राज्य विधीमंडळ अधिवेशन चांगलेच वादळी ठरत आहे. या अधिवेशनात राज्याच्या समस्या, नवी विधेयके यावर चर्चा होत आहे. या चर्चेदरम्यान सत्ताधारी तसेच विरोधक एकमेकांना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न करत आहेत. यावेळी विरोधी बाकावरील नेतेमंडळी राज्यातील सत्तासंघर्ष तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ४० आमदारांसह केलेली बंडखोरी हा विषयदेखील चवीने चर्चीला जातोय. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी तर शिवसेनेतील बंडखोरी आणि मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद दिलं या भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांच्या विधानाचा आधार घेत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची खुली ऑफर दिली. तुम्ही आमच्या बाजूने या, तुम्हाला मुख्यमंत्रीपद देण्यासाठी आमच्या कुणाचीही हरकत नाही, असे जयंत पाटील भर सभागृहात म्हणाले आहेत.
हेही वाचा >>> सर्व काही घटनाबाह्य करायचं आहे का? विचारणाऱ्या आदित्य ठाकरेंना एकनाथ शिंदेंनी दिलं उत्तर, म्हणाले “काही लोक…”
“मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं आहे, असे चंद्रकांत पाटील एका बैठकीत म्हणाले होते. भारतीय जनता पक्षाने मनावर दगड ठेवून आमच्या शिंदे यांना मुख्यमंत्री केले असेल तर कुठलीही भानगड ठेवता आम्ही एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री होण्याची संधी देऊ. तुमच्यातील गुण पाहता तसे करण्यास कोणीही नकार देणार नाही,” असे मिश्किल भाष्य करत जयंत पाटील यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली.
हेही वाचा >>> “हे असं चालणार नाही, सभागृह बंद करा” मंत्र्यांच्या अनुपस्थितीमुळे एकनाथ खडसे भडकले; विधान परिषदेत गदारोळ
“हे सरकार स्थापन झाल्यानंतर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. सत्तासंघर्षाचा प्रश्न आता न्यायालयात आहे. आपण मुख्यमंत्री म्हणून निर्णय घेत असताना देवेंद्र फडणवीसांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावेत, अशी आमची अपेक्षा आहे. तुम्ही तसे करत असाल. मात्र बरेच निर्णय देवेंद्र फडणवीस यांना माहिती नसतात. हे सत्य असेल तर तुम्ही तुमचा कणखरपणा दाखवत आहात,” असा मिश्किल टोलादेखील जयंत पाटील यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला.