निवडणूक आयोगाने शिंदे आणि उद्धव ठाकरे गटाला दोन वेगवेगळी नावे दिली आहेत. उद्धव ठाकरे गट आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावाने तर शिंदे गट बाळासाहेबांची शिवसेना या नावाने ओळखला जातोय. उद्धव ठाकरे गटाला निवडणूक आयोगाने मशाल हे निवडणूक चिन्ह दिले आहे. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे. याच निर्णयाच्या पार्श्वभूमीवर शिंदे आणि उद्धव ठाकरे गटातील संघर्ष आणखी तीव्र झाला आहे. दोन्ही गटातील नेते एकमेकांवर कठोर टीका करताना दिसत आहेत. असे असतानाच आता शिंदे गटातील नेत्या तथा आमदार मनिषा कायंदे यांनी शिंदे गटाला रावणाची उपमा दिली आहे. आमची धगधगती मशाल ४० मुंडक्याच्या रावणाला जाळेल, असे मनिषा कायंदे म्हणाल्या आहेत. समाजमाध्यमाच्या माध्यमातून त्यांनी आज ही प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा >>> पालघर साधू हत्या प्रकरणावरील राज्याच्या भूमिकेनंतर राम कदमांची महाविकास आघाडीवर टीका, म्हणाले “आमच्या हिंदुत्वाचा एवढा…”

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेबांची शिवसेना अशी दोन नावे आहेत. म्हणजे एकीकडे बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घ्यायचे आणि दुसरीकडे त्यांचाच शिवसेना पक्ष तोडायचा. बाळासाहेब ठाकरेंच्याच पक्षाचे निवडणूक चिन्ह गोठवायचे आणि वर म्हणायचे की आम्ही शिवसैनिक आहोत. दिवंगत रमेश लटके हेदेखील एक शिवसैनिकच होते. त्यांच्या पत्नी आता निवडणुकीसाठी उभ्या आहेत. रमेश लटके यांच्या विधवा पत्नींच्या समोर तुम्ही आव्हान उभे करत आहात. हे कशासाठी आहे? असा सवाल मनिषा कायंदे यांनी केला.

हेही वाचा >>> उद्धव ठाकरे गटाला मशाल चिन्ह मिळाल्यानंतर अब्दुल सत्तार यांचे महत्त्वाचे विधान; म्हणाले “एकनाथ शिंदेच आमचे…”

आपल्या सहकाऱ्याच्या विधवा पत्नीच्या विरोधात आव्हान उभे केले जात आहे. हे अतिशय गलिच्छ राजकारण आहे. या सर्वाच्या मागे भाजपा आहे. दवाबाचे राजकारण खेळले जात आहे. ४० मुंडक्यांच्या रावणाला त्यांच्या अहंकाराला मशाल जाळल्याशिवाय राहणार नाही. हे चिन्ह आम्ही घरोघरी पोहोचवू असेही मनिषा कायंदे म्हणाल्या आहेत.