दापोली : दापोलीच्या पर्यटन क्षेत्रात मनाचा तुरा रोवणारा सुवर्णदुर्ग रोपवे व्हावा हे दापोलीतील पर्यटन प्रेमींचे आणि अभ्यासकांचे स्वप्न आता पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. या सुवर्णदुर्ग रोप वे ला महायुती सरकारचा हिरवा कंदील मिळाला आहे. दापोलीतील बांधकाम व्यावसायिक व सामाजिक कार्यकर्ते, मिहीर दीपक महाजन यांनी दिल्ली येथे २०२० च्या ऑक्टोबर महिन्यात नितीन गडकरी यांची भेट घेत दापोलीतील हर्णे येथे गोवा किल्ला ते सुवर्णदुर्ग किल्ला असा समुद्रावरून जाणारा रोपवे करण्याची मागणी केली होती.

महाराष्ट्र शासनाकडून प्रस्ताव आल्यास तात्काळ मान्यता देण्यात येईल असे आश्वाशित करण्यात आले होते. महाराष्ट्र राज्याचे  तत्कालीन पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी रोपवेसाठी  पर्यटन विभागाला तसा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले होते. पुरातत्व विभागाची देखील महत्वाची भूमिका असल्याने तत्कालीन सांस्कृतिक विभागाचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सहकार्य करत  रोपवेला गती देण्यात महत्वाची भूमिका निभावली होती.

महायुती सरकारच्या दि. १८ फेब्रुवारीच्या कॅबिनेटमध्ये या रोपवेला हिरवा कंदील देण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या पर्वतमाला योजनेअंतर्गत गोवा किल्ला- सुवर्णदुर्ग किल्ला हा रोपवे घेण्यात आला असून, केंद्र सरकारचे एनएचएलएम आणि महाराष्ट्र शासनाचा सार्वजनिक बांधकाम विभाग या रोपवेचे काम कार्यान्वित करणार असल्याचा  शासन निर्णय दि. १९ मार्च रोजी  झाला आहे.   

ऐतिहासिक पार्श्वभूमी असणाऱ्या आणि सरखेल कान्होजी आंग्रेंचे जन्मस्थान असणाऱ्या  सुवर्णदुर्ग किल्ल्यावर जाण्यासाठी रोप वे झाल्याने दापोलीचे ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि पर्यटन क्षेत्रातील महत्व अधोरेखित होणार आहे. विशेषत्वाने प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती आणि अर्थव्यवस्थेला देखील मोठी चालना मिळणार  आहे. रोप-वे करीता या सर्वाचे सहकार्य लाभल्याने समस्त दापोलीकरांच्या असून गृहराज्य मंत्री योगेश कदम नेतृत्वात हा प्रकल्प पूर्णत्वाला जाण्याची खात्री मिहीर  महाजन यांनी आभार  मानले आहेत.

Story img Loader