पंढरपूर : धनगर समाजाला कॉंग्रेस सरकारने ६० वर्षे, तर भाजपने ६ वर्षे झुलत ठेवले. आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागलाच नाही. गेले १६ दिवस पंढरपुरात उपोषण करत आहे. सरकारचे एक शिष्टमंडळ आले. मात्र, विरोधी पक्षाचा एकही नेता आला नाही. असे असताना आमच्या समाजाने उपोषणाला पाठिंबा दिला. आता उपोषण थांबवून आरक्षणासाठी रस्त्यावर उतरू, असा निर्णय धनगर समाजाच्या राज्यव्यापी बैठकीत झाला. उपोषणकर्त्यांना समाजबांधवांनी लिंबू सरबत देऊन उपोषण स्थगित केले. मात्र, छत्रपती संभाजीनगर येथील जातपडताळणी कार्यालयावर बुधवारी मोर्चा काढणार असल्याचे माउली हळनवर यांनी जाहीर केले. आरक्षण हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि आम्ही ते मिळवणारच, असा निर्धार धनगर बांधवानी केला.

धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी येथे पाच समाजबांधव प्रातिनिधिक स्वरूपात बेमुदत उपोषणाला बसले होते. उपोषणाच्या १६व्या दिवशी म्हणजे मंगळवारी राज्यव्यापी बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला राज्यातून धनगर समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता. या वेळी विविध ठिकाणांहून आलेल्या धनगर बांधव आणि महिलांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. धनगर समाजाचा विषय आला, की सरकार वेळकाढूपणा करते. आमच्या समाजाच्या उपोषणाला भेट देण्यासाठी विरोधी पक्षाच्या एकाही नेत्याला वेळ मिळत नाही. मात्र, आमच्या समाजाची मते पाहिजेत. अशा नेत्यांना निवडणुकीत जागा दाखवू, असा निर्धार व्यक्त केला. या वेळी उपोषणकर्त्यांनी देखील आपली भूमिका मांडताना सरकार जोपर्यंत आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावत नाही तोपर्यंत उपोषण सुरू राहील, असे जाहीर केले.

हेही वाचा >>>सांगली: मिरज तालुक्यात मुसळधार पाऊस, एकजण पुरात गेला वाहून

धनगर समाजाच्या आरक्षणातील महत्त्वाचा अडसर म्हणजे खिल्लारे कुटुंबीयांचे धनगड असा उल्लेख असलेले प्रमाणपत्र रद्द झाले पाहिजे. त्यास मान्यता दिली आहे. परंतुअंमलबजावणी तत्काळ होणे गरजेचे आहे. येथे उपोषणाला बसलेल्यांची तब्येत खूप खालावली आहे. आपल्या हक्काचा लढा आपण लढू; मात्र उपोषण स्थगित करा, असे धनगर समाजाचे विशाल कोकरे म्हणाले. उपस्थित समाजबांधवांनीदेखील त्याला होकार देत उपोषण स्थगित केले. दरम्यान, आरक्षणाचा लढा आता रस्त्यावर उतरून लढू. संभाजीनगर येथील जातपडताळणी कार्यालयातील मुजोर अधिकारी वेळकाढूपणा करत आहेत. बुधवारी उपोषणाला बसलेले आम्ही सर्वजण रुग्णवाहिकेतून थेट कार्यालयावर मोर्चा काढून जाब विचारणार, असे माउली हळनवर यांनी जाहीर केले