Marathi News Live Updates, 09 October 2024 : महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक येत्या काही दिवसांमध्ये जाहीर होणार आहे. त्यामुळे राज्यातील सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीला जोरदार सुरुवात केली आहे. यातच महाविकास आघाडी आणि महायुतीमधील पक्षांमध्ये विधानसभेच्या जागावाटपासंदर्भात खलबतं सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर आज महायुतीची महत्वाची बैठक देखील पार पडणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत महाविकास आघाडी आणि महायुतीचे जागावाटपही जाहीर होण्याची शक्यता आहे. अशातच मंगळवारी हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमधील विधानसभेचा निकाल जाहीर झाला. या निवडणुकीत हरियाणामध्ये भाजपाला मोठं यश मिळालं. भाजपाला बहुमत मिळाल्यामुळे आता हरियाणात सलग तिसऱ्यांजा भाजपाचं सरकार स्थापन होईल. तसेच जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेसला मोठं यश मिळालं आहे. दरम्यान, या निवडणुकीनंतर आता महाराष्ट्राच्या राजकारणामधूनही प्रतिक्रिया समोर येत आहेत. यासह राज्यातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर.
Maharashtra Breaking News Live Today, 09 October 2024 : महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर
पुणे : जन्म-मृत्यू नोंदणी आणि दाखले देण्यासाठीची ऑनलाइन प्रणाली बिघडल्याने नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. याबाबत केंद्राकडे लेखी तक्रार करण्यात आली आहे. मात्र, त्यात अद्यापही सुधारणा झालेली नाही. पालिकेच्या कर्मचाऱ्यांना नागरिकांचा रोष त्यामुळे सहन करावा लागत आहे.
हरियाणाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मोठं यश मिळालं तर काँग्रेसला मोठा धक्का बसला. त्यानंतर आता खासदार संजय राऊत यांनी म्हटलं की, “हरियाणातील पराभव हा दुर्देवी आहे. मात्र, यातून आम्हाला खूप गोष्टी शिकता येतील. देशातील निवडणुका आम्हाला एकत्र लढाव्या लागतील. कुणी स्वत:ला मोठा भाऊ, छोटा भाऊ समजू नये. लोकसभेतील यश हे इंडिया आघाडीचे यश. मात्र, हरियाणातील निकालाचा कोणताही परिणाम महाराष्ट्रात होणार नाही. पण काँग्रेसलाही एक भूमिका घ्यावी लागेल”, असा इशारा संजय राऊतांनी दिला.
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा उद्या बुधवारी दिवसभर मुक्काम असताना त्यांच्यासमोर जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक मतदारसंघात महायुती अंतर्गत उमेदवारी मिळण्यावरून सुरू झालेली धुसफूस रोखण्याचे कडवे आव्हान असणार आहे.
सांगली : जत तालुक्यात दोन ठिकाणी करण्यात आलेली गांजा लागवड उघडकीस आणून पोलिसांनी सुमारे ५३ लाखांचा गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी दोन शेतकऱ्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बिळूर (ता. जत) येथील कलाप्पा भावीकट्टी यांच्या मालकीच्या शेतात गुरूबसू भावीकट्टी याने तुरीच्या शेतात गांजा लागवड केली असल्याची माहिती पोलिसांना गोपनीय सूत्रांकडून समजली. या माहितीच्या आधारे उपअधीक्षक सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने रानात छापा टाकला. यावेळी तुरीच्या शेतात गांजाची झाडे आढळून आली. पोलिसांनी सर्व झाडे जप्त केली असून त्याचे वजन ४७२ किलो ३४३ ग्रॅम झाले. याचे मूल्य ४७ लाख २३ हजार ४३० रुपये आहे.
सांगली : सांगली मिरजेसह कोल्हापूर जिल्ह्यात विविध ठिकाणी दुचाकींची चोरी करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून साडेसहा लाखांच्या २३ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. दोघेही तासगाव तालुक्यातील असून पाळत ठेवून दुचाकींची चोरी करण्याची पध्दत त्यांनी अवलंबली. त्यांच्याकडे दुचाकीच्या चाव्याही आढळून आल्या.
सांगली : महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या तरुणीवर लैंगिक अत्याचार करून त्याचे चित्रण करत त्याआधारे पुन्हा अत्याचार करण्याचा प्रकार सांगलीत समोर आला. या प्रकरणी संशयिताला अटक करण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी मंगळवारी सांगितले.
मुंबई : वायदे बाजारात (शेअर मार्केट) गुंतवणीच्या नावाखाली बनवट लिंक पाठवून कांदिवलीतील एका व्यावसायिकाची अज्ञात आरोपींनी सव्वा कोटी रुपयांची सायबर फसवणूक केली आहे.
पिंपरी- चिंचवड : बुलेट चालकाला चारचाकी चालकासोबत वाद घालणे चांगलेच महागात पडले आहे. अलंकापूरम ते देहू फाटा रोडवर घडलेल्या घटनेत बुलेट चालकाच्या पाठीमागे बसलेल्या तरुणाला आपला हात गमवावा लागला आहे.
मुंबई : महाराष्ट्र महानगरपालिका कायद्यांतर्गत महानगरपालिका आणि त्यांच्या आयुक्तांना विशेष अधिकार आहेत. तथापि, सार्वजनिक सुविधांशी तडजोड करून विकासकांच्या फायद्यासाठी या अधिकारांचा वापर केला जाऊ शकत नाही, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले.
हरियाणाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मोठं यश मिळालं तर काँग्रेसला मोठा धक्का बसला. त्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं की, "हरियाणातील पराभव हा दुर्देवी आहे. मात्र, यातून आम्हाला खूप गोष्टी शिकता येतील. देशातील निवडणुका आम्हाला एकत्र लढाव्या लागतील. कुणी स्वत:ला मोठा भाऊ, छोटा भाऊ समजू नये. लोकसभेतील यश हे इंडिया आघाडीचे यश. मात्र, हरियाणातील निकालाचा कोणताही परिणाम महाराष्ट्रात होणार नाही. पण काँग्रेसलाही एक भूमिका घ्यावी लागेल", असा इशारा संजय राऊतांनी दिला.
"हरियाणाच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात नक्कीच भाजपा आणि महायुतीला फायदा होईल. हरियाणात भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन होईल. हरियाणा तो सिर्फ झांकी है, महाराष्ट्र अभी बाकी है, महाराष्ट्रात येणाऱ्या काळात महायुतीचे सरकार स्थापन झालेलं आपल्याला पाहायला मिळेल", असं म्हणत भाजपा नेते आशिष देशमुख यांनी महाविकास आघाडीला इशारा दिला आहे.
"हरियाणाच्या विजयाबद्दल भारतीय जनता पक्षाला शुभेच्छा. त्यांनी जनतेचा विश्वास जिंकला. काँग्रेसची ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीबरोबर थेट लढत होते त्या ठिकाणी तिथं काँग्रेस कमजोर होते. त्यामुळे काँग्रेसने आपल्या रणनीतीचा विचार करावा", असं खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी म्हटलं आहे.