नांदेड : सरलेल्या गाळप हंगामात भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातून सुमारे १ लाख टन ऊस नेणार्‍या लातूरच्या मांजरा समूहाने पुढील हंगामातही आपले बस्तान मांडण्याची तयारी दर्शविली असून वरील समूहाचे सर्वेसर्वा, माजी मंत्री आ.अमित देशमुख यांनी आपल्या यंत्रणेला तशी सूचनाही दिली आहे. काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री आणि आता भाजपामध्ये असलेल्या खा.अशोक चव्हाण यांच्या नियंत्रणाखालील ‘भाऊराव चव्हाण’च्या नेतृत्वात गेल्या आठवड्यातच बदल झाला. दीर्घकाळ अध्यक्ष राहिलेल्या गणपतराव तिडके यांच्या राजीनाम्यामागे प्रकृती साथ देत नाही, हे एक ज्ञात कारण होतेच; पण हंगामादरम्यान कारखाना कार्यक्षेत्रातील सुमारे २ लाख टन ऊस बाहेर गेल्याचा ठपका अप्रत्यक्षपणे त्यांच्यावर ठेवला गेला.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भोकर मतदारसंघात ज्या गावांमध्ये काँग्रेसला मताधिक्य मिळाले, त्या गावांतील ऊस उत्पादकांची कोंडी करण्याचे धोरण ‘भाऊराव चव्हाण’च्या यंत्रणेने राबविल्यामुळे गेल्या हंगामात अडलेल्या-नडलेल्या ऊस उत्पादकांच्या मदतीला आ.अमित देशमुख यांच्या साखर उद्योग समूहाची यंत्रणा धावून आली होती. ‘भाऊराव चव्हाण’पेक्षा जास्त भाव देऊन त्यांनी ऊस उत्पादकांना मोठा दिलासा दिला.

पुढील हंगामात आपल्या कार्यक्षेत्रात बाहेरच्या साखर कारखान्यांच्या ऊस तोड टोळ्या आल्या तर कारखान्याच्या यंत्रणेेने त्यांना रोखावे, अशी सूचना खा.अशोक चव्हाण यांनी आपल्या साखर कारखान्यावरील एका कार्यक्रमात नुकतीच दिली होती. या पार्श्वभूमीवर बारड (ता.मुदखेड) येथील तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश देशमुख यांच्यासह संदीपकुमार देशमुख, संदीप तरोडेकर, भगवान पवार, माधव हामंद इत्यादी कार्यकर्त्यांनी मंगळवारी आ.अमित देशमुख यांची लातूरला जाऊन भेट घेत अशोक चव्हाण यांच्या वक्तव्याकडे त्यांचे लक्ष वेधले.

नांदेड जिल्ह्यातून गेलेल्या वरील काँग्रेस कार्यकर्त्यांशी आ.देशमुख यांनी स्वतः चर्चा केलीच, शिवाय आपल्या समूहातील ‘ट्वेन्टी वन शुगर्स’चे उपाध्यक्ष विजय देशमुख यांनाही चर्चेदरम्यान बोलावून घेतले. विजय देशमुख यांनी आगामी काळात मुदखेड आणि अर्धापूर भागाचा दौरा करावा व ऊस उत्पादकांच्या भेटी घ्याव्यात, अशी सूचना त्यांना दिली गेली. मांजरा समूहाने नांदेड जवळच्या भोकर फाटा परिसरात संपर्क कार्यालय निर्माण करावे, अशी मागणी नांदेडच्या शिष्टमंडळाने केल्यानंतर त्यास अमित देशमुखांसह विजय देशमुख यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला. या शिष्टमंडळाने श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांचीही स्वतंत्रपणे भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.

सन २०२३-२४च्या गाळप हंगामात भाऊराव चव्हाण साखर कारखान्याने ७ लाख १४ हजार ८३२ मे. टन ऊस गाळ केले होते. पण सरलेल्या हंगामात या कारखान्याला ६ लाख ४१ हजार मे. टन गाळप करता आले. कारखाना कार्यक्षेत्रातील सुमारे २ लाख टन ऊस मांजरा समूह व इतर कारखान्यांनी नेल्यामुळे भाऊराव चव्हाणच्या साखर उत्पादनात मोठी घट झाली. ३१ मार्च २०२५ अखेर कारखान्याचा तोटा वाढला असल्याचेही सांगण्यात आले.