Marathi News Updates : राज्याचे अर्थमंत्री अजित पवार आज (सोमवारी) दुपारी २ वाजता विधानसभेत राज्याचा २०२५-२६ चा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पात कोणत्या घोषणा केल्या जणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबरोबरच मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आज पुन्हा धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केले आहेत. काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी काँगेस सोडण्याबाबत घोषणा केली आहे. त्यानंतर धंगेकर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन शिवसेना पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे. राज्यातील महत्त्वाच्या राजकीय तसेच इतर महत्त्वाच्या घडामोडी आपण येथे जाणून घेणार आहोत.
Maharashtra Live News Update Today, 10 March 2025 : दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर
अर्थसंकल्पात आरोग्य विभागाच्या तोंडाला पुसली पाने! मागितले होते ११,७२८ कोटी मिळाले अवघे ३८२७ कोटी…
आरोग्य विभागाला अर्थसंकल्पात मोठ्या प्रमाणात निधी मिळाला पाहिजे हे प्रत्येक पक्ष मान्य करत असला तरी सत्तेवर आल्यानंतर प्रत्यक्षात अर्थसंकल्पात आरोग्य विभागाला निधी वाटपात तोंडाला पाने पुसली जात असल्याचे मागील काही वर्षातील चित्र यंदाच्या अर्थसंकल्पातही कायमच राहिले. यंदाच्या २०२५-२६च्या अर्थसंकल्पात आरोग्य विभागाने ११,७२८ कोटी रुपयांची मागणी केली होती मात्र प्रत्यक्षात अर्थमंत्री अजित पवार यांनी केवळ ३,८२७ कोटी रुपये आरोग्य विभागासाठी मंजूर केले.
राज्याचा अर्थसंकल्प शेतकऱ्यांची श्रमिकांची निराशा करणारा – डॉ.अजित नवले
राज्याचा अर्थसंकल्प शेतकऱ्यांची,श्रमिकांची निराश करणारा असल्याची टीका मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव डॉ अजित नवले यांनी केली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची मते मिळवण्यासाठी आपले सरकार आले तर शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी दिली जाईल व सोयाबीनला सहा हजार रुपये भाव देऊन सोयाबीनचा दाणा न दाणा खरेदी केला जाईल असे आश्वासन देण्यात आले होते.
बदलापूर: मजीप्रा कार्यालयाच्या दस्त खोलीला आग
बदलापूर: बदलापुरातील मांजर्ली भागात असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयातील दस्त खोलीला आग लागल्याची घटना सोमवारी समोर आली. शॉर्ट सर्किटमुळे ही लागली असण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे. मात्र कागदपत्रांचे यापूर्वीच संगणकीय प्रणालीत रूपांतर करण्यात आल्याने कामकाजावर परिणाम होणार नसल्याची माहिती प्राधिकरणाच्या वतीने देण्यात आली आहे.
पडघा टोलनाक्यावर करारापेक्षा अधिकची वसूली, खासदार बाळ्या मामांचा अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा
ठाणे : मुंबई नाशिक महामार्गावरील पडघा टोलनाक्यावर होणाऱ्या टोल वसूलीविरोधात राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) यांनी संताप व्यक्त केला. बाळ्या मामा यांच्या कार्यकर्त्यांनी मागील तीन दिवसांत टोल नाक्यावरून होणाऱ्या वाहनांचे सर्वेक्षण केले आहे.
“मारल्या होत्या थापा भारी…”, अर्थसंकल्पावर उद्धव ठाकरेंची टीका, लाडकी बहीण योजनेवरही मोठे भाष्य
अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावर जोरदार टीका केली आहे. अजित पवार यांनी आज दुपारी अर्थसंकल्प जाहीर केल्यानंतर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीदरम्यान महायुतीचा जाहीरानामा दाखवत जनतेला दिलेल्या आश्वसणांची आठवण करुन दिली.
गरिब कुटूंबातील शेकडो मुलींना मोफत पाहता आला ‘छावा’ चित्रपट; श्रीकौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासचा अनोखा उपक्रम
ठाणे - चित्रपट सृष्टीत गाजत असलेला छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ चित्रपट पाहण्याची इच्छा सर्वांचीच आहे. परंतू, अनेक कुटूंबांना आर्थिक परिस्थिती अभावी सिनेमागृहात जावून चित्रपट पाहणे शक्य होत नाही. अशाच, कुटूंबातील मुलींसाठी श्रीकौपिनेश्वर सांस्कृतिक न्यास समितीच्या वतीने महिला दिनाचे औचित्य साधून ठाण्यातील इटरनिटी मॉलमध्ये रविवारी छावा चित्रपटाचे मोफत प्रक्षेपण आयोजित करण्यात आले होते.
बुलेट ट्रेनच्या मार्गावरील बेकायदा इमारत हातोडा; कारवाईदरम्यान अधिकाऱ्यांसह पथकाला धक्काबुक्की, विरोध मोडीत काढत पालिकेची कारवाई
ठाणे : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या मार्गात अडसर ठरत असलेली शीळ परिसरातील तळ अधिक एक मजली बेकायदा इमारतीवर ठाणे महापालिकेने सोमवारी पोलिस बंदोबस्तात हातोडा मारला. या कारवाईला सुरूवातीला विरोध झाला आणि यादरम्यान पालिका तसेच पोलिस अधिकाऱ्यांना धक्काबुक्की झाल्याने काही काळ तणावाचे वातावरण होते.
गुन्हेगारांवर 'सूक्ष्म नजर'; दहशत पसरवण्यासाठी शक्तिप्रदर्शन केल्यास…
अकोला : कारागृहातून सुटलेल्या गुन्हेगारांनी पुन्हा गुन्हे करू नये म्हणून त्यांच्यावर सूक्ष्म नजर ठेवली जात असून विशेष खबरदारी घेतली जात आहे. या प्रकरणात गेल्या सव्वा वर्षात १९४ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. समाजात दहशत पसरण्याच्या दृष्टीने कारागृहातून सुटलेल्या गुन्हेगारांनी शक्तिप्रदर्शन केल्यास कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला.
अर्थसंकल्पतील घोषणा: नागपूर विमानतळाचे श्रेणीवर्धन म्हणजे नेमके काय ?
नागपूर : राज्याची उपराजधानी आणि विदर्भाचे औद्योगिक शहर अशी ओळख असलेल्या नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे अत्याधुनिकरण आणि कार्गो हब करण्याचे गेल्या स्वप्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यासाठी येथे दोन धावपट्टी तयार करण्याचे नियोजन आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे खाजगी सहभागातून श्रेणीवर्धन आणि आधुनिकीकरण करण्यात येत आहे.
विवस्त्र करून धिंड काढण्याची महिलेला धमकी - पाच जणांविरोधात गुन्हा
नाशिक - विवस्त्र करून धिंड काढण्याची धमकी देत नातेवाईकांनी एका महिलेस ट्रॅक्टर अंगावर घालून मारण्याचा प्रयत्न करुन विनयभंग केला. शहराजवळील शिलापूर येथे हा प्रकार घडला. न्यायालयाच्या आदेशान्वये या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात पाच जणांविरूध्द विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कांदा निर्यात शुल्क कमी करण्यासाठी शेतकऱ्यांचे पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन
केंद्र सरकारने कांद्यावर लावलेले २० टक्के निर्यात शुल्क तातडीने कमी करावे या मागणीसाठी नाशिकच्या लासलगाव मध्ये शेतकऱ्यांनी पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईलने आंदोलन सुरू केले आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव येथे असलेल्या पाण्याच्या टाकीवर १० ते २० शेतकऱ्यांनी चढून हे आंदोलन सुरू केले असून या आंदोलनामुळे काही काळ लिलाव ठप्प झाले असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून आंदोलकांची समजूत घालण्याचा प्रयत्न सुरू आहे.
ओझर येथे घरफोडीतील चौघे ताब्यात; सहा लाखांचा मुद्देमाल जप्त
नाशिक - ओझर येथे घरफोडी करून चारचाकी वाहन चोरी करणाऱ्या टोळीतील चौघांना नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेकडून १२ तासात अटक करण्यात आली. संशयितांकडून सहा लाख ३२ हजार ५६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
‘एमपीएससी’चे सुरू तरी काय? सहा महिने उलटूनही मुलाखती नाही, पुन्हा स्वप्नील लोणकर प्रकरणाच्या पुनरावृत्तीची…
नागपूर : एमपीएससीच्या गलथान कारभाराला कंटाळून स्वप्नील लोणकर या विद्यार्थ्याने गेल्या वर्षी आत्महत्या केली. त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून पुन्हा अशाच प्रकारची पुनरावृत्ती सुरू असल्याचा आरोप होत आहे. सहा महिन्यांचा कालावधी उलटूनही अद्याप मुलाखतीचा कार्यक्रम जाहीर न झाल्याने तीन वर्षांपासून उमेदवर एकाच परीक्षेच्या प्रक्रियेत अडकून आहेत.
सविस्तर वाचा...
३१ मार्च पासून अमरावतीतून विमानसेवा सुरू होणार? अर्थसंकल्पातील घोषणेमुळे आनंद
अमरावती : येथील बेलोरा विमानतळाचे काम पूर्ण झाले असून ३१ मार्च २०२४ पासून प्रवासी विमानसेवा सुरू करण्याचे सरकारचे नियोजन आहे, अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात केल्यानंतर अमरावतीत आनंद व्यक्त केला जात आहे.
तरुणींना बघून तरुणाने रस्त्यावरच केले अश्लील कृत्य
नागपूर : राज्याच्या गृहमंत्र्यांच्या शहरात कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे काढणारी घटना समोर आली आहे. वर्धा मार्गावरील सुशोभिकरण केलेल्या फुटपाथवर बसलेल्या तरुणींना बघून एका युवकाने कानाला मोबाईल लावून अश्लील कृत्य केले. स्वत:ची पँट काढून तरुणींकडे बघून अश्लील इशारे केले.
वृत्तपत्रापासून तयार केलेल्या पोशाखात ‘रॅम्प वॉक’
नागपूर : महापालिकेच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या अनुषंगाने शनिवारी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिला उद्योजिका मेळाव्यामध्ये ‘फॅशन शो’चे आयोजन करण्यात आले होते. या फॅशन शोमध्ये वृत्तपत्रापासून तयार केलेली पोशाख परिधान करुन ‘रॅम्प वॉक’ करणारे तरुण-तरुणींनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. महापालिकेच्या स्वच्छ भारत मिशन आयईसी चमूद्वारे पुढाकार घेऊन जुन्या वर्तमानपत्रांपासून सुंदर पोशाख तयार केले.
नागपूर : काही तरुण-तरुणी बाईकवर लक्ष्मीभवन चौक आणि धरमपेठ चौकात पोहचल्या. काही वेळातच शेकडोंच्या संख्येने तरुण-तरुणी चौकात गोळा झाले. त्यांनी आनंद व्यक्त करण्यासाठी फटाके फोडण्यास सुरुवात केली. काहींनी कारच्या टफवर चढून नाचने सुरु केले तर काही चौकातच फेर धरुन नाचायला लागले. काहींनी फटाके पेटवले आणि हवेत फेकले. काही तरुणींच्या अंगावर पेटते फटाके पडले. मात्र, तरुणाईचा गोंधळ सुरुच होता.
नागपुरात उन्हाचा तडाखा… महापालिकेकडून उष्माघातापासून वाचण्यासाठी…
नागपूर : राज्यासह विदर्भातील सर्वाधिक तापमान असलेल्या जिल्ह्यात नागपूरचाही क्रमांक वरचाच आहे. दरम्यान नागपुरात आता हळू- हळू उन्हाचा तडाखा वाढत आहे. नागरिकांना उष्माघातापासून वाचवण्यासाठी महापालिकेकडून काही उपाय करण्यात आले आहे. या उपायांबाबत आपण जाणून घेऊ या.
Chhatrapati Sambhajinagar Accident : उसाचा ट्रक उलटला, दबून सहा तरुण कामगार ठार; ११ जण जखमी
Pishore Kannad Road Accident Update : छत्रपती संभाजीनगर : ट्रक उलटल्याने त्यातील उसाच्या मोळ्यांखाली दबून सहा तरुण कामगारांचा मृत्यू झाला. तर ११ जण जखमी झाले. सोमवारी पहाटे ही घटना पिशोर ते कन्नड मार्गावरील खाडी चंदन नाल्याजवळ घडली. किसन धर्मु राठोड (वय ३०), मनोज नामदेव चव्हाण (२३), कृष्णा मुलचंद राठोड (३०), मिथुन चव्हाण (२६), विनोद नामदेव चव्हाण (२८, सर्व रा. सातकुंड, ता. कन्नड) व ज्ञानेश्वर देवीदास चव्हाण (३६, रा. बिलखेडा ता. कन्नड), अशी मृतांची नावे आहेत.
शेततळ्यात बुडून दोन मुलांचा मृत्यू
छत्रपती संभाजीनगर : शेततळ्यात पोहण्यासाठी उतरलेल्या तीन मुलांपैकी दोघांचा बुडून मृत्यू झाला. तर एका मुलाला वाचवण्यात यश आले. ही घटना पैठण तालुक्यातील बिडकीनजवळील शेकटा शिवारात रविवारी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. प्रणव दीपक दाभाडे (वय ०७) व आरुष दत्तात्रय दाभाडे (वय ०५), अशी मृत मुलांची नावे आहेत. आकाश अशोक गावंदे (१३) याला वाचवण्यात यश आले. हे तिन्ही मुले मदन गवांदे यांच्या शेततळ्यात पोहण्यासाठी उतरली होती.
मेळघाटात होळी कशी साजरी केली जाते?, कोण आहे मेघनाथ बाबा?
अमरावती : शुक्रवारी १४ मार्च रोजी धूलिवंदन मोठ्या उत्साहात साजरे होणार आहे. देशभरात वेगवेगळया भागात हा रंगोत्सव साजरा केला जाईल. याप्रमाणेच होळी साजरी करण्याची एक पद्धत सातपुडा पर्वत रांगेत वसलेल्या मेळघाटात अस्तित्वात आहे. सलग पाच दिवस उदरनिर्वाहाच्या कामांना कात्री लावून आदिवासी बांधव होळीच्या रंगात न्हाऊन निघतात. पूर्वापार शिरस्ता व रितींचा यात समावेश असतो.
अर्थसंकल्पात तब्बल सात वेळा घोषणा, प्रत्यक्षात प्रकल्प उभारणीचे नाही
नागपूर : तब्बल सात अर्थ संकल्पात घोषणा होऊनही विदर्भातील संत्रा पट्टा अशी ओळख असलेल्या वरुड-मोर्शी पट्ट्यात सरकारकडून एकही संत्री प्रकल्प उभारण्यात आला नाही, शासनाकडून केलेल्या घोषणा फोल ठरल्या आहेत.अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.
गडकरी, फडणवीस ' युगपुरुष ', रामदेवबाबांची स्तुतीसुमने
नागपूर: भूमिपूजनानंतर दहा वर्ष रखडलेला योगगुरू रामदेवबाबा यांच्या पतंजली उद्योग समुहाच्या संत्री प्रक्रिया प्रकल्पाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रामदेवबाबा यांच्या उपस्थित रविवारी नागपुरात पडले. हा समारंभ लक्षात राहिला तो रामदेवबाबांनी गडकरी, फडणवीस यांच्यावर उधळलेल्या स्तुतीसुमनांमुळे. बाबांनी तर गडकरी, फडणवीस ' युगपुरुष ' असल्याचे जाहीर करून टाकले.
राज्यात आणि देशात महिला अत्याचार वाढत आहेत महिला आज कुठेही सुरक्षित नाहीत याचा निषेध करत आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी रस्त्यावर उतरुण आंदोलन केले आहे. मंत्र्यांचे तर खरे सत्कार केले पाहिजेत रोज उठायचे आणि महिलांच्या बाबतीत अपशब्द काढायचे काम करत आहेत, गुलाबराव पाटील यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करते, पर्समध्ये रामपुरी चाकू ठेवा, मिरची पावडर तेव्हा आणि तुमचे तुम्ही संरक्षण करा.
लाडक्या बहिणींना मत मिळवण्यासाठी वेगवेगळी प्रलोभन देण्यात आली, लाडक्या बहिणींच्या आयुष्यात मानधन वाढ करून देऊ असं म्हटले होते, आज अजित पवार अर्थसंकल्प सादर करत आहेत, दिलेली संपूर्ण आश्वासन या सरकारने पूर्ण करावी एवढीच अपेक्षा आहेत.
नंदुरबारमध्ये १००१ दाम्पत्यांच्या हस्ते महाकुंभ जलकलशाचे पूजन
नंदुरबार : प्रयागराज येथील महाकुंभ जलकलशाची महाआरती १००१ दाम्पत्यांच्या हस्ते येथे करण्यात आली. यावेळी भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.या अध्यात्मिक सोहळ्याने भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. प्रयागराज येथील महाकलशाची महाआरती करण्याचा मान राज्यात नंदुरबारला प्रथम मिळाला.
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याचे दर…सराफा बाजार उघडताच…
नागपूर: सोन्याचे दर नियंत्रणात येत नसल्याचे चित्र आहे. सोमवारी (१० मार्च २०२५) आठवड्याच्या पहिल्याच दिवशी नागपुरातील सराफा बाजार उघडताच सोन्याचे दर बघून ग्राहकांमध्ये पुन्हा चिंता वाढली आहे. सराफा बाजारातील सोमवारच्या सोन्याच्या दराबाबत आपण जाणून घेऊ या.
पाच वर्षांच्या तुलनेत बीएडचा प्रतिसाद वाढला, प्रवेश परीक्षेसाठी १ लाख १६ हजार ५०० विद्यार्थ्यांची नोंदणी
मुंबई : शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्रातील पदवीसाठी आवश्यक असलेल्या बी.एड (सामान्य व विशेष), बीएड-एमएड, एमएड आणि एम.पी.एड या अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्ररीक्षेला नोंदणीला विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
‘महिलांचे अनोखे रूप, श्रमदानातून जलसंवर्धन’, ‘जलतारा’तून पाणी पातळी वाढविण्याचे प्रयत्न
अकोला : वाशीम जिल्ह्यात जलस्त्रोताचे प्रमाण अत्यल्प आहे. भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता नवीन नदी, तलाव निर्माण होणे शक्य नाही. परिस्थितीवर मात करून पाण्याची पातळी वाढवणे गरजेचे आहे. यासाठी जलतारा योजना उपयुक्त ठरणार असून वाशीम जिल्ह्यामध्ये १० लाखापेक्षा जास्त शोषखड्डे निर्माण केली जाणार आहेत.
मेगा पदभरती : कृषी विद्यापीठांमध्ये प्रकल्पग्रस्तांना मोठी संधी, आजपासून ऑनलाइन…
अकोला : राज्यातील कृषी विद्यापीठांमधील रिक्त पदांपैकी ५० टक्क्यांची प्रकल्पग्रस्तांमधून पदभरती करण्यास शासनाने मंजुरी दिली. त्यानुसार डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात गट क व ड संवर्गातील एकूण ६८० पदे भरली जाणार आहेत. त्यासाठी आज, १० मार्चपासून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. प्रकल्पग्रस्तांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली.
आगारप्रमुखावर कारवाईसाठी शेगाव बस स्थानकासमोर ST कर्मचाऱ्यांचे आमरण उपोषण
बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव एसटी आगाराचे प्रमुख गोविंद जवंजाळ व आणखी तीन कर्मचाऱ्यांच्या विरोधात एसटी बस महिला वाहकाच्या विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल असताना बदली किंवा त्यांच्या विरुद्ध एसटी प्रशासनाने कुठलीही कारवाई केली नसल्याने त्यांच्याविरुद्ध कारवाई व्हावी आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध समस्यांचे निराकरण व्हावे यासाठी मागील चार दिवसांपासून शेगाव बस स्थानकासमोर एसटी कर्मचाऱ्यांचे आमरण उपोषण सुरू आहे. विभाग नियंत्रक या आरोपींच्या बचावासाठी प्रयत्न करीत असल्याचा आरोप करीत जोपर्यंत कारवाई होत नाही तेव्हा पर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा विदर्भ एसटी कामगार संघटनेचे विदर्भ संघटक प्रमोद पोहरे यांनी दिला आहे
Maharashtra Live Update