भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांचं पक्षात खच्चीकरण सुरू असल्याच्या चर्चा सतत रंगतात. त्यातच पंकजा मुंडे यांनी चष्मा लागल्यानंतर सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओनंतर राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. यावर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केलं आहे. "पंकजा मुंडे यांचं दुर्दैव असं आहे की, त्या शिंकल्या आणि हसल्या तरी बातमी होती. पंकजा मुंडे यांच्या प्रत्येक वाक्याचा चुकीचा अर्थ काढला जातो. त्यामुळे त्यांचं खूप नुकसान होत आहे," असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. व्हिडीओ काय? पंकजा मुंडेंनी डोळ्यांना चष्मा लागल्याची माहिती सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली होती. त्यांनी ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’ या सुप्रसिद्ध गाण्याचा सूर लावत “ताईला चष्मा लागला, ताईला चष्मा लागला” असं नवं गाणं सादर करत चष्मा लागल्याचं सांगितलं. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. पंकजा मुंडे व्हिडीओमध्ये म्हणाल्या, “एक मिनिट सरप्राइज.. ताईला चष्मा लागला.. ताईला चष्मा लागला.. लांबचा चष्मा नाही बरं का.. जवळचा चष्मा आहे. मला जवळचं कमी दिसत होतं वाटतं. ते आता चांगलंच स्पष्ट दिसायला लागेल. चष्म्याचा नंबर कमी आहे. पण मला आता जवळचं स्पष्ट दिसेल. दूरचं तर आधीही चांगलं दिसत होतं आणि आताही चांगलं दिसतंय. कसा वाटतोय चष्मा?” "पंकजा मुंडेंचा घात जवळच्याच माणसाने केला आहे" पंकजा मुंडेंच्या व्हिडीओवर प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनीही भाष्य केलं होतं. “पंकजा मुंडेंचं बरोबर आहे. त्यांचा घात त्यांच्या जवळच्याच माणसाने केला आहे. त्यामुळे त्यांनी चष्मा बदलायला हवा होता. त्यांनी योग्य वेळी त्यांचा चष्मा बदलला आहे. आता त्या चष्म्यातून त्यांनी व्यवस्थित राजकीय लक्ष्य साधावं,” असं बच्चू कडू म्हणाले होते.