Manoj Jarange Patil On Raj Thackeray : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न चर्चेत आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगे यांनी केलेली आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे यांनी अनेकदा आंदोलन आणि उपोषणही केलं. मात्र, त्यांच्या मागणीसंदर्भात राज्य सरकारने अद्याप ठोस असा कोणताही निर्णय घेतलेला नाही. दुसरीकडे मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याला ओबीसी नेत्यांनी विरोध केला आहे. त्यामुळे मराठा आणि ओबीसी नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोलापूर दौऱ्यावर असताना महाराष्ट्रात कोणालाही आरक्षणाची गरज नसल्याचं विधान केलं. त्यांच्या या विधानानंतर मराठा आंदोलकांनी आक्रमक होत धाराशिवमध्ये राज ठाकरे थांबलेल्या हॉटेलमध्ये घुसत त्यांना जाब विचारला. यावेळी मराठा आरक्षणाच्या संदर्भात भूमिका मांडत राज ठाकरे यांनी आपण मनोज जरांगे यांना भेटून बोलणार असल्याचं आश्वासन मराठा आंदोलकांना दिलं. आता मनोज जरांगे यांनी राज ठाकरेंच्या त्या विधानावर प्रतिक्रिया देत हल्लाबोल केला. “राज ठाकरे हे लपवाछपवीच्या पुढचे आहेत. ते मला फोन करणार नाहीत. कारण त्यांची ती पळवाट होती”, असं मनोज जरांगे म्हणाले.

हेही वाचा : Cabinet Meeting : विना परवानगी झाड तोडल्यास आता ५० हजारांचा दंड होणार; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत १३ मोठे निर्णय

मनोज जरांगे काय म्हणाले?

काही महिन्यांपूर्वी राज ठाकरे यांनी अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला भेट देत आरक्षणाबाबतची भूमिका मांडली होती. यासंदर्भात बोलताना मनोज जरांगे म्हणाले, “राज ठाकरे यांनी एक सांगितलं नाही, जे मला त्यांनी सांगितलं की आरक्षण मिळणार नाही किंवा सरकार देणार नाही. पण मी ज्यावेळी त्यांना आरक्षण समजून सांगितलं होतं, तेव्हा राज ठाकरे असं म्हणाले होते की, मी मुंबईला जातो आणि माझे अभ्यासक बोलावतो. असं असेल तर मग मराठ्यांना आरक्षण (Maratha Reservation) मिळू शकतं, हे राज ठाकरेंनी सांगितलं नाही”, असं मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) म्हणाले.

मनोज जरांगेंची राज ठाकरेंवर टीका

“राज ठाकरे हे लपवाछपवीच्या पुढचे पुढचे आहेत. ते मला फोनही करणार नाहीत. तसंच ते आरक्षणाबाबत काही करणारही नाहीत आणि ते येणारही नाहीत. मराठ्यांच्या पोरांनी त्यांना जाब विचारला. मात्र, राज ठाकरे यांची ती एक पळवाट होती”, असं म्हणत मनोज जरांगे यांनी राज ठाकरेंना (Raj Thackeray) सुनावलं.

शांतता रॅलीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात

मनोज जरांगे यांनी आता शांतता रॅलीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात केली आहे. सोलापूरमधून आजपासून (७ ऑगस्ट) शांतता रॅलीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात केली आहे. या रॅलीची सांगता नाशिकमध्ये होणार आहे. ही रॅली पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यामधून जाणार आहे. मनोज जरांगे यांनी याआधी मराठवाड्यात शांतता रॅली काढली होती.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manoj jarange patil mns president raj thackeray and maratha reservation maharashtra politics gkt