Marathi News Updates : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सोमवारी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचा २०२५-२६ चा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पाद्वारे सरकारने राज्यातील जनतेची फसवणूक केल्याची टीका होत आहे. तर, हा अर्थसंकल्प सर्वसमावेशक व राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी योग्य असल्याचं सरकारमधील मंत्र्यांचं व आमदारांचं म्हणणं आहे. आज विधीमंडळात अर्थसंकल्पावर चर्चा होऊ शकते. यावर आपलं लक्ष असेल. तसेच राज्यात घडणाऱ्या इतर घडामोडींचा आढावा आपण या लाईव्ह न्यूज ब्लॉगद्वारे घेणार आहोत. दुसऱ्या बाजूला मंत्री नितेश राणे यांनी केलेल्या एका घोषणेमुळे ‘हलाल’विरोधात ‘झटका’ मांस असा वाद सुरू झाला आहे. ठिकठिकाणी मल्हार प्रमाणपत्रासह झटका मांस विक्री करणारी दुकानं उघडली जातील आणि हिंदूंनी त्याच दुकानांमधून मांस खरेदी करावं असं आवाहन नितेश राणे यांनी केलं आहे. यावर वेवेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येत असून यावरही आपलं लक्ष असेल.
Maharashtra Live News Update Today, 11 March 2025 : राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एकाच क्लिकवर.
सावधान! शेअर मार्केटमधील गुंतवणुकीचा मोह आवरेना; शिक्षकाने गमावले १४ लाख…
सध्या शेअर बाजार कोसळले आहे. त्यामुळे शेअर बाजारात गुंतवणुकीची ही योग्य संधी असल्याचे सांगून ऑनलाईन फसवणूक करणारी टोळी सक्रीय झाली आहे. वणी येथील एका शिक्षकाने शेअर मार्केटमधील गुंतवणुकीतून मिळणाऱ्या परताव्याचा मोहात जवळपास १४ लाख रुपये गमावले. सविस्तर वाचा…
होलिका दहनाचा मुहूर्त यंदा रात्री उशिराचा, नेमकं कारण काय?
अकोला : होळी हा रंग, प्रेम आणि वसंत ऋतूत साजरा केला जाणारा महत्त्वाचा हिंदू सण. होलिका दहन हा एक विधी असून जो वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवितो. दरवर्षी होलिका दहन सायंकाळच्या सुमारास केले. यंदा मात्र होलिका दहनाचा मुहूर्त रात्री उशिरा राहणार आहे.
सुवर्णसंधी! परदेशात मोफत शिक्षण हवे, शासनाची ‘ही’ शिष्यवृत्ती…
नागपूर : राज्य शासनाने वंचित आणि आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घेता यावे म्हणून केंद्रीय सामाजिक न्याय विभागाच्या धर्तीवर सुरुवातीला अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी छत्रपती शाहू महाराज परदेशी शिष्यवृत्ती योजना सुरू केली. त्यानंतर हीच योजना अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय आणि मराठा विद्यार्थ्यांसाठीही लागू केली. यातून विद्यार्थ्यांना जागतिक २०० क्रमवारीतील विद्यापीठांच्या पदवी, पदव्युत्तर आणि पीएच.डी. अभ्यासक्रमांना प्रवेश घेता येतो.
डोंबिवलीतील ६५ बेकायदा इमारतींचं प्रकरण; बिल्डर व खोटे दस्तावेज बनवणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल होणार
– कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील ६५ बेकायदा इमारत प्रकरण
– ६५ बेकायदा इमारत प्रकरणात कल्याण प्रांत कार्यालयाची देखील फसवणूक
– काही बेकायदा इमारतींसाठी वापरले गेले होते खोटे ७/१२ आणि नकाशे
– कागदपत्रांच्या चौकशी दरम्यान उघकडीस आली बाब
– कल्याण तहसीलदार सचिन शेजाळ यांनी रामनगर पोलिसांना या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत
– डोंबिवलीतील आयरे गाव येथील एका इमारतीसाठी खोटा ७/१२ तयार करण्यात आला होता.
– बिल्डर व खोटे दस्तावेज बनवणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल होणार
– काही दिवसांपूर्वी या संदर्भात ठाकरे गटाने कल्याण प्रांत अधिकाऱ्यांना काही पुरावे दिले होते. त्याच्या आधारावर हा निर्णय घेणअयात आला आहे.
खांदेश्वरमध्ये घरात शिरुन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न
पनवेल : खांदेश्वर वसाहतीमध्ये एक मुलगी घरात एकटी असताना दोघे अनोळखी व्यक्ती तीच्या घरात शिरले. तीच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. आणि काही मिनिटांनी ते तिथून पळून गेले. याबाबात पीडीत मुलीने खांदेश्वर पोलीसांत गुन्हा नोंदविला आहे. अत्याचार करण्यासाठी आलेल्या व्यक्तींनी त्यांचा चेहरा कापडाने झाकल्याने त्यांचे वर्णन पिडीतेला करता येत नसले तरी पोलीस संबंधितांचा शोध घेत आहेत.
एसटी महामंडळाची झोळी अर्थसंकल्पात रिकामी… ७ हजार कोटींची देणी…
नागपूर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) आर्थिक संकटात असून सर्व प्रकारची थकीत देणी चुकती करण्यासाठी तसेच नवीन गाड्या घेण्यासाठी महामंडळाला सात हजार कोटींची गरज आहे. परंतु अर्थसंकल्पात पुरेसा निधी दिसत नसल्याने एसटीची झोळी रिकामीच असल्याचे दावा महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला आहे.
पीकविमा आदेशाची होळी; नुकसान भरपाई मिळेना, मग…
अकोला : प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत नुकसान भरपाईस मिळत नसल्याने पिकांना विम्याचे कसले संरक्षण? असा संतप्त सवाल करून शेतकऱ्यांनी आदेशाची होळी केली. जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करीत कर्जमाफीचीही मागणी लावून धरली. अकाेल्यात शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन केले.
पक्षांतंर्गत घडामोडींमुळे छगन भुजबळ यांचा सावध पवित्रा
मंत्रिपद न मिळाल्याने पक्ष नेतृत्वावर रोष प्रगट करुन भाजपशी जवळीक साधणारे माजीमंत्री तथा राष्ट्रवादीचे (अजित पवार) ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी राज्याच्या अर्थसंकल्पावरून उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांचे कौतुक केल्यामुळे भुजबळ समर्थक बुचकळ्यात पडले आहेत. सविस्तर वाचा
प्रशांत कोरटकरला आज अटक होणार! मुंबईत दाखल, उच्च न्यायालयात…
नागपूर : राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करीत इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना अश्लिल शिवीगाळ करणाऱ्या तथाकथित पत्रकार आरोपी प्रशांत कोरटकर हा आज मंगळवारी मुंबईत दाखल झाला आहे. तो आज उच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीदरम्यान उपस्थित राहण्याची शक्यता असून जर कोरटकरचा न्यायालयाने जामीन नाकारल्यास आज त्याला अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पालिका मुख्यालयाजवळच वृक्षतोड; २०० हून अधिक झाडांची कत्तल, पर्यावरणप्रेमींचा संताप
नवी मुंबई</strong> : नवी मुंबई महापालिका मुख्यालयाच्या समोरील आणि एनआरआय पोलीस ठाण्याच्या शेजारील परिसरात जवळजवळ २०० पेक्षा अधिक झाडे तोडली आहेत. याविरोधात पर्यावरणप्रेमींनी आक्रमक पवित्रा घेतला असून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.
असाही डॉक्टर ! क्रिकेट बेटिंगसाठी बनवायचा आयडी अन् घ्यायचा तीन टक्के
वर्धा : क्रिकेट सामने जेवढे रोमांचक खेळीने गाजतात, तेवढेच ते अलिकडच्या काळात सट्टा बाजारामुळे गाजू लागले आहे. हे चित्र केवळ मोठ्या शहरांतच नव्हे तर लहान गावातही दिसत असल्याचे लपून नाही. दोन वर्षांपूर्वी वर्धा जिल्ह्यातील काही तालुक्यात बेटिंग करणाऱ्या टोळ्या पकडण्यात आल्या होत्या. हा तसाच पण थोडा वेगळा किस्सा. दुबईत आयसीसी चॅम्पियन साठी भारत विरुद्ध न्यूझीलंड असा सामना गाजणार होता. त्यावर मोठ्या प्रमाणात सट्टा खेळल्या गेल्याचा हा गुन्हा.
चंद्रपूर जिल्ह्यातील ५९८ गावातील पाणी प्रदूषित
चंद्रपूर : धुळीच्या प्रदूषणामुळे त्रस्त असलेल्या या जिल्ह्यात भूजल प्रदूषण देखील मोठ्या प्रमाणात आहे. या जिल्ह्यातील ५९८ गावे भूजल प्रदूषणाने बाधित आहे. भूजल प्रदूषित गावात २१ हजार १६८ पिण्याच्या पाण्याचे नमूने तपासले असता फ्लोराईड, नायट्रेट, क्षार, लोहखनिज व जिवाणू बाधित पाणी आढळून आले आहे.
करंजा बंदरात मासळी निर्यातीत वाढ पण मच्छीमारांचे पैसे थकित
उरण : मुंबईच्या ससून बंदराला पर्याय ठरलेल्या उरणच्या करंजा बंदरातील मासळीच्या निर्यातीत वाढ झाली आहे. गेल्या आठ महिन्यांत ३०० कोटी पेक्षा अधिकच्या मासळीची निर्यात झाल्याचे निर्यातदारांचे म्हणणे आहे. या वाढत्या निर्याती बरोबरच मासळीची आवकही वाढली आहे. पण व्यापाऱ्यांनी मच्छीमारांना पैसे देण्यास टाळाटाळ करण्यास सुरुवात केल्याने मच्छीमारांचे पैसे थकित आहेत.
प्रशांत कोरटकरला दणका; ‘त्या’ वक्तव्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश
कथित पत्रकार प्रशांत कोरटकर याने इतिहासकार इंद्रजीत सावंत यांना फोन करून छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह भाषेत वक्तव्ये केली होती. त्यानंतर त्याने दावा केला होता की त्याचा फोन हॅक झाला होता. याबाबतचं कोल्हापूर सत्र न्यायालयाचं निरिक्षण खटल्याच्या नोंदीतून काढून टाकण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानंतर वकील असीम सरोदे यांनी म्हटलं आहे की “कोरटकरची भाषा असभ्य, आक्षेपार्ह व क्रूर होती. त्याची भाषा छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान करणारी व जातीय तेढ निर्माण करणारी होती. “
वडेट्टीवार यांचा खासदार धानोरकरांना इशारा , म्हणाले…
चंद्रपूर : संधी मिळाल्यास लोकसभा निवडणुकीची तयारी करणार, मात्र पक्ष सोडणार नाही. पक्षातीलच काहींनी माझ्या पक्षांतराचा विषय प्रसारमध्यमापर्यंत पोहोचवला. मात्र हे पूर्णतः खोटे आहे. मी काँग्रेसचा खरा शिपाई आहे आणि भविष्यातही राहील. सत्तेसाठी जे पक्ष सोडून गेलेत त्यांची आज काय गत झाली, हे सर्वश्रूत आहे, असे मत काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले.
शिवसेना (ठाकरे) खासदार संजय राऊत म्हणाले, “रवींद्र धंगेकर खरोखर का गेले? हे त्यांनी देवाला स्मरून सांगावं. ते ज्या देवाला मानत असतील त्या देवाला स्मरून सांगावं. ते खरंच विकासकामांसाठी गेलेत का? की कसबा मतदारसंघातील भूखंडामुळे त्यांना काँग्रेस सोडावी लागली. कसबा विधानसभा मतदारसंघातील गणेश पेठेत एक जागा आहे. ती जागा प्रतिभा रवींद्र धंगेकर व यांच्या काही सहकाऱ्यांच्या नावावर आहे. मात्र, ही जागा वक्फ बोर्डाची आहे असं सांगून काही मुस्लिमांना हाताशी धरून भाजपावाल्यांनी हे प्रकरण न्यायालयात नेलं आहे. त्यामुळे प्रतिभा धंगेकर यांच्या डोक्यावर अटकेची टांगती तलवार निर्माण झाली आहे. धंगेकरांनी काँग्रेस सोडावी असं वातावरण तयार करण्यात आलं. अटकेच्या भितीपोटी धंगेकर शिंदे गटास प्यारे झाले.”