राज्य सरकारसमोरचा मराठा आरक्षणाचा तिढा अद्याप कायम आहे. सगे-सोयऱ्यांच्या अंमलबजावणीवर मनोज जरांगे ठाम आहेत. त्यांनी सरकारला यासाठी १३ जुलैपर्यंतची मुदत दिली आहे. त्यांनी यासाठी उपोषणही सुरु केलं होतं. तर लक्ष्मण हाकेंनी ओबीसी आरक्षणासाठी उपोषण सुरु केलं. त्यानंतर आता मनोज जरांगेंनी भुजबळांवर जोरदार टीका केली आहे. बेट्या तुझा टांगा पलटी करणार असं म्हणत पुन्हा एकदा भुजबळांवर एकेरी भाषेत टीका केली आहे.

काय म्हणाले मनोज जरांगे?

“आता तुम्ही पलट्या मारायला लागले आहेत. मी पहिल्यापासून सांगतोय आमच्या व्याख्येप्रमाणे आरक्षण द्या. आधी ठीक आहे सांगतात, सगे-सोयऱ्यांची अंमलबजावणी करा नाहीतर करु नका. तुम्ही जर पलट्या मारल्या तर तुमचं सरकार मी पलटी केलंच म्हणून समजा.” असा इशाराच मनोज जरांगेंनी दिलाय.

भुजबळांवर एकेरी भाषेत टीका

“छगनभाऊ, तुला असा इंगा दाखवतो, तू आमच्या आमच्यात काडी लावतो का? मी तुझ्यापेक्षा जास्त पुढचा आहे. तू बळच रक्त जाळतो आहेस. बेट्या तुझा टांगा उलटवणार. तू जेवढं करशील तेवढा मराठा एक होत जाईल.” असं म्हणत भुजबळांवर मनोज जरांगेंनी पु्न्हा टीका केली आहे.

मनोज जरांगेंचं आवाहन, “मी एकटा पडलो आहे आणि मराठा जात संकटात, तेव्हा…”

मराठा समाजाला केलं आवाहन

“कोणता तरी नेता सांगतोय म्हणून आपण बिघडायचं आणि रोष व्यक्त करायचा. आपल्याला एकमेकांचे चेहरे बघायचे आहेत, रामराम घालायचा आहे, शेतात एकमेकांना काही अडचण आली तर मदतीला जायचं आहे याच भूमिकेत आपल्याला राहायचं आहे, असे आवाहन तुम्ही आमची भूमिका समजून घ्या, आम्ही १५० वर्षांपासून आरक्षणात आहोत, पण आम्हाला हे माहिती नव्हतं की आम्ही आहोत. आता आम्हाला माहिती झालं आहे, त्यामुळे नोंदी पाहून तुम्हीही म्हटलं पाहिजे की द्या मराठा समाजाला आरक्षण.” असंही मनोज जरांगे म्हणाले.

मनोज जरांगे आणखी काय म्हणाले?

मनोज जरांगेंनी राज्य सरकारला सगे सोयऱ्यांसह मराठा समाजाच्या आरक्षणासाठी १३ जुलैपर्यंत मुदत दिली आहे. त्याबाबतही त्यांनी भाष्य केलं. मनोज जरांगे म्हणाले, “१३ जुलैनंतर सरकारचं काहीही ऐकून घेणार नाही, असे त्यांनी म्हटले. तुम्ही पलट्या मारल्या तर तुमचं सरकार म्या पलटी केलंच समजायचं” हे इतके दिवस बोललो नव्हतो. पण आता बोलणं आवश्यक आहे असंही मनोज जरांगेंनी म्हटलंय. उपोषणानंतर रुग्णालयात उपचार घेत असलेले मनोज जरांगे आज अंतरवाली सराटी गावात आले, त्यावेळी गावकऱ्यांना उद्देशून भाषण केलं. मी अंतरवलीत येण्यासाठी आसूसलेलो होतो, मरणाच्या शेवटच्या घटकासोबत मी समाजासोबतच राहणार असल्याचंही जरांगेंनी पुन्हा एकदा म्हटलं आहे.