Mumbai Maharashtra : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. महायुतीला अपेक्षपेक्षा खूपच कमी जागा मिळाल्यानंतर अजित पवार यांच्या उपयुक्ततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. संघाने थेट ऑर्गनायझर या साप्ताहिकात प्रतिकूल मत नोंदविल्यानंतर आता महायुतीत चलबिचल सुरू झाली आहे. त्यातच एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंच्या तथाकथित गूप्त भेटीनंतर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये श्रेयवादाचे राजकारण सुरू असून आतापासूनच विधानसभेच्या जास्तीत जास्त जागा पारड्यात पडून घेण्यासाठी नेत्यांकडून राजकीय विधाने केली जात आहेत. राज्याचे पावसाळी अधिवेशन २७ जून पासून सुरू होणार असल्यामुळे या राजकीय धुमशानाचे पडसाद विधीमंडळात उमटल्याचे पाहायला मिळू शकतात. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सांगली लोकसभेचे शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांना अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्याकडून पराभव सहन करावा लागला. यानंतर सांगलीचा वादावर पडदा पडेल, असे चिन्ह असतानाच आता चंद्रहार पाटील यांनी सांगलीतील विधानसभेच्या दोन जागांवर निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. हे विधानसभा मतदारसंघ आम्हाला न मिळाल्यास त्याची जबर किंमत मोजावी लागेल, असेही त्यांनी सांगितले.