मराठा आरक्षणासाठी बेमुदत उपोषण करणाऱ्या मनोज जरांगेंची प्रकृती खालावली आहे. त्यांनी डॉक्टरांचे उपचार घेण्यास नकार दिला आहे. मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. ८ जून पासून त्यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे. सगे सोयऱ्यांची अंमलबजावणी ही त्यांची प्रमुख मागणी आहे.

मनोज जरांगेंनी मराठा समाजासाठी उभारला लढा

मनोज जरांगेंनी यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मोठा लढा उभारला. दरम्यान, त्यांच्या आंदोलनाची दखल घेत राज्य सरकारने मराठा समाजासाठी स्वतंत्र आरक्षणाला मंजुरी दिली. मात्र, मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण मिळावे अशी मागणी मनोज जरांगेंनी केली असून त्यायावर ते ठाम आहेत. या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवली सराटी येथे पुन्हा उपोषणाला सुरुवात केली आहे. त्यांच्या आंदोलनाला काही ग्रामस्थांनी विरोध केला होता.

हे पण वाचाृ बीडमध्ये तणाव; पंकजा मुंडेंनंतर मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान

४ जूनला होणार होतं उपोषण

सुरुवातीला ४ जूनला हे उपोषण होणार होतं. मात्र त्या दिवशी निवडणूक निकाल असल्याने आचारसंहिता असल्याने त्यांनी उपोषणाचा दिवस पुढे ढकलला. ८ जूनपासून ते उपोषणाला बसले आहेत. आज मनोज जरांगेच्या उपोषणाचा चौथा दिवस असून गेले चार दिवस त्यांनी काही खाल्ले नसल्याने त्यांची प्रकृतीही खालावली आहे.तसेच त्यांची तपासणी करण्यासाठी आलेल्या पथकाला देखील त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिलं आहे.

मनोज जरांगे यांचं १० जूनचं वक्तव्य काय?

माझ्या समाजाची लेकरं मोठी झाली पाहिजेत यासाठीच मी जिवाची बाजी लावली आहे. आमचं काही कुणी शत्रू नाही. सगे-सोयऱ्यांच्या अमलबजावणीचा विचार करत असतील तर चांगली गोष्ट आहे. एवढा विरोध मी पत्करला आहे तो मराठ्यांच्या गोरगरीब लेकरांसाठीच केला आहे. सगे-सोयऱ्यांची अमलबजावणी आमच्या अटींप्रमाणे केली तर आम्ही काय म्हणणार? शिवाय ते टिकवण्याची जबाबदारीही सरकारची आहे असंही मनोज जरांगे म्हणाले.

तर विधानसभेला गणित बिघडवणार

आम्हाला सगे सोयऱ्यांची अंमलबजावणी हवी आहे. ती झाली नाही तर विधानसभेला आम्ही फजिती करु असा इशारच जरांगेंनी दिलाय. मराठ्यांची मतं घ्यायची, त्यानंतर विरोधात बोलायचं असं चालणार नाही. भोळे मराठे मतं देतात, त्यांचा फायदा घेतला जातो. निवडून आले की मस्तीत यायचं हे कसं चालेल? तुम्ही आत्ता निवडून आला असाल तर विधानसभेला सगळ्यांना पाडणार. निवडून आल्यावर मराठ्यांना आरक्षण दिल्याची भाषा करणार असाल तर विधानसभेला बघून घेऊ. सरकारने अधिसूचना काढली आहे. अंमलबजावणी झाली नाही तर त्यांना कोट्यवधी मराठ्यांची नाराजी परवडणार नाही. मराठ्यांचा रोष अंगावर घेऊ नका, असंही जरांगे म्हणाले आहेत. मराठ्यांचा रोष अंगावर घेतला तर विधानसभेला सगळं गणित अवघड होईल असंही मनोज जरांगेंनी मंगळवारी दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलं आहे.