Maratha Reservation: बीड लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यानंतर काही तरुणांनी आत्महत्या केल्या. ही घटना ताजी असतानाच प्रसाद देठे या बार्शीतल्या तरुणाने मराठा आरक्षणासाठी आयुष्य संपवलं आहे. एक भावनिक चिठ्ठी लिहून या तरुणाने आत्महत्या केली आहे. मूळचे बार्शीचे असणारे प्रसाद देठे हे पुण्यात एका खासगी कंपनीत काम करत होते. त्यांनी आत्महत्या केली.

प्रसाद देठेंनी सुसाईड नोटमध्ये नेमकं काय म्हटलंय?

जयोस्तु मराठा

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळालेच पाहिजे. पंकजाताई, भुजबळ साहेब, हाके, शेंडगे, तायवाडे, टी.पी. मुंडे, गायकवाड आम्हाला आरक्षण मिळू द्या. विनंती आहे तुम्हाला. हात थरथरतोय म्हणून अक्षर असं आहे. माझ्या मृत्यूला कोणी जबाबदार नाही. मी स्वखुशीने मरत आहे.

जरांगे साहेब आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटू नका. विनंती आहे तुम्हाला. माझं तुम्हाला पटणार नाही, पण मी पूर्ण हताश झालोय. चिऊ मला माफ कर. लेकरांची काळजी घे. धीट रहा.

मला माफ करा.

तुमचाच प्रसाद

हे पण वाचा- “ओबीसींच्या आरक्षणाला कसा धक्का लागणार नाही हे सांगा”, पंकजा मुंडेंनी सरकारला विचारला जाब; म्हणाल्या, “मराठा आरक्षणाला…”

मराठा आरक्षणासाठी प्रसाद देठेंचा जरांगेंना होता पाठिंबा

ही सुसाईड नोट लिहून प्रसाद देठे यांनी आयुष्य संपवलं आहे. या घटनेमुळे एकच हळहळ व्यक्त होते आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली राज्यात मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरु झाल्यानंतर प्रसाद देठे हे सोशल मीडियावर सातत्याने सक्रिय होते. ते सोशल मीडियावर मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ सातत्याने पोस्ट टाकायचे. त्यांनी अनेकदा फेसबुक लाईव्ह करुन मराठा आरक्षणाची भूमिका हिरीरिने मांडली होती. त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी फेसबुकवर एक पोस्ट टाकली होती. जरांगे पाटील जिंदाबाद लाख मेले तरी चालतील लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे , आणि मराठा समाजाचा सध्याचा पोशिंदा फक्त आमचे जरांगे पाटील, असे त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.

हे पण वाचा- Manoj Jarange on Reservation: मनोज जरांगे संतापले, सर्वपक्षीय नेत्यांना दिला इशारा

प्रसाद देठे यांच्या जाण्याने सामाजिक व सर्व क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींकडून हळहळ व्यक्त होत आहे. लिहिलेल्या चिठ्ठीत ‘फक्त मराठा आरक्षण मिळावे’, याच हेतूने आपण आत्महत्या करत असून माझ्या आत्महत्येला कोणीही जबाबदार नाही असा उल्लेख केला आहे.

प्रसाद देठेंना डॉ. धनंजय जाधव यांनी वाहिली आदरांजली

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अनेक युवक आपल्या प्राणांची आहुती देत आहे. राज्य सरकार मात्र मराठा समाजाच्या मागणीप्रमाणे आरक्षण देण्यास टाळत आहे. प्रसाद देठे हे मराठा आरक्षण चळवळीतील कार्यकर्ते होते. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली ! मराठा समाजाच्या मागणीप्रमाणे आरक्षण न देणारे महाराष्ट्र सरकार व मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करणाऱ्या नेत्यांमुळेच या आत्महत्या होत आहेत. या नेत्यांनी आता मराठा आरक्षणाला विरोध करणे थांबवावे नसता या सर्व नेत्यांवर कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करू असं डॉ.धनंजय जाधव यांनी म्हटलं आहे.