जालना : मराठा समाजाला सरसकट ‘कुणबी’ दाखले देण्याच्या मागणीसाठी आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांचे उपोषण बुधवारी सोळाव्या दिवशीही सुरू होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अन्य काही मंत्री उपोषणस्थळी येतील आणि जरांगे हे उपोषण सोडतील, अशी चर्चा दिवसभर होती. परंतु, प्रत्यक्षात मुख्यमंत्री न फिरकल्याने उपोषण कायम आहे. 

 २९ ऑगस्टपासून जरांगे यांचे उपोषण सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी आतापर्यंत तीन-चार वेळा जरांगे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संवाद साधला. मुख्यमंत्र्यांच्या वतीने काही मंत्र्यांनी उपोषणस्थळी येऊन जरांगे यांच्याशी चर्चा केली. परंतु, त्यामधून तोडगा निघू शकला नव्हता. ‘‘आपण सरकारला एक महिन्याची मुदत दिली आहे. मुख्यमंत्री येणार की नाहीत, याबाबत आपल्याकडे खात्रीलायक माहिती नाही. ते आले तर मराठा समाजाच्या वतीने त्यांचे स्वागत आहे. मुख्यमंत्री आले तर त्यांना समाजास सांगण्याची संधी मिळेल.

हेही वाचा >>> मुख्यमंत्र्यांच्या चित्रफितीमुळे वाद; जालन्याला जाण्याचे टाळले, दुही निर्माण करण्याचा प्रयत्न – एकनाथ शिंदे

आरक्षणाबाबत चांगली चर्चा आणि त्यामधून मार्ग निघणे महत्त्वाचे आहे’’ असे जरांगे म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी मुंबईत सांगितले की, ‘‘जरांगे यांना भेटण्यासाठी मंत्री गेले होते. कालही त्यांच्याशी चर्चा केली आहे. सरकारची भूमिका त्यांनी समजावून घेतली आहे’’. मंत्री गिरीश महाजन आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे जरांगे यांच्या भेटीसाठी येणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, जरांगे यांचे उपोषण सुरूच होते.