिळाला पाहिजे म्हणून गेल्या आठवड्यापासून समाज माध्यमांवर विविध प्रकारच्या ध्वनीचित्रफिती, लघुसंदेश पाठविणाऱ्या कल्याण पूर्वेतील शिवसेनेच्या उपशहर संघटक आशा ऋतुकांचन रसाळ आणि त्यांच्या पतीला आठ जणांनी शिवीगाळ तसेच धमकी देऊन पाठलाग करत बेदम मारहाण केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे.
हिंजवडी ते शिवाजीनगर या २३ किलोमीटरच्या मार्गावर सुरू असलेल्या मेट्रो मार्गिकेच्या कामकाजाचा सुरक्षा आढावा सोमवारी (२० जून) घेण्यात आला. या वेळी पिंपरी-चिंचवड अग्निशमन दलाच्या सहयोगाने एका खास ‘अग्निसुरक्षा प्रशिक्षणा’चे आयोजन करण्यात आले होते.
आषाढी वारीकरीता येणाऱ्या वारकऱ्यांना वारीबाबत माहिती होण्यासाठी आणि त्यांना आवश्यक त्या सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने ‘आषाढी वारी २०२२’ हे मोबाइल उपयोजन (ॲप) विकसित करण्यात आले आहे.
आभासी चलनात गुंतवणुकीच्या आमिषाने दोघांना साडेनऊ लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी लष्कर पोलिसांकडून दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.विक्रांत ईश्वर गर्ग, नयना देवेंद्र जॅान (दोघे रा. गाजीयाबाद, उत्तरप्रदेश) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
विधान परिषदेच्या दहा जागांसाठी नुकतीच निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे. या निवडणुकीत एकूण २८५ आमदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. पाच वाजता मतमोजणीला सुरुवात होणार होती. मात्र पाच वाजून गेल्यानंतरही अद्याप मतमोजणीला सुरुवात झाली नाही. भारतीय जनता पार्टीचे आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या मतदानावर काँग्रेसकडून आक्षेप घेण्यात आला आहे. सविस्तर बातमी
लोकमान्य नगर येथील तरण तलावाचे नामकरण होऊन अडीच वर्ष उलटले तरी तरण तलाव बंद ठेवण्यात आला असून या मुद्द्यावरून मनसेकडून टिका होताच महापालिकेच्या क्रिडा विभागाने हा तलाव अभिव्यक्ती स्वारस देकार या पध्दतीने खाजगी संस्थेला देण्याची प्रक्रीया सुरु केली आहे.
कष्टकरी जनता आघाडी आणि महाराष्ट्र रिक्षा पंचायत यांच्या वतीने ‘मी समतेचा वारकरी, सेवा हीच माझी पंढरी’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्याअंतर्गत वारकऱ्यांना आरोग्य, मोफत रिक्षा, चप्पल, बूट दुरुस्ती आदींसह १८ प्रकारच्या विविध सेवा संघटनेकडून दिल्या जाणार आहेत.
भाजप नेते कैलास विजयवर्गीय यांच्या अग्निवीरांना भाजपच्या कार्यालयात सुरक्षारक्षक म्हणून प्राधान्य देण्याच्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला असतानाच केंद्रीय राज्य मंत्री व माजी लष्कर प्रमुख जनरल व्ही.के. सिंह यांनी विजयवर्गीय यांच्या वक्तव्याला विनोद संबोधले आहे.
तरुणांना भारतीय सैन्यदलात भरती होण्यासाठी जाहीर करण्यात आलेली ‘अग्निपथ’ योजना लष्करावर ताबा मिळवण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (RSS) छुपा अजेंडा असल्याचा गंभीर आरोप कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांनी केला आहे. लष्करात भरती झाल्यानंतर आणि सेवा संपल्यानंतरही अग्निवीर आरएसएस कार्यकर्ते असतील असंही ते म्हणाले आहेत. कुमारस्वामी यांच्या या वक्तव्यामुळे मोठा गदारोळ होण्याची शक्यता आहे.
ट्रकच्या धडकेने दुचाकीवरील ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाल्याची घटना कोथरुड परिसरातील पौड रस्त्यावर घडली.रंजना दाभेकर (वय ६०, रा श्रीराम सोसायटी, वारजे) असे मृत्युमुखी पडलेल्या ज्येष्ठ महिलेचे नाव आहे. अपघातात दुचाकीस्वार मुग्धा दाभेकर (वय ३०) जखमी झाल्या आहेत.
दावोस येथे झालेल्या जागतिक व्यापारी परिषदेमध्ये उद्योजकांसोबत झालेल्या एकूण ८० हजार कोटींच्या गुंतवणूक करारांपैकी ३६०० कोटींची गुंतवणूक विदर्भात होणार असल्याचा दावा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने केला आहे.
जमिनीचा छोटा हिस्सा असणारे भारतातील ६५ टक्के शेतकरी यांत्रिकी शेतीच्या मोहात कर्जबाजारी होऊन आत्महत्या करतात, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.
कल्याण डोंबिवली शहरे प्लास्टिक मुक्त करण्यासाठी गेल्या दोन वर्षापासून पालिकेतर्फे विशेष अभियान सुरू आहे. प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर करण्यास व्यापारी, दुकानदार, फेरीवाल्यांना मज्जाव आहे. अशा परिस्थितीत दुकानात बंदी असलेल्या प्लास्टिकचा चोरुन साठा करून त्या ग्राहकांना विकणाऱ्या व्यापाऱ्यांवर पालिकेच्या घनकचरा विभागाच्या पथकाने कारवाई केली.
महापालिकेत नोकरीच्या आमिषाने तरुणांची १६ लाख १० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी तिघां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आशिष उबाळे, संदीप उदमुले, यशोब देवकुळे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
कोरेगाव पार्क भागातील एका उच्चभ्रू सोसायटीत मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेला वेश्या व्यवसाय गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला. या कारवाईत आठ तरुणींना ताब्यात घेण्यात आले असून दोघांना अटक करण्यात आली.
लातूरमधील विलासराव देशमुख शासकीय महाविद्यालय आणि औरंगाबादमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ही दोन्ही रुग्णालये सार्वजनिक खासगी भागिदारी तत्त्वावर (पीपीपी) चालविण्यासाठी वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाने (डीएमईआर) निवादा जारी केल्या असून त्यासाठी आठ कंपन्यांनी प्रतिसाद दिला आहे.
सांगलीमधील मिरज येथे एकाच कुटुंबातील नऊ जणांनी सामूहिक आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मिरजेपासून १२ किमी अंतरावर असणाऱ्या म्हैसाळमधील अंबिकानगरमध्ये ही घटना घडली आहे. दोन सख्ख्या भावांनी कुटुंबासह विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलीस सध्या घटनास्थळी दाखल झाले आहेत. आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.
धक्कादायक! सांगलीतील मिरजमध्ये एकाच कुटुंबातील नऊ जणांची सामूहिक आत्महत्या https://t.co/kg669qDK17 Sangli Miraj #maharashtranews
— LoksattaLive (@LoksattaLive) June 20, 2022
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे मागील काही काळापासून हीप बोन या आजाराने त्रस्त आहेत. पुण्यातील एका सभेतून त्यांनी याबाबतची माहिती दिली होती. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. मात्र, करोनाची लागण झाल्यामुळे ती पुढे ढकलण्यात आली. अखेर आज (मंगळवार) सकाळी लीलावती रुग्णालयात राज ठाकरेंवर शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी दिली आहे. सविस्तर बातमी
कोटयवधी रुपये खर्च करून श्रेणीकरण केलेली कल्याण डोंबिवली पालिकेची ऑनलाईन संगणक यंत्रणा ठप्प आहे. मालमत्ता कर भरणा, देयकाची पावती, नवीन पाणी जोडणी, नवीन कर आकारणी, मालमत्ता हस्तांतरण अशी कामे ऑनलाईन माध्यमातून होत नसल्यामुळे नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बदलापूर शहरात ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती. बदलापूर शहरातील एकमेव उड्डाणपूलावर दुपारी बारा वाजल्यापासून वाहतूक कोंडी झाली होती. तर पूर्व भागातून जाणाऱ्या काटई कर्जत राज्यमार्गावर कार्मेल शाळेसमोर मोठ्या प्रमाणावर वाहने अडकून पडली.
मुंबईत करोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये हृद्यविकाराच्या झटक्याने मृत झालेल्यांच्या संख्येत सुमारे २०० टक्क्यांनी वाढ झाली आहे. करोना काळात कर्करोगासह हृदयविकार, क्षयरोगामुळे मृत्यू झाल्याचे प्रमाण घटले होते. २०२१ मध्ये मात्र हे प्रमाण पुन्हा वाढल्याचे आढळले आहे.
सोमवार सकाळपासून पडत असलेल्या सततधार पावसाचा फटका मध्य रेल्वेच्या उपनगरीय वेळापत्रकाला बसला. सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या आणि सुटणाऱ्या जलद आणि धीम्या लोकल उशिराने धावत आहेत. त्यामुळे लोकल गाड्यांना प्रवाशांची गर्दी झाली आहे.
कल्याण पूर्वेतील म्हसोबा चौक भागातील एका बँकेचे एटीएम फोडून चोरट्यांनी २७ लाख रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. एटीएममधील सीसीटीव्हीमध्ये चोरीची घटना कैद झाली आहे. सीसीटीव्हीमधील चित्रीकरणाच्या आधारे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.म्हासोबा चौक भागात बँक ऑफ इंडियाचे एटीएम आहे.
ठाणे येथील वर्तकनगर भागात एका इमारतीचे बांधकाम सुरू असताना एक कामगार इमारतीच्या लिफ्टच्या डकमधून खाली पडला. लोखंडी परांचीचा पाईप शरीरात घुसल्याने त्यांचा मृत्यू झाला. रविवारी रात्री दहा वाजता हा प्रकार घडला आहे.
बृहन्मुंबई महानगर पालिकेत नोकरी लावतो असे सांगत एका महिलेने दोघांना सुमारे आठ लाख रूपयांचा गंडा घातला आहे. त्यासाठी महिलेने बृहन्मुंबई महापालिकेचे कार्यालयीन बनावट शिक्के बनवून खोट्या सह्या करून बनावट नियुक्तीपत्रही संबंधितांना दिले.
कल्याण रेल्वे स्थानकात सोमवारी सकाळी एका महिला प्रवाशाच्या बटव्यातील मोबाईल भुरट्या चोराने लंपास केला. कल्याण रेल्वे स्थानकातील मोबाईल चोरीच्या वाढत्या घटनांमुळे प्रवासी हैराण आहेत. रेल्वे स्थानकात चारही बाजुने सीसीटीव्ही कॅमेर असतानाही भुरटे रेल्वे स्थानकात येण्याचे धाडस करतात कसे असे प्रश्न प्रवासी करत आहेत.
आज सकाळी नऊ वाजल्यापासून विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान घेतलं जात आहे. विधान परिषदेच्या दहा जागांसाठी ११ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. काँग्रेसचे भाई जगताप आणि भारतीय जनता पार्टीचे प्रसाद लाड यांच्यात चुरस पाहायला मिळणार आहे. मतांचं गणित पाहता शिवसेनेचे दोन्ही उमेदवार सहजपणे निवडून येतील, असं चित्र आहे. असं असताना अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी खळबळजनक दावा केला आहे. सविस्तर बातमी
दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी, क्षणोक्षणीचे अपडेट्स जाणून घ्या एकाच क्लिकवर