हिवाळी अधिवेशनात अंतरवाली सराटीत झालेल्या लाठीचार्जबाबत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या लेखी उत्तरानं नव्या वादाला तोंड फुटलं आहे. मराठा आंदोलनात करण्यात आलेला लाठीचार्ज हा बचावात्मक आणि वाजवी असल्याचं फडणवीसांनी सांगितलं आहे. यावरून मराठा नेते, मनोज जरांगे-पाटील यांनी फडणवीसांवर टीका केली आहे.
फडणवीसांनी काय म्हटलं?
विधिमंडळ अधिवेशनाच्या लेखी प्रश्नोत्तरात आमदारांनी मराठा आंदोलनावेळी झालेल्या घटनांबाबत गृहमंत्री फडणवीस यांच्याकडे माहिती मागवली होती. या प्रश्नांना उत्तर देताना फडणवीस म्हणाले, “जालना जिल्ह्यातील सदर आंदोलनात हिंसक जमावाकडून करण्यात आलेल्या दगडफेकीत ७९ पोलीस अधिकारी आणि अंमलदार जखमी झाले आहेत. अंतरवाली सराटीत पोलिसांनी बचावात्मक पद्धतीनं बळाचा वाजवी वापर केला. त्यात ५० आंदोलक जखमी झाले.”
“तुमचा डाव उधळून लावणार”
यावरून जरांगे-पाटलांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना फडणवीसांना लक्ष्य केलं आहे. “देवेंद्र फडणवीस काड्या करत राहिले, तर पुढं काय काय होते, ते पाहा. तुमचा डाव उधळून लावणार आहे. तरच, मराठ्याचं असल्याचं सांगणार,” असं जरांगे-पाटलांनी म्हटलं आहे.
हेही वाचा : “हमारे दुःख पर मीठ क्यूँ चोळते हो?” म्हणत छगन भुजबळांनी केली मनोज जरांगे पाटील यांची नक्कल
“आम्ही शांत आहोत आणि राहुद्या”
“देवेंद्र फडणवीसांवर टीका कराल, तर आम्ही सहन करणार नाही. फडणवीसांविरोधात भूमिका घेण्यास सुरूवात कराल, तर गाठ मराठ्यांशी आहे,” असा इशारा भाजपा आमदार नितेश राणेंनी जरांगे-पाटलांना दिला आहे. राणेंच्या वक्तव्यावर बोलताना जरांगे-पाटील म्हणाले, “मराठ्यांनी सावध राहावे. कारण, देवेंद्र फडणवीसांचा मराठ्यांविषयी गरळ ओकण्याचं अंदाज दिसतोय. बरेचशे नेते आता जागे होत आहेत. मराठ्यांनाच मराठ्याविरोधात अंगावर घालण्याचं काम चालू आहे. पण, किती जणांना अंगावर घालणार हे मी पाहतो. आम्ही शांत आहोत आणि राहुद्या,” अशी विनंती जरांगे-पाटलांनी फडणवासांनी केली आहे.