Marathi News LIVE Updates : भाजपा आमदार सुरेश धस आणि पंकजा मुंडे यांच्यात राजकीय कलगीतुरा रंगला आहे. हे दोघेही एकमेकांविरोधात पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करणार आहेत. दुसरीकडे सुरेश धस यांचा कार्यकर्ता खोक्या भोसलेला काल (१२ मार्च) बीड पोलिसांनी उत्तर प्रदेशातून अटक केली. त्याला आज बीडमध्ये आणण्यात येणार आहे. त्याच्या चौकशीतून बऱ्याच गोष्टी उघड होण्याची शक्यता आहे. तसंच, विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून विविध मुद्द्यांवर दोन्ही सभागृहात जोरदार खडाजंगी पाहायला मिळतेय. अर्थसंकल्पावर टीका करण्यापासून विविध योजना बंद केल्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं आहे. तर वरळीत होळी साजरी करण्यावर पोलिसांनी मर्यादा आणणल्याने वरळीकरांनी नाराजी व्यक्त केली आहे. या सर्व प्रकरणांवर आज प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे. यासह राज्यातील विविध घडामोडी जाणून घेऊयात.
Maharashtra News Live Today, 13 March 2025 : राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्या!
गुळ पावडर उत्पादन वाढले, गुळ उत्पादन घटले
मजुरांच्या तुटवड्यामुळे गुळाच्या उत्पादनात वेगाने घट होत असून गुळ पावडर करण्याकडे आता लोकांचा कल वाढला आहे. राज्यात जेवढे साखर कारखाने आहेत साधारण तेवढ्याच संख्ये इतके गुळ पावडर उत्पादक आहेत. सविस्तर वाचा…
कल्याण रेल्वे स्थानकात महिला प्रवाशाला शीतपेयात गुंगीचे द्रव्य देऊन लुटले
कल्याण रेल्वे स्थानकात एका महिला प्रवाशाला शीतपेयातून गुंगीचे द्रव्य देऊन या महिलेची शुध्द हरपताच एका भुरट्या चोराने त्यांच्या अंगावरील दोन लाख ३३ हजाराचा सोन्याचा ऐवज लुटून पळ काढला. सविस्तर वाचा…
लाचेप्रकरणी आदिवासी विभागातील लिपीक ताब्यात
शहापूर : वैद्यकीय देयक मंजूरीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सादर करण्याकरीता १५ हजार रुपयांची लाच घेणाऱ्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प विभागाचा वरिष्ठ लिपीक तथा प्रकल्प अधिकारी आणि कनिष्ठ लिपीकाला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे. हरीष मराठे (४७) आणि हेमंत किरपण (३९) अशी त्यांची नावे असून त्यांच्याविरोधात शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.मुरबाड तालुक्यातील शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील एका कर्मचाऱ्याच्या आईच्या आजारपणाचे तीन लाख ७५ हजार रुपयांचे वैद्यकीय देयके डिसेंबर २०२४ पासून प्रलंबित होती. हे देयके मंजूर करण्यासाठी वरिष्ठ लिपीक तथा प्रकल्प अधिकारी हरीश मराठे याने कनिष्ठ लिपिक हेमंत किरपण याच्या मार्फत तक्रारदार यांच्याकडून २३ हजार रुपयांची लाच मागितली होती. यानंतर तक्रारदार यांनी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे ७ मार्चला तक्रार दिली होती. या तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी पडताळणी केली असता, लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार, मंगळवारी पथकाने सापळा रचून हेमंत किरपण याला १५ हजार रुपयांची लाच स्विकारताना रंगेहात पकडले. तर मराठे याला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
हिंगोली जिल्ह्यात कॉग्रेसमधून गळती सुरूच; भाऊ पाटील गोरेगावकर यांच्या पक्षांतरामुळे धक्का
कॉग्रेसमध्ये नवी बांधणी करणारे दमदार नेते अशी दिवंगत राजीव सातव यांची ओळख. पण त्यांच्या निधनानंतर कळमनुरीसह हिंगोली जिल्ह्यातील कॉग्रेस शक्तीहिन होत असल्याचे दिसून येत आहे. आता कॉग्रेसचे भाऊ पाटील गोरेगावकर हेही शिवसेनेमध्ये जाणार आहेत.
डोंबिवलीत शास्त्रीनगर रुग्णालयातील गर्भवती महिलेच्या मृत्युप्रकरणी दोन स्त्रीरोग तज्ज्ञांवर ठपका
कल्याण : कल्याण डोंबिवली पालिकेच्या डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या सुवर्णा सरोदे (२६) या महिलेचा सिझरिन शस्त्रक्रिया केल्यानंतर मृत्यू झाला होता. गेल्या महिन्यात ही घटना घडली होती. या महिलेच्या मृत्यूप्रकरणी बाह्यस्त्रोत संस्थेच्या माध्यमातून शास्त्रीनगर रुग्णालयात कार्यरत असलेल्या स्त्रीरोग तज्ज्ञ डाॅ. मीनाक्षी केंद्रे, स्त्रीरोग तज्ज्ञ डाॅ. संगीता पाटील यांच्यावर निष्काळजीपणाचा ठपका उपायुक्त प्रसाद बोरकर समितीने ठेवला आहे.
चाकरमनी निघाले गावाला, मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी
होळीनिमित्त मुंबईतील चाकरमनी कोकणात जायला निघाले आहे. रस्तेमार्गे जाणाऱ्या प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. मुंबई गोवा महामार्गावरील माणगाव येथे वाहतूक कोंडी झाल्याने गावी जाणाऱ्यांचा वेग मंदावला आहे.
डोंबिवली एमआयडीसीतील मिलापनगरच्या वंदे मातरम उद्यानास सुंदरतेचे पारितोषिक
डोंबिवली : डोंबिवली एमआयडीसीतील मिलापनगर रेसिडेन्ट वेल्फेअर असोसिएशनच्या नियंत्रणाखालील शिळफाटा रस्त्यालगतच्या वंदे मातरम उद्यानास सार्वजनिक उद्यान विभागात नंदनवन सुंदर बाग स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. बालभवन येथील एका कार्यक्रमात मिलापनगर रहिवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी हे पारितोषिक स्वीकारले.
नागपुरात सायकलपटूंनी पूर्ण केले ३०० किलोमीटरचे “ब्रेव्हेट”
नागपूर : नागपूर रँदोन्युअर्सने आयोजित केलेल्या ३०० किलोमीटरच्या ‘नाईट ब्रेव्हेट’ आणि होळी विशेष १०० किलोमीटरच्या ‘ब्रेव्हेट पॉप्युलेअर’मध्ये सर्व सायकलपटूंनी दिलेल्या वेळेत उद्दीष्ट साध्य केले.
सावधान..! दुपारी बाहेर पडताय.. उष्णतेची लाट कायम…
नागपूर : भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार विदर्भात उष्णतेची लाट आली आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यातील तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. राज्यात बुधवारी सर्वाधिक ४१.४ अंश सेल्सिअस तापमान अकोला येथे नोंदविण्यात आले.
गडचिरोलीतही वाघाची शिकार…
नागपूर : बहेलिया शिकाऱ्यांच्या कितीही मुसक्या आवळल्या तरी ते सराईतपणे वाघांची शिकार करत आहे. गडचिरोलीसारख्या नक्षलवाद्यांचे वास्तव्य असलेल्या जिल्ह्यात देखील बहेलिया शिकाऱ्यांनी वाघांची शिकार करून अवयवांची तस्करी केल्याचे समोर आले आहे.
कडोंमपाच्या जनता दरबारातील तक्रारींची ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक, छाननीमधील निवेदनांची जनता दरबारात दखल
कल्याण : कल्याण डोंबिवली पालिकेच्या जनता दरबारात सहभागी होण्यासाठी नागरिकांना यापुढे आपल्या तक्रारी कल्याण डोंबिवली पालिकेच्या ‘केडीएमसी २४ बाय सात’ या उपयोजनवर ऑनलाईन माध्यमातून अगोदर नोंदणीकृत करणे आवश्यक आहे. या तक्रारींची प्रशासनाकडून छाननी झाल्यानंतर या तक्रारी जनता दरबारात घेतल्या जातील, असे कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
व्हायरल व्हिडीओप्रकरणी दादा खिंडकर बीड पोलिसांना शरण
बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच दिवंगत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांचे साडू दादा खिंडकर हे बीड पोलिसांना शरण गेले आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये ते ओमकार सातपुते या तरुणाला मारहाण करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस त्यांच्या मागावर होते. आज ते स्वतःहून पोलिसांसमोर शरण गेले.
Sanjay Raut : “महाकुंभातील गढूळ पाण्यात…”, होळीनिमित्त डीजेवर बंदी आणल्याने संजय राऊतांचा सरकारवर संताप, म्हणाले, “गटारगंगेत…”
वरळी कोळीवाड्यामध्ये होळी धुलिवंदनाच्या पार्श्वभूमीवर डिजेवर बंदी घालण्यात आली आहे. लाऊड स्पीकर लावू न दिल्याने वरळीतील कोळी बांधवांनी सरकारवर नाराजी व्यक्त केली. सरकारला मराठी सणांविषयी इतका आकस का? असा प्रश्न वरळीचे आमदार आदित्य ठाकरेंनीही सरकारला विचारला. प्रदूषणाच्या मुद्द्यावरून ही बंदी घालण्यात आल्याचं सरकारचं म्हणणं आहे. यावरूनच शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे प्रवक्ते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी सरकारवर टीका केली आहे. ते आज माध्यमांशी बोलत होते.
शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांच्या सहकार्याने पूर्ण करणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती; तक्रारी दूर करण्याला प्राधान्य
मुंबई : राज्य सरकारला ‘शक्तीपीठ महामार्ग’ पूर्ण करावयाचा आहे. पण, हा महामार्ग शेतकऱ्यांवर लादायचा नाही. ज्या शेतकऱ्यांचा विरोध आहे, त्यांच्या तक्रारी, अडचणी ऐकून घेऊन अडचणी सोडविल्या जातील, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली.
Maharashtra Live News : "ते १०० शेतकरी भाजपाचे एजंट असावेत", शक्तीपीठवरून संजय राऊतांची टीका
शक्तीपीठ महामार्ग होण्यासाठी १०० शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना निवेदन दिले आहे, असं पत्रकारांनी सांगितल्यानंतर संजय राऊत म्हणाले, "ते १०० शेतकरी भारतीय जनता पक्षाचे एजंट असावे. त्यांच्या माध्यमातून जमिनी खरेदी विक्रीचे व्यवहार सुर असावेत. सामान्य शेतकऱ्याला आपली जमीन द्यायची नाही. मुळात शक्तीपीठाची गरजच काय. आम्ही विरोध करत नाहीय, शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. तुमच्याकडे १०० शेतकरी आले म्हणून चुकीच्या योजनेचं समर्थन होऊ शकत नाही. तुम्ही महाराष्ट्राला पटवून द्या की हा शक्तीपीठ का महत्त्वाचं आहे. काही ठेकेदार तुमच्या मर्जीतील आहे, त्यांना कामं मिळावीत, मालमाल व्हावं. त्या पैशांतून उद्या निवडणुका लढाव्यात, याकरता शक्तीपीठासारख्या योजना आहेत का? असा प्रश्न संजय राऊतांनी विचारला."
अर्थसंकल्पाद्वारे अजित पवारांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. (PC : Maharashtra Assembly Live)
Maharashtra News Live Today, 13 March 2025 : राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्या!