Maharashtra Latest Breaking News Updates Today 7 February : राज्यातील नुकत्याच झालेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आलाय. नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांचे मेव्हुणे डॉ. सुधीर तांबे आणि भाचे सत्यजीत तांबे यांच्यावर बंडखोरीचा आरोप झाला. निकालानंतर स्वतः बाळासाहेब थोरात यांनीही सत्यजीत तांबेंबरोबर राजकारण झाल्याचं म्हणत नाराजी व्यक्त केली आणि आता तर त्यांनी पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदाचाच राजीनामा दिला. दुसरीकडे पुण्यातील कसबा आणि पिंपरी चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीबाबतही अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. या पार्श्वभूमीवर या सर्व घडामोडींच्या लाईव्ह अपडेट्स…
Maharashtra Latest Breaking News Updates : राज्यातील महत्त्वाच्या घडामोडींच्या लाईव्ह अपडेट्स…
जे जायला पाहिजे होतं, जे घालवायला पाहिजे होतं ते आम्ही सहा महिन्यांपूर्वीच घालून टाकलं. याचे आपण साक्षीदार आहात. त्यावेळचा काळ मला आठवतो. आम्ही गुवाहटीला होतो. काही लोक म्हणाले की, यायचं तर वरळीतून येऊन दाखवा, वरळीतून जाऊन दाखवा. हा एकनाथ शिंदे एकटाच आला आणि हेलिकॉप्टरने न जाता इथून रोडने गेला. आम्ही संघर्ष करून इथपर्यंत आलोय - एकनाथ शिंदे (वरळीतील भाषणात बोलताना)
काही लोकं काय काय बोलत असतात. मुंबई केंद्रशासित प्रदेश होणार, महाराष्ट्राचे तुकडे पडणार आणि मुंबईकरांचं काय होणार असे जावईशोध हे लोक मुंबईची प्रत्येक निवडणूक आल्यावर लावतात. परंतु हा एकनाथ शिंदे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला सांगतो की, मुंबई महाराष्ट्राची राजधानी आणि भारताची आर्थिक राजधानी आहे. या मुंबई महाराष्ट्राची एक इंचही जागा कोणाला घेता येणार नाही आणि घेऊ देणार नाही - एकनाथ शिंदे (वरळीतील भाषणात बोलताना)
एकनाथ शिंदे म्हणाले, "या सरकारने गेल्या सहा महिन्यात या अनेक मोठे धोरणात्मक निर्णय घेतले. आम्ही पहिल्या दिवसापासून जनतेच्या हिताचे निर्णय घेतले. म्हटलं व्हायचं ते होऊ दे, पण आम्ही कोळी बांधवांसाठी दोन खांबांमध्ये १२० मीटर अंतराचा निर्णय घेतला."
ठाकरे गटातील नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विरोधात निवडणूक लढण्याचे थेट आव्हान दिले आहे. शिंदे वरळीतून लढण्यास तयार नसतील, तर मी ठाण्यातून लढतो, असे आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. या आव्हानानंतर आता शिंदे आणि ठाकरे गटातील संघर्ष आणखी तीव्र झालेला आहे. वाचा सविस्तर
एकनाथ शिंदे वरळीतील सभेत म्हणाले, "मागील सरकारमध्ये ज्यांच्या डोक्यात सत्तेची हवा होती त्यांनी हुकुमशाही पद्धतीने कोळी बांधवांची दोन खांबांमधील अंतर वाढवण्याची मागणी फेटाळली. त्यानंतर सर्वसामान्यांना न्याय देणारं सरकार राज्यात आलं. त्यानंतर किरण पावसकर आमच्याकडे हा मुद्दा घेऊ आले. मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पहिली बैठक घेतली आणि कोळी बांधवांची मागणी मान्य केली."
गिरीश महाजन म्हणाले, "सत्यजीत तांबे स्वतः सांगतात की, त्यांच्यावर कसा अन्याय झाला आहे. त्यांचा एबी अर्ज कसा चुकवण्यात आला, कसा मु्द्दाम वेगळा अर्ज देण्यात आला. खरंतर काँग्रेसने आपल्याच हाताने आपल्या पायावर दगड मारून घेतला आहे. तांबे परिवार काँग्रेसमधील जुना परिवार आहे. सत्यजीत तांबेंचे वडील अनेक वर्षे आमदार होते. शिक्षण क्षेत्रात त्यांचं खूप मोठं काम आहे. अशा वरिष्ठ लोकांनाही काँग्रेसला सांभाळता येत नाही. हे काँग्रेसचं दुर्दैव आहे. आता त्यांच्या अधोगतीला सुरुवात झाली आहे. त्याला आता कुणीही थांबवू शकत नाही. जे काँग्रेसमधील मोठे नेते होते ते आता बाहेर पडत आहेत. भविष्यात सर्व मोठे नेते काँग्रेसमध्ये राहतील की नाही हे सांगता येणार नाही."
कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. आज या जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. दरम्यान, कसबा पेठ जागेसाठी बिग बॉस फेम अभिजित बिचुकले यांनीदेखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. वाचा सविस्तर
नाशिक पदवीधर मतदारसंघातील उमेदवारीवरून झालेल्या आरोप-प्रत्यारोपानंतर काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी पक्षश्रेष्ठींना पत्र लिहित विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला. यामुळे काँग्रेसमधील खदखद चव्हाट्यावर आली आहे. थोरातांच्या राजीनाम्यावर राज्यभरातून अनेक राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. अशातच प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर (देशमुख) यांनी बाळासाहेब थोरात यांच्यावर सूचक मत व्यक्त केलं. ते मंगळवारी (७ फेब्रुवारी) संगमनेरमध्ये (अहमदनगर) येथे थोरातांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कीर्तनात बोलत होते.
आदित्य ठाकरे म्हणाले, "या महाराष्ट्रात सर्वत्र फिरताना मला जाणवत आहे की, हे घटनाबाह्य सरकार पुढील दोन तीन महिन्यात पडणार म्हणजे पडणारच आहे. या मंत्रिमंडळात महिलांचा आवाज नाही. तुम्ही लिहून घ्या, या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार नाही म्हणजे नाही. त्याआधी हे सरकार कोसळणार आहे. यांच्या मनातच विस्तार करणं नाही. त्यांनी एवढ्या लोकांना 'तुला मंत्रीपद देतो' असं आमिष देऊन ठेवले आहे. यांना यांची वचनं पूर्ण करायला देशातील चार-पाच राज्यांमध्ये मंत्रिमंडळं तयार करावी लागतील."
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका करताना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांची जीभ घसरली आहे. नरेंद्र पाटील म्हणाले,"जितेंद्र आव्हाड पिसाळले आहेत. कारण त्यांच्या मतदारसंघात भोंग्याचे आवाज वाढले आहेत. त्यामुळे त्यांना ते कोण आहेत याचा विसर पडला आहे." नरेंद्र पाटील बीडमध्ये बोलत होते. यावेळी त्यांनी आव्हाडांच्या भूमिकेला शरद पवार आणि इतरांचे समर्थन आहे का? असा प्रश्नही विचारला.
नाशिक पदवीधर मतदार संघाचे अपक्ष आमदार सत्यजीत तांबे यांनी काँग्रेस पक्षाला आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलं. सत्यजीत तांबे म्हणाले, "बाळासाहेब थोरात यांच्या राजीनाम्याबाबत मला काहीच माहिती नाही. बाळासाहेब थोरात यांच्यासारख्या नेत्यांवर राजीनाम्याची वेळ येत असेल, तर काँग्रेस पक्षाने यावर आत्मचिंतन करायला हवे." ते मंगळवारी (७ फेब्रुवारी) संगमनेरमध्ये माध्यमांशी बोलत होते.
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर बॉम्बस्फोटाची धमकी देणाऱ्याला अटक, इंडियन मुजाहिद्दीन संघटनेच्या नावेने धमकीचा प्रकार, पोलिसांकडून आरोपीला गोवंडीतून २५ वर्षीय तरुणाला अटक, विमानतळ उडवण्याची धमकी आल्यानंतर विमानतळाच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली होती
काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये थोरात यांचे भाचे तथा अपक्ष आमदार सत्यजीत तांबे यांना डावलण्याचा प्रयत्न झाल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला आहे. वाचा सविस्तर
भाजपा आमदार नितेश राणे म्हणाले, "आदित्य ठाकरेंनी परत एकदा महाराष्ट्राला बदनाम करण्याचे सत्र सुरू केलं आहे. ते विदर्भातून एक प्रकल्प मध्यप्रदेशात निघून गेला, अशी खोटी माहिती पसरवत आहेत. याबद्दलचा एक तरी पुरावा आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राच्या जनतेला दाखवावा." यावेळी नितेश राणेंनी दावोसच्या संमेलनामध्ये चंद्रपूरमध्ये एक मोठा एमओयू (MOU) झालेला आहे, असाही दावा केला.
नाशिक पदवीधर मतदारसंघातील उमेदवारीवरून सुरू झालेला काँग्रेस पक्षांतर्गतचा संघर्ष चिघळला आहे. काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंवर गंभीर आरोप करत पक्षश्रेष्ठींना पत्र लिहिलं. तसेच काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला. यामुळे काँग्रेसमधील खदखद चव्हाट्यावर आली आहे. याबाबत राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांना प्रश्न विचारला असता त्यांनी थोरातांबरोबर फोनवर झालेल्या चर्चेची माहिती दिली. ते मंगळवारी (७ फेब्रुवारी) पुण्यात माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत बोलत होते.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी यांनी गौतम अदाणींचा उल्लेख करत भाजपावर गंभीर आरोप केले आहेत. वाचा सविस्तर
हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदाणी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मरगळ पाहायला मिळाली. मात्र मंगळवारी अदाणी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये पुन्हा चढता आलेख पाहायला मिळाला. सविस्तर बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सोमवारी एक मोठे विधान केले आहे. बिझनेस टुडे या संकेतस्थळाशी बोलत असताना त्यांनी सांगितले, “एलआयसी आणि एसबीआयने त्यांचे म्हणणे मांडले आहे. सरकार म्हणून आम्ही त्यांना प्रत्येक आठवड्याला मार्गदर्शन करु शकत नाही की त्यांनी गुंतवणुकीसाठी कोणत्या कंपनीला निवडावे किंवा निवडू नये. ते त्यांचा निर्णय घेण्यासाठी स्वतंत्र आहेत.” सविस्तर बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या प्रस्तावावर बोलत असताना केंद्र सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका केली. अग्निवीर योजना सैन्याला देखील रुचलेली नाही, असा दावा राहुल गांधी यांनी केला. सैन्यातील निवृत्त अधिकाऱ्यांनी मला माहिती दिली की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि अजित डोभाल यांनी ही योजना सैन्यावर थोपवली आहे, अशा खळबळजनक आरोप राहुल गांधी यांनी लोकसभेत केला. सविस्तर बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा
बाळासाहेब थोरातांच्या राजीनाम्यावर मुलगी जयश्री थोरात यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावर त्या म्हणाल्या, "अद्याप माझ्याबरोबर अशी कोणतीही चर्चा झालेली नाही. त्यामुळे मी त्या विषयावर काहीही बोलू शकणार नाही. ते जेव्हा व्यथित होतात तेव्हा आम्हा सर्वांनाच वाईट वाटतं. मात्र, मी या विषयावर काहीही बोलू शकणार नाही."
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा मुंबई दौऱ्यावर येणार असून येत्या १० फेब्रुवारी ते छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे वंदे भारत ट्रेनचे उद्घाटन करणार आहेत. या दौऱ्यानिमित्त सुरक्षा व्यवस्था चोख करण्यात आली असून मुंबई पोलिसांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. सविस्तर वाचा
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजा आणि औरंगजेबाबत केलेल्या विधानानंतर त्यांच्यावर विविध स्तरावरून टीका होत आहे. भाजपानेही आव्हाडांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. मात्र, मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे, असं आव्हाडांकडू सांगण्यात आला आहे. दरम्यान, याबाबत आता स्वराज्य संघटनेचे प्रमुख संभाजीराजे छत्रपती यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सविस्तर वाचा
नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये अंतर्गत संघर्ष निर्माण झाला आहे. अशातच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा रंगू लागली आहे. दरम्यान, यावरून भाजपा नेते केशव उपाध्ये यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर खोचक शब्दात टीका केली आहे. पटोले यांनी आधी काँग्रेस वाचवावी त्यानंतर इतर गप्पा माराव्या, असे ते म्हणाले. ट्वीट करत त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. सविस्तर वाचा
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर दहशतवाद्यांचा धमकीचा फोन, इंडियन मुजाहिद्दीन संघटनेकडून विमानतळ उडवण्याची धमकी, सुरक्षेत वाढ
नरेश म्हस्के म्हणाले, "महाविकास आघाडीत जे काही चालू आहे ते आपल्या सर्वांसमोर आहे. महाविकास आघाडीमध्ये लवकरच काही स्फोट होणार आहेत. आगे आगे देखो होता हे क्या. तुम्ही कोणाशी बरोबरी करत आहात? आमदारकीचं सोडा आणि एकनाथ शिंदेंशी बरोबरी करणं सोडून द्या. आत्ता नगरसेवकाच्या निवडणुका आहेत, माझ्या विरुद्ध उभे राहा आणि नंतर एकनाथ शिंदेंच्या विरुद्ध उभे राहण्याची तयारी करा."
अपक्ष आमदार सत्यजीत तांबे यांचे मामा तथा काँग्रेसमधील वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस पक्षाच्या विधीमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. वाचा सविस्तर
टर्की देश साखळी भूकंपांमुळे हादरला आहे. टर्कीसह सिरियामध्येही भूकंपाचे धक्के बसले आहे. या भूकंपांमध्ये आतापर्यंत हजारो नागरिकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत येथे भूकंपाचे चार धक्के बसले आहेत. वाचा सविस्तर
विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या उपस्थितीत नाना काटे यांचा उमेदवारी अर्जही दाखल करण्यात आला. दरम्यान, स्थानिक प्रभावी नेते राहुल कलाटे यांनीही ही निवडणूक अपक्ष लढण्याचा निर्धार केला आहे. यामुळे महाविकास आघाडीसमोर राजकीय संकट निर्माण झाल्याचं बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. वाचा सविस्तर बातमी...
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज राष्ट्रवादी काँग्रेसने महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून नाना काटे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. तर याच निवडणुकीत शिवसेनेचे स्थानिक बंडखोर प्रभावी नेते राहुल कलाटे यांनीही ही निवडणूक अपक्ष लढण्याचा निर्धार केला आहे. यामुळे महाविकास आघाडीसमोर अडचण निर्माण झाल्याचं बोललं जात आहे. ही अडचण सोडवण्याच्यादृष्टी राहुल कलाटेंच्या मनधरणीसाठी राष्ट्रवादीकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. मात्र राहुल कलाटे हे अपक्ष उमेदवारी दाखल करण्यावर ठाम आहेत. माझ्याबरोबर शिवसैनिक आहेत, असं म्हणत त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे सांगितले आहे. वाचा सविस्तर बातमी...
कसबा आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यासह राज्यातील राजकारणात वेगाने घडामोडी घडत आहेत. अशातच भाजपाकडून हेमंत रासने आणि काँग्रेसकडून रविंद्र धंगेकर यांनी सोमवारी (६ फेब्रुवारी) उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी दोन्ही उमेदवारांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी त्यांच्या संपत्तीचे तपशीलही जाहीर केले आहेत.
महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज लाइव्ह