पुणे, मुंबईसह राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. तसेच काही ठिकाणी गारपीठ झाल्याचंही बघायला मिळालं असून या गारपिटीने शेतपिकांचं मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान, पुढचे दोन ते तीन दिवस राज्यात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी भर पडण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – पुण्यासह राज्याच्या विविध भागांत पावसाच्या सरी ; उदयाही पावसाची शक्यता

राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस

यासंदर्भात पुणे हवामान विभागाचे प्रमुख केएस होसाळीकर यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे. राज्यातील नंदूरबार, नाशिक, कोल्हापूर, पुणे, नागपूर मुंबई ठाणेसह काही भागात गेल्या २४ तासांत मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला आहे. तर काही ठिकाणी गारपीटही झाली आहे, असे ते म्हणाले.

पुढचे तीन दिवस मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज

पुढे बोलताना त्यांनी पुढचे दोन ते तीन दिवस मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तसेच काही ठिकाणी गारपीटीची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे.

हेही वाचा – नागपूरसह विदर्भात अवकाळी पावसाची हजेरी, मुसळधार पावसासह गारपिटीचा इशारा

दरम्यान, बुधवारी मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरसह राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. ग्रामीण परिसरात सकाळपासून पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे कामावर निघालेल्या चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ उडाली. तसेच या पावसामुळे शेतपिकांचंही मोठं नुकसान झालं आहे.