Maharashtra NCP News : शरद पवार यांच्या राजीनामा नाट्यापासून राष्ट्रवादीत सुरु झालेल्या नाराजी नाट्याचा शेवट अजित पवार यांच्या बंडाने झाला. अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यामुळे महाराष्ट्रातील राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. या ९ आमदारांवर राष्ट्रवादीकडून अपात्रतेची कारवाई सुरु केली आहे. यासह विविध घडामोडी आपण जाणून घेणार आहोत…
Maharashtra News Updates : महाराष्ट्रातील प्रत्येक राजकीय घडामोड एका क्लीकवर…
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत केलेल्या बंडाला एक वर्ष पूर्ण झालं आहे. तोच अजित पवारांनी ८ आमदारांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड केलं आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह महाराष्ट्रातील राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. अशातच, शरद पवारांनी ४० वर्षापूर्वी केलेल्या बंडाची चर्चा पुन्हा रंगू लागली आहे. यावरून रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना लक्ष्य केलं आहे.
अजित पवारांनी न विचारता शपथविधी घेतला, असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं. याबद्दल गोपीचंद पडळकर यांना बारामतीत विचारण्यात आलं. त्यावर गोपीचंद पडळकर यांनी सांगितलं की, “हा त्यांच्या पक्षातील अंतर्गत प्रश्न आहे. त्यांची भूमिका एका दिवसात समोर येईल असं नाही. पण, भाजपाशिवाय पर्याय नाही. मग तो विकासाच्या, लोकांच्या न्याय देण्याच्या दृष्टीने असो.”
अजित पवारांनी रविवारी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. अजित पवारांसह ९ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह राज्यातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. यावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाष्य केलं आहे. “राष्ट्रवादीतून बाहेर गेलेले सर्व लोक सहकारी नाहीत, तर कुटुंबातील लोक आहेत,” अशी भावनिक प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी व्यक्त केली.
अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीतील ९ आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये रविवारी ( २ जुलै ) मंत्रीपदाची शपथ घेतली. यात ईडीच्या रडारावर असलेल्या हसन मुश्रीफ यांचाही समावेश आहे. अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष भ्रष्टाचारी असल्याची टीका केली होती. तर, किरीट सोमय्यांसह भाजपाच्या नेत्यांनीही राष्ट्रवादीवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अजित पवार यांच्यासह काही आमदारांनी काल शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आणि अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे कराड येथील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन करण्यासाठी निघाले आहेत.आमदार रोहित पवार, खासदार वंदना चव्हाण, पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह असंख्य कार्यकर्ते सोबत आहेत.
२०१९च्या विधानसभा निवडणुकीपासून राज्यात धक्कादायक राजकारणाची पडलेली परंपरा कायम राहिली आहे. अजित पवार यांनी बंड करीत भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादीने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारला पाठिंबा दिल्याचे अजित पवार यांनी जाहीर केले. लगेचच पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला.