कराड: लोकसभा निवडणुकीतील उदयनराजेंचा विजय हे मोठे यश असल्याने सातारा हा ‘महायुती’चा बालेकिल्ला झाला आहे. जिल्ह्यातील आठपैकी सहा आमदार महायुतीचे असून, उर्वरित दोन आमदारही भाजपचेच निवडून येतील आणि ‘महायुती’चे सातारा जिल्ह्यावर संपूर्ण वर्चस्व असेल असा ठाम विश्वास केंद्रीय नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भाजपच्या जिल्हास्तरीय अधिवेशनाचे उद्घाटक म्हणून आलेले मोहोळ कराडमध्ये पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, राज्यभरात भाजपच्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हानिहाय अधिवेशने होत असून, त्यातून संघटनात्मक बांधणी, विधानसभेची तयारीही होत आहे. त्याचदृष्टीने कराडचे अधिवेशन घेण्यात आले आहे.

हेही वाचा – सोलापूर : कुर्डूवाडीत मराठा आंदोलकांनी शरद पवारांची मोटार अडवून विचारला जाब

देशाच्या विकासासाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेणारे यशवंतराव चव्हाण हे मोठे नेते असल्याने कराडला येताच त्यांच्या स्मृती नक्कीच जागृत होतात. त्यामुळे आपण प्रथमत: त्यांच्या समाधीस्थळी अभिवादन केल्याची भावना मोहोळ यांनी व्यक्त केली.

‘महायुती’च मराठ्यांना आरक्षण देईल

मराठा आरक्षणाच्या प्रश्नी ते म्हणाले, मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील राज्यभर आंदोलने करीत आहेत, यात काही चुकीचे नाही. सन २०१४ ते २०१९ या सत्ताकाळात त्यावेळचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला १० टक्के आरक्षणाचा निर्णय घेतला. परंतु, त्यानंतरच्या महाविकास आघाडीला ते आरक्षण टिकवता आले नसल्याची टीका मोहोळ यांनी केली. महायुतीचे सरकारच मराठ्यांना आरक्षण देऊ शकेल, असा दावाही त्यांनी केला.

मोदींच्या काळात क्रीडा क्षेत्रात नवी धोरणे

भारताची ऑलम्पिकमध्ये सुमार कामगिरी झाल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले, भारताला चार- पाच दशकात व्यक्तिगत पदके मिळाली नव्हती. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात क्रीडा क्षेत्रात अनेक नवीन धोरणे अंमलात आली. कुस्ती, भारताला नेमबजीत पदके मिळाली. त्या तुलनेत आता निराशाजनक कामगिरी असलीतरी सर्व खेळाडू प्रयत्नशील असून, क्रीडा क्षेत्राबाबत सरकार, संघटना आणि लोकांचीही सामूहिक जबाबदारी असल्याचे मत मोहोळ यांनी व्यक्त केले.

हेही वाचा – ‘इन्फोसिस’ला साताऱ्यात आयटी केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव, उदयनराजे भोसलेंची डॉ. सुधा मूर्तींकडे मागणी

कराड विमानतळाचा विस्तार लावकरच

महाराष्ट्रातला माणूस तुम्ही माझ्या रुपाने दिल्लीला पाठवला, आणि योगायोगाने आपल्याकडेच नागरी विमान वाहतूक मंत्रालय असल्याने कराड विमानतळाची विस्तारवाढ नक्की मार्गी लागेल. त्यातून पश्चिम महाराष्ट्रासह सातारा व सांगली जिल्ह्याची सोय होईल. धावपट्टी वाढून ७० प्रवाशी क्षमतेचे विमान ये-जा करू शकेल, असे हे विमानतळ काही महिन्यांत सुरू होईल, यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेनुसार आवश्यक ४८ हेक्टरपैकी ३८ हेक्टरचे भूसंपादन झाले आहे. उर्वरित १० हेक्टरचे भूसंपादन पंधरवड्यात पूर्ण करून पुढची कार्यवाही होईल. स्थानिकांना विश्वासात घेऊन चर्चेअंती जमीन हस्तांतरणाच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याचे मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahayuti will dominate the entire satara district says minister murlidhar mohol ssb