Maharashtra Vidhansabha Election 2024 : राज्यात विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. या निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबर रोजी लागणार आहे. आता निकालाला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे या निकालाकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं आहे. महाराष्ट्रात नेमकी कोणाचं सरकार येणार? राज्यातील जनता कोणाला कौल देते? कोणता पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरतो? यासह आदी प्रश्नांची उत्तरं आता २३ नोव्हेंबर रोजी मिळणार आहेत. मात्र, निकालाच्या आधीच राज्याच्या राजकारणात मोठ्या हालचाली सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडे महायुतीच्या नेत्यांच्या बैठकांवर बैठका सुरु आहेत, तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठकांचा धडाका सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महाविकास आघाडी आणि महायुतीकडूनही सरकार स्थापनेबाबत दावे करण्यात येत आहेत. मात्र, काही एक्झिट पोलच्या अंदाजानुसार महायुती आणि महाविकास आघाडीला सत्तास्थापनेसाठी अपक्षाची मदत लागू शकते. त्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांकडून निकालाच्या आधीच अपक्ष निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांशी आणि छोट्या पक्षांबरोबर संपर्क सुरु असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. या पार्श्वभूमीवरच आमदार बच्चू कडू यांनी मोठं भाष्य केलं आहे. ‘महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांकडून आपल्याला फोन आले आहेत’, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. त्यामुळे निकालाच्याआधी मुंबईत पडद्यामागे नेमकी काय घडतंय? याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत.

हेही वाचा : “…तर मोठा स्फोट झाला असता”, गौतम अदाणी प्रकरणावरून उद्धव ठाकरेंचं मोठं विधान

बच्चू कडू काय म्हणाले?

“आम्हालाही फोन आले आहेत. मात्र, कोणाचा फोन आला हे आत्ता सांगायला नको. महाविकास आघाडी आणि महायुतीकडून फोन आले आहेत. उद्या (२३ नोव्हेंबर ) निकालानंतर सर्व काही स्पष्ट होईल. महाविकास आघाडीकडून देखील आम्हाला फोन आला. फोन आले असले तरी आम्ही एकत्रित निर्णय घेऊ. कारण अखेर आमचे निवडणुकीतील मुद्दे महत्वाचे आहेत. आम्ही सरकार स्थापन करू. यामध्ये काही अपक्ष असतील आणि काही लहान पक्षांचा समावेश असेल”, असं बच्चू कडू यांनी एबीपी माझा या वृत्तवाहीनीशी बोलताना म्हटलं.

महादेव जानकर काय म्हणाले?

विधानसभा निवडणुकीच्या निकालाआधी महादेव जानकर यांनीही मोठा दावा केला आहे. महादेव जानकर यांनी म्हटलं की, “उद्या महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि त्यांना काही जागा कमी पडल्या तर महाविकास आघाडीबरोबर आम्ही आघाडी करू आणि महाविकास आघाडीला वाटलं तर ते देखील आमचा विचार करतील. तसेच आम्ही महायुतीबरोबर जाऊ शकतो. याचं कारण म्हणजे महायुती आणि महाविकास आघाडी हे सत्तेसाठीच सारीपाठ खेळतात. मग आम्ही देखील सत्तेसाठीच पक्ष काढलेला आहे. आपल्या आमदारांनाही सत्ता मिळाली पाहिजे. छोटे पक्षच किंगमेकर ठरतील. त्यामुळे कोणालाही भीक घालण्याची गरज नाही”, असं महादेव जानकर यांनी एबीपी माझा या वृत्तवाहीनीशी बोलताना म्हटलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra politics mahavikas aghadi and mahayuti leaders called bachchu kadu maharashtra vidhansabha election 2024 gkt