Today’s Live News Updates : देशभरात लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. विविध पक्षांची वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. राजकीय पक्षांकडून तिकीट मिळालेल्या आणि अपक्ष निवडणूक लढणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी प्रचार करण्यास सुरुवात केली आहे. दिवसभरात अशा बातम्यांवर आपलं लक्ष असेल. तसेच बहुसंख्य पक्षांनी अद्याप त्यांचे उमेदवार जाहीर केले नाहीत. तसेच युत्या-आघाड्यांमध्ये जागावाटपावर चर्चा चालू आहे. या जागावटपाच्या चर्चा, उमेदवारांच्या घोषणांवर आपली नजर असेल. दिवसभरातल्या राजकीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्यांचा आढावा आपण या न्यूज लाईव्ह ब्लॉगद्वारे घेणार आहोत.
Maharashtra Live News Updates 21 March 2024 : राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्या
मुंबई : गेली दोन टर्म उत्तर मध्य मुंबईत काँग्रेस पक्षाकडून लोकसभेची निवडणूक लढावणाऱ्या प्रिया दत्त आहेत कुठे असा प्रश्न विचारला जात आहे. प्रिया दत्त या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाणार असल्याचीही चर्चा आहे. मात्र प्रत्यक्ष दत्त यांनीच ही शक्यता फेटाळून लावली आहे.
पुणे : राज्यातील रस्त्यावर पडलेले खड्डे निदर्शनास आणून देण्यासाठी नागरिकांनी ऑनलाइन तक्रारी कराव्यात. ही तक्रार संबंधित अभियंत्याकडे जाऊन रस्त्यावरील खड्डे भरणे आदी कामे तातडीने करून पुन्हा संबंधित कामाचे छायाचित्र अपलोड करून तक्रारदार नागरिकांना संदेशाद्वारे कळविण्यात येईल, अशी कल्पना घेऊन मोबाइल ॲप तयार करण्यात आले होते. मात्र, यथावकाश हे ॲप बंद झाले आहे.
पुणे : कारागृहातील बंदीजनांना व्यक्तिमत्त्व विकासाच्या दृष्टीने शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक, ऐतिहासिक, विज्ञान विषयातील प्रसिद्ध पुस्तके संगणकावर पीडीएफ स्वरुपात वाचनासाठी उपलब्ध व्हावीत, या उद्देशातून येरवडा मध्यवर्ती कारागृहामध्ये ई-लायब्ररीची सुविधा सुरू करण्यात आली आहे.
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यात येत्या २८ एप्रिल रोजी होणारी ‘महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४’, तसेच १९ मे रोजी होणाऱ्या ‘समाज कल्याण अधिकारी गट ब’, ‘इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट ब’ या परीक्षांचा समावेश असून, परीक्षेच्या सुधारित तारखा यथावकाश जाहीर करण्यात येणार आहेत.
कोल्हापूर : शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे आणि कोल्हापूरचे श्रीमंत शाहू महाराज यांची आज येथील नवीन राजवाड्यात भेट झाली. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी शाहू महाराज यांना जाहीर झाल्याचे उद्धव ठाकरे यांनी घोषित केले.
पनवेल : शुक्रवारी जागतिक जल दिवस सर्वत्र साजरा केला जात असताना पनवेलच्या काही भागात मागील दोन दिवसांपासून पिण्यासाठी घरात पाणी मिळत नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. तसेच शुक्रवारी सिडको मंडळाच्या पाणी पुरवठा विभागातर्फे कामोठे येथे जलबचतीचा संदेश सामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी जागतिक जलदिनानिमित्त प्रभात फेरीचे आयोजन केले आहे. मात्र दोन दिवसांपासून पनवेल शहरासह नवीन पनवेल आणि कळंबोली या वसाहतींमध्ये पिण्यासाठी पाणी पुरवठा नसताना पाणी बचतीपूर्वी पिण्यासाठी पाणी तरी द्या अशी मागणी पोटतिडकीने गृहिणींकडून होत आहे.
नाशिक : सिन्नर तालुक्यातील मुसळगाव औद्योगिक वसाहतीत सुरक्षा रक्षकाला चाकुचा धाक दाखवत चारचाकी वाहन चोरुन एटीएम फोडणाऱ्या गुन्हेगारास ग्रामीण पोलिसांची स्थानिक गुन्हे शाखा आणि सिन्नर औद्योगिक वसाहत पोलिसांच्या संयुक्त कारवाईत अटक करण्यात आली.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात मागील दोन वर्षांपासून रस्त्याकडेला उभ्या केलेल्या मोटारीची काही क्षणात काच फोडून त्या मोटारीतील मुल्यवान ऐवज चोरण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. सविस्तर वाचा…
नंदुरबार : शहादा येथील राज्य परिवहन महामडंळातील वाहक राजेंद्र मराठे यांच्या हत्येची उकल करण्यात नंदुरबार पोलिसांना यश आले असून कौटुंबिक वादातून जावयानेच सासऱ्याच्या हत्येचा कट रचल्याचे उघड झाले. सुमारे तीन लाख रुपयांची सुपारी हत्येसाठी देण्यात आली होती.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत ते म्हणाले, दिल्लीमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय चर्चा सुरू झाली आहे. मनसे महायुतीमध्ये सहभागी होईल अशी घोषणा लवकरच होऊ शकते. तसं झाल्यास आम्ही त्यांचं स्वागत करू. जे घटक पक्ष महायुतीत येतील त्यांचे स्वागत करू.
शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूरमध्ये जाऊन शाहू महाराज द्वितीय यांची भेट घेतली. कोल्हापूरच्या शाहू पॅलेस येथे ही भेट झाली. शाहू महाराज हे कोल्हापूरमधून लोकसभा निवडणूक लढणार आहेत. ते महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार असतील. ही भेट लोकसभेसंदर्भात असल्याचं सांगण्यात आलं आहे.
नाशिक : लोकसभा निवडणुकीत जागा वाटपावरून घटक पक्षातील पदाधिकाऱ्यांकडून सुरू असणाऱ्या आरोप-प्रत्यारोपांमुळे महायुतीची प्रतिमा मलीन होत असून मतदारांमध्ये चुकीचा संदेश जात आहे.
गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याच्या नावाखाली अनेक गुंतवणुकदारांची फसवणूक केल्याप्रकरणातील आरोपी अंबर दलाल विरोधात मुंबई पोलीसांनी लुक आऊट सर्क्युलर (एलओसी) जारी केले आहेत. सविस्तर वाचा…
राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने नीट पीजी २०२४ परीक्षेच्या वेळापत्रकात बदल केला आहे. सुधारित वेळापत्रकानुसार नीट पीजीची परीक्षा २३ जून रोजी होणार आहे. जुन्या वेळापत्रकानुसार ही परीक्षा ७ जुलै रोजी होणार होती. सविस्तर वाचा…
मुंबई : दक्षिण मुंबईमधील चाळ संस्कृती झपाट्याने अस्ताला जात असून टॉवर संस्कृत वेगाने रूजत आहे. मात्र नियोजनशुन्य पद्धतीने होत असलेल्या पुनर्विकासामुळे चाळींप्रमाणेच टॉवरही अस्ताव्यस्तपणे उभे राहात आहेत. नव्या टॉवर संस्कृतीमुळे भविष्यात अनेक समस्यांना आमंत्रण मिळण्याची चिन्हे असून येत्या काही वर्षात पाणीपुरवठा, सांडपाण्याचा निचरा, अरुंद रस्ते, वाहतूक कोंडी असे अनेक प्रश्न डोके वर काढण्याची अधिक चिन्हे आहेत.
पुणे : शिवाजीनगर ते लोणीकाळभोर आणि रेसकोर्स ते स्वारगेट या विस्तारित मेट्रो मार्गांच्या व्यवहार्यता अहवाल पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) सादर करण्यात आला आहे. याच मार्गांचे काम करण्यास महामेट्रोही इच्छुक आहे.
मनमाड : यंदा मार्चच्या अखेरीस मनमाडकरांना पिण्याच्या पाण्याच्या तीव्र टंचाईला तोंड द्यावे लागणार आहे. सध्या मनमाड शहराला पाणी पुरवठा करणार्या वागदर्डी धरणात मृतसाठा आहे. जेमतेम आठ ते १० दिवस तो पुरेल.
पुणे : गणेशखिंड रस्त्यावरील आचार्य आनंदऋषीजी चौकातील (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक) कोंडी सोडविण्यासाठी सिग्नल यंत्रणा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गणेशखिंड रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी विद्यापीठ चौक सिग्नलमुक्त केल्यानंतर वाहतुकीचा वेग वाढेल.
नाशिक : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ८५ वर्षावरील वृध्द आणि ४० टक्क्यांपेक्षा जास्त अपंगत्व असणाऱ्या मतदारांना घरबसल्या मतदानाची सुविधा मिळणार असून त्यासाठी प्रत्येक मतदार संघात खास पथकांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
चंद्रपूर : चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघाच्या उमेदवारीवरून काँग्रेस पक्षात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि आमदार प्रतिभा धानोरकर यांच्यात चढाओढ सुरू आहे. विजय वडेट्टीवार यांचे नाव समोर येताच राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य व आमदार धानोरकर यांचे दीर तथा भद्रावतीचे माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी गुरुवारी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली.
नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत आचारसंहितेचा भंग वा तत्सम गैरप्रकारांविषयी तक्रार करण्यासाठी उपलब्ध केलेल्या सी – व्हिजिल ॲपवर पहिली ऑनलाईन तक्रार प्राप्त झाल्यानंतर अवघ्या ६० मिनिटांच्या आत भरारी पथकाने तिचा निपटारा केला.
नाशिक : शहरातील भ्रमणध्वनी साहित्य विक्री आणि दुरुस्तीच्या व्यवसायावर एकाधिकारशाही निर्माण करण्याच्या मुद्यावरून मराठी आणि अमराठी व्यावसायिकांमध्ये उद्भवलेल्या वादावर दुसऱ्या दिवशीही तोडगा निघाला नाही. अमराठी व्यावसायिकांनी आपली सर्व दुकाने बंद ठेवत दुरुस्तीचे काम करणाऱ्या मराठी व्यावसायिकांची कोंडी केल्याची तक्रार केली जात आहे.
पुणे : मनसेचा राजीनामा दिल्यानंतर लोकसभा निवडणूक लढविणार असल्याची घोषणा करणारे वसंत मोरे महाविकास आघाडीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक होते. मात्र काँग्रेसकडून आमदार रवींद्र धंगेकर यांचे नाव जवळपास निश्चित झाल्याने त्यांना उमेदवारी मिळण्याच्या आशा धूसर झाल्या असतानाच समाजमाध्यमातून मोरे यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाने मुंबईतील विविध ठिकाणच्या ७१३ दुकानांची विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. या दुकानांच्या ई – लिलावाची प्रक्रिया सुरू असून प्रस्तावित वेळापत्रकानुसार २० मार्च रोजी दुकानांचा ई – लिलाव होणार होता. मात्र मुंबई मंडळाने नोंदणी, अर्ज भरण्याच्या प्रक्रियेस १ एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे दुकानांचा ई – लिलाव आता २० मार्चऐवजी ५ एप्रिल रोजी होणार आहे.
नागपूर : राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यासाठी प्रसिद्ध असलेल्या जामठ्याच्या मैदानाजवळ चक्क वाघाचा अर्धवट कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली. मृत्यू तब्बल १५ दिवसांपूर्वीचा असून वाघाच्या कवटीला मार आहे. तर वाघाची दोन नखेही गायब आहेत. तरीही वनखात्याने घटनेचा पीओआर फाडला नाही.
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, आपल्या देशात हिंदुत्व टिकलं पाहिजे, हिंदुत्वाच्या विचारांवर देश आणि आपला महाराष्ट्र पुढे गेला पाहिजे. तसेच राज्याला आणि देशाला समृद्ध करण्यासाठी विकास झाला पाहिजे. यावर राज ठाकरे यांनी नेहमीच भाष्य केलं आहे. जिथे जिथे मतांच्या तुष्टीकरणाचं राजकारण व्हायचं तिथे तिथे राज ठाकरे त्यांच्या ओजस्वी वाणीतून प्रखर विचार मांडायचे. त्यांचा पक्ष हा भाजपा आणि शिवसेनेच्या विचारांप्रमाणेच चालणारा पक्ष आहे. त्यामुळे मला वाटतं की देशाच्या, राष्ट्राच्या कल्याणाकरता, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विकसित भारताच्या संकल्पाकरता मोदींच्या गॅरंटीवर देश पुढे नेण्यासाठी राज ठाकरे यांनी काही विचार केला असेल तर आम्ही त्यांचं स्वागत करू.
नवी मुंबई : विदेशातील लाल चुटुक दिसणाऱ्या सफरचंदाची आवक मुंबई कृषी उत्पन्न बाजारात वाढली आहे. प्रति किलो २०० रुपये दराने किरकोळ बाजारात सध्या उपलब्ध आहेत.
नागपूर: लोकसभा निवडणुकीच्या प्रक्रियेला बुधवारपासून सुरूवात झाली. नागपूरमध्ये पहिल्याच दिवशी एक अर्ज दाखल झाला. उमेदवाराचे नाव आहे व्यंकटेश्वरा स्वामी. ते मूळचे कर्नाटकचे व आता त्यांचे सोलापूर जिल्ह्यात वास्तव्य आहे. नागपूरहून भाजपकडून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी रिंगणात उतरणार आहेत. गडकरीचा पूरक उमेदवार असल्याचा दावा स्वामींनी केला.
"अजित पवारांनी पातळी सोडून टीका केल्याचं दु:ख", शरद पवारांच्या बहिणीचं वक्तव्य
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली फूट गेल्या वर्षभरापासून चर्चेचा विषय ठरली आहे. शिवसेनेप्रमाणेच हे प्रकरणही थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचलं आहे. न्यायालयाने घड्याळ या पक्षचिन्हाबाबत नुकतेच अजित पवार गटाला निर्देशही दिले आहेत. या सर्व चर्चा एकीकडे चालू असताना दुसरीकडे ही पक्षफूट म्हणजे शरद पवारांनी केलेली खेळी असल्याची टीकाही पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर नेमकं राजकीय वर्तुळात आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काय घडतंय? यावरून तर्क-वितर्कांना उधाण आलेलं असताना त्यावर शरद पवार यांच्या भगिनी सरोज पाटील यांनी मोठं विधान केलं आहे.
सरोज पाटील म्हणाल्या, अजित पवारांनी शरद पवारांवर पातळी सोडून टीका केल्याचं दु:ख वाटत असल्याचं त्या म्हणाल्या. “राजकीय पातळी सोडल्याचं दु:ख वाटतंय. पण आमच्या आईनं आम्हाला शिकवलंय की रडत बसायचं नाही. कसा तोल सुटतो हे मला कळत नाही. पण शरदच्या बाबतीत त्याच्या तोंडून जी काही भाषा आली, ते बोलता बोलता आलं असेल. कारण तो संवेदनशील आहे. आम्ही त्याला लहानपणापासून ओळखतो. त्याला कदाचित पश्चात्ताप झाला असेल. पण या सगळ्याचं दु:ख नक्कीच झालं.
सरोज पाटील म्हणाल्या, अजित काय बोलला, श्रीनिवास काही बोलले तर ते राजकारणापुरते आहे. निवडणुका संपल्या की सगळे ढग निघून जातील”, असं विधान यावेळी सरोज पाटील यांनी केलं. या विधानावरून आता तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.