आप्पासाहेब शेळके

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रात्रीचे अडीच वाजले होते…शशिकला भिंगारे औरंगाबाद शहरातील सेतू केंद्राबाहेर बसल्या होत्या…सर्वत्र अंधार…आणखी किती वेळ केंद्राबाहेर बसावे लागणार याची शशिकला भिंगारेंना कल्पनादेखील नव्हती…पण चेहऱ्यावर दिसत होती ती काळजी…किती वेळ बसावे लागेल यापेक्षा पावसाअभावी पेरणी वाया गेल्याने ओढावलेले संकट यामुळे त्या चिंतेत होत्या…डिजिटल इंडियाचे स्वप्नरंजन सुरु असताना पीक विम्यासाठी रात्री अडीच वाजेपर्यंत सेतू केंद्रावर थांबलेल्या महिलेची ही व्यथा. ऑनलाईन अर्ज भरताना तांत्रिक अडचणी येत असल्याने औरंगाबादमधील सेतू केंद्राबाहेर रात्रीदेखील शेतकऱ्यांची गर्दी असल्याचे चित्र यानिमित्ताने दिसून आले.

पीक विमा भरण्यासाठी दोन दिवस शिल्लक असल्याने आता बँक आणि सेतू केंद्राबाहेर रांगा लागल्या आहेत. कधी सर्व्हर डाऊन तर कधी इंटरनेट बंद अशा असंख्य तांत्रिक अडचणींचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. त्यामुळे पीक विम्यासाठी शेतकरी रात्रीपासूनच रांगेत उभे राहत आहेत. गावात किंवा तालुक्याऐवजी शेतकरी आता शहरांकडे येत आहेत. औरंगाबादमध्ये आलेल्या अशाच काही शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेण्याचा ‘लोकसत्ता ऑनलाईन’ने प्रयत्न केला.

जालना जिल्ह्यातील दुनगाव येथून ७० किलोमीटरचा प्रवास करुन शशिकला भिंगारे औरंगाबादमध्ये आल्या होत्या. रात्री अडीचपर्यंत त्या जयभवानी नगरमधील सेतू केंद्राबाहेरच बसल्या होत्या. तर बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातून रामप्रसाद आहेरही औरंगाबादमध्ये आले होते. औरंगाबादपूर्वी त्यांनी गेवराईत दोन वेळा हेलपाटे मारले. पण सर्व्हर बंद असल्याचं कारण दुकानदाराने दिले. शेवटी विमा भरण्यासाठी दोन दिवसच शिल्लक असल्याने आहेर औरंगाबादमध्ये आले. पण औरंगाबादमध्येही चित्र काही वेगळं नाही हे आहेर यांच्या लक्षात आले. औरंगाबादमध्येही अर्ज भरताना तांत्रिक अडचणी येत होत्या. सेलूतील दत्ता गायकवाड आणि पाथरी कमलाकर शिंदे यांच्या वाट्यालाही असाच अनुभव आला. दिवसा काम आणि रात्री पीक विम्यासाठी रांग अशी दुहेरी कसरत या शेतकऱ्यांना करावी लागत आहे. ‘पाऊस पडत नाही, अन्यथा आम्हाला रात्रीचा हा खटाटोप करावा लागला नसता’ अशी खंतच आंबडमधील झाकिर पठाण यांनी व्यक्त केली. पठाण हे सकाळी सात वाजल्यापासून ते रात्री दोन पर्यंत सेवा केंद्रात होते. पण त्यांचा नंबर काही लागला नव्हता.

पीक विमा अर्ज भरताना सुरु झालेला हा जाच अर्ज भरल्यानंतरही सुटेल याची शाश्वती नाही. केज तालुक्यातील प्रमोद कुलकर्णी यांनी त्यांची व्यथा मांडली. पीक विमा भरण्यासाठी मी केज गाठले. ऑफलाइन अर्ज बरण्यासाठी तिथे जत्रेचे स्वरुप होते. रात्री अडीचपर्यंत जागून त्यांनी विमा भरला खरा पण अर्ज भरल्यावर हाती आलेल्या प्रिंटमध्ये जिल्हा आणि तालुका चुकला होता. विशेष म्हणजे अर्ज भरताना ही चुक झाली नव्हती असा दावा कुलकर्णींनी केला. सर्व्हर डाऊन झाल्याने एकच फॉर्म दोन ते तीन वेळा भरावा लागत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली.

ऑनलाईन पीक विमा भरण्यासाठी औरंगाबादसारख्या शहरात तांत्रिक अडचणी यतेता. मग खेडेगाव आणि तालुक्यांमध्ये काय परिस्थिती असेल असा प्रश्न उपस्थित होत आहे. डिजिटल इंडिया, स्मार्ट सिटी अशा घोषणा गाजावाजा करत केल्या जातात. पण प्रत्यक्षात वस्तूस्थिती काय आहे हे ऑनलाईन पीक विमा भरताना दिसून येते. त्यामुळे अशा घोषणा करण्यात मश्गूल असलेल्या सत्ताधाऱ्यांनी प्रत्यक्षात काम करुन शेतकऱ्यांसाठी अच्छे दिन आणावेत अशी भावना शेतकरी व्यक्त करत आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra online crop insurance farmers of villages facing issues of internet connectivity in aurangabad