मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत येऊन आंदोलन करण्याची घोषणा केली. त्यानंतर २० जानेवारी पर्यंत मुंबईला पोहोचण्याची तयारी मराठा आंदोलकांकडून सुरू आहे. त्या दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी सरकारच्या काही पडद्यामागील हालचालींबाबत साशंकता व्यक्त केली. “मला शब्दात अडकवून गुंतवण्याचा प्रयत्न केला जाण्याची शक्यता आहे. आमच्या मोर्चात कुणाला तरी घुसवायचे आणि काहीतरी घडवायचे, असे नियोजन आखले जात आहे”, अशी शंका व्यक्त करताना खळबळजनक आरोप जरांगे पाटील यांनी केला. ही माहिती मला सरकारी अधिकाऱ्यांकडूनच मिळाली असून आम्ही आता सावध झालो आहोत. त्यामुळे आम्ही आमच्या स्वयंसेवकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. आमच्या आंदोलनात कुणी हिंसाचार प्रयत्न करतोय का? यावरही बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सूचना स्वयंसेवकांना दिल्या असल्याचे ते म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठा आरक्षण : जरांगे पाटील यांना मुंबईत आंदोलन करण्यापासून रोखण्याचे आदेश द्या, मागणीसाठी उच्च न्यायालयात याचिका

टीव्ही ९ वृत्तवाहिनीशी बोलत असताना जरांगे पाटील यांनी सरकारवर गंभीर आरोप केले. ते म्हणाले, सरकारमधील मंत्र्यांची काल रात्री बैठक झाली असल्याची माहिती मला मिळाली. काही जणांचा मराठा आरक्षणाला विरोध आहे. मी या माहितीची खातरजमा करत आहे. लवकरच हे मंत्री कोण आहेत? याचीही नावे कळतील. मंत्र्यांच्या चर्चेत काहींनी आरक्षणाला विरोध केला, तर काहींनी आमच्या मुंबईतील आंदोलनाकडे दुर्लक्ष करण्याचा पर्याय दिला आहे. तसेच सरकारकडून माझ्यावर डाव टाकण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यासाठी मराठा समाजाच्या आंदोलनातून पुढे येऊन ज्यांनी राजकीय दुकानदारी सुरू केली होती. त्या लोकांना पुढे करून माझा विरोध करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यांना पत्रकार परिषदा घेण्याचे आणि वृत्तवाहिनीवरील चर्चांमध्ये सहभागी करून विरोधात बोलण्याच्या सूचना दिल्या आहेत. माझ्याविरोधात ट्रॅप रचण्याची तयारी केली जात असल्याचा खळबळजनक आरोप जरांगे पाटील यांनी केला.

मी मराठा समाजाच्या उन्नतीसाठी ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मागत आहे. माझ्या मागणीला सहा कोटी मराठा समाजाने पाठिंबा दिला आहे. पण सरकारने पाच-पन्नास मराठा नेत्यांना हाताशी धरून षडयंत्र रचण्याचा डाव रचला आहे. माझ्यामुळे अनेकांची दुकानदारी बंद झाली. हे सर्वात मोठे या लोकांचे दुखने आहे. समाजाच्या नावावर नेतेगिरी करणारे पूर्णपणे भूईला टेकले आहेत. त्यामुळे सरकारच्या वतीने अशा लोकांना पाठपळ दिले जात आहे. त्यामुळे मराठा समाजाला आवाहन करतो की, मला संकटकाळात साथ द्या. सरकारने मला गोळ्या घातल्या तरी मी मागे हटणार नाही, अशी भावनिक साद जरांगे पाटील यांनी घातली.

‘सगेसोयरे’ शब्दाबाबत जरांगे पाटलांनी स्पष्ट केली भूमिका; म्हणाले, “जेव्हा आम्ही मुंबईत जाऊ तेव्हा सगळ्या चर्चा बंद होतील!”

मनोज जरांगे पाटील पुढे म्हणाले की, मला अशीही माहिती मिळाली की, गुजरातमधून फोर्स मागविण्यात आला आहे. कदाचित तो सुरक्षा व्यवस्थेसाठीही मागितला गेला असेल. मी उगाच बिनबुडाचे आरोप करणार नाही. बीड किंवा संभाजीनगरमध्ये फोर्स आलेला आहे, अशी माहिती सरकारमधील सूत्रांनीच दिली आहे. मला अधिकृत माहिती मिळालेली नाही. मी शहानिशा करून याबद्दलचे सत्य मराठा समाजाच्या समोर लवकरच आणेल. पण सरकारने कितीही षडयंत्र केले तरी मी मागे हटणार नाही. सरकारला आमची कत्तल करावी लागेल. मराठा समाजाच्या आंदोलनाचे इतके दडपण सरकारने का घेतले आहे? मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी जितक्या बैठका घेतल्या, त्यापेक्षा अधिक बैठका आंदोलन चिरडण्यासाठी केल्या जात आहेत, असाही आरोप जरांगे पाटील यांनी केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maratha reservation leader manoj jarange patil expressed doubts on state government about 20 january mumbai agitation kvg
Show comments